लातूर : रेणापूर तालुक्यातील विविध गावांना भेटी देवून ढगफुटीसदृश्य पावसामुळे व अतिवृष्टीने झालेल्या शेतकरी बांधवांच्या नुकसानीची ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी शनिवारी पाहणी केली. शेतकरी बांधवांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहचवू, असेही ते म्हणाले.
ढगफुटीसदृश्य पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर संकट ओढावले आहे. त्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी रेणापूर, जवळगा (सेलू), पांढरी (खरोळा), कुंभारवाडी, तळणी (मो), मोहगाव (त) इथल्या बांधावर जावून आमदार श्री. धिरज देशमुख यांनी नुकसानीची पाहणी केली. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा त्यांनी ऐकून घेतल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, तालुका कृषी अधिकारी नागरगोजे, मंडळ अधिकारी दिलीप देवकते, कृषी सहायक शिवाजी कदम, तलाठी गोविंद शिंगडे, तलाठी अमोल काळे, तलाठी एस. एन. गुडे, ग्रामसेवक एस. ए. पवार आदी उपस्थित होते.

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ऊस, फुले, फळभाज्या, पालेभाज्या यासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून तातडीने पंचनामे होऊन शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, शासन शेतकऱ्यांना योग्य ती मदत करेल अशी अपेक्षा आहे, असे आमदार श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.—