प्रांगण पत्रकारितेचे – भाग:१.
इचलकरंजीच्या के.ई.एम. हॉस्पिटलमधील फार्मसीचे ट्रेनिंग सुरु असतानाच तिथल्या आविष्कार युवक मंडळाच्या अरविंद कुलकर्णीचा परिचय झाला. तो तिथल्या दैनिक मँचेस्टर (आत्ताचे दैनिक महासत्ता) मध्ये नोकरी करत होता. माझ्या ट्रेनिंगच्या ठिकाणी तो अधूनमधून भेटायला यायचा. साधा, सरळ मार्गी, अभ्यासू आणि समोरच्याला आपलेसे करण्याच्या त्याच्या गुणांमुळे माझी त्याची छान मैत्री जमली होती. त्यालाही लेखनाची आवड असल्याने आमचं छान जमलंही होतं.
एक दिवस अरविंदशी बोलताना चर्चा माझ्या लिखाणाकडे सरकली…. “तू इतकं छान लिहितोस मग आमच्या दैनिकासाठी जयसिंगपूरला वार्ताहर म्हणून काम का करत नाहीस ?” अरविंदने असं विचारलं आणि मनात अंकूरलेल्या पत्रकारितेच्या इच्छेला पालवी फुटू लागली. माझ्याही न कळत मी होकार दिला आणि मला घेवून अरविंद मँचेस्टरच्या कार्यालयात आला. महेश ताकभाते तेव्हा दैनिकाची जबाबदारी सांभाळत होते. अरविंदने त्यांची ओळख करुन दिली आणि जयसिंगपूर वार्ताहर म्हणून नियुक्तीचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. महेश ताकभातेनी काही प्रश्न विचारले. दोन विषय दिले आणि त्यावर लिहायला सांगितले. एवढी परिक्षा घेतल्यावर ते म्हणाले, ” ठीक आहे… सुरु करा काम… बातमी म्हणून लेखनात थोडी सुधारणा आवश्यक आहे. तुम्ही लिहिलेले आणि छापून आलेले यांची तुलना करा, सुधारणा होईल.”

तिथून बाहेर पडलो आणि जयसिंगपूरला आलो. बातमीदारी सुरु करायची आहे पण सुरुवात कशी करायची ? हा प्रश्न होताच. इतक्यात एक नाव आठवलं…. विजय जाधव…! विजय तेव्हा दैनिक सकाळचा जयसिंगपूर बातमीदार होता. !तडक कचरे सोसायटीतील विजयच्या घरी गेलो. सगळं त्याला सांगितलं. विजयनं लगेच मान्यता दिली. “उद्याच जयसिंगपूर हायस्कूलमध्ये कार्यक्रम आहे, तिथे जाऊ, सुरुवात करु…. मी करतो मदत तुला …!!” असं विजय म्हणाला आणि मला हायसं वाटलं. जयसिंगपूर हायस्कूलच्या तांत्रिक विभागाचा शंकरलाल रमेशचंद्र तांत्रिक विभाग असं नामकरण करण्याचा तो कार्यक्रम होता.
दुसरे दिवशी विजय सोबत शाळेत गेलो. बहुतेक सगळे शिक्षक मला ओळखत होतेच. पण विजयनं माझी नवी ओळख करुन दिली, “हे मँचेस्टरचे वार्ताहर…!!” ज्या शाळेत शिकलो तिथेच आज वार्ताहर अशी नवी ओळख होत होती. शाळेतील विद्यार्थ्यांचे बाक सोडून तीन चार वर्षेच झाली असतील तिथे आज पत्रकार कक्षात सन्मानाने बसलो होतो. ज्या शिक्षकांचे प्रसंगी धपाटे आणि बोलणी खाल्ली ते आज सन्मान देत होते. हा बदल मोठा विलक्षण होता. लेखणीची ताकद आणि माझी जबाबदारी या दोन्हीची एकाचवेळी मला जाणीव करुन देत होता. जिथे शिकलो तिथेच माझी व्यावसायिक जीवनाची सुरुवात होत होती.
कार्यक्रम संपल्यावर विजय सोबत त्याच्या घरी गेलो. त्याच्या मार्गदर्शनाखाली बातमी लिहिली. १९८६ चा काळ आहे हा…!! तेव्हा कॉम्प्युटर, फँक्स नव्हते. लँडलाईन फोन होते फक्त. त्यामुळे बातमी ऑफीसला पोहोचवण्याचे सगळ्यात जलद साधन होते… एस.टी…!! लिहिलेली बातमी पाकीटात घातली आणि विजय सोबत एस. टी. स्टँडवर गेलो. विजयनेच वाहतूक नियंत्रकांशी परिचय करुन दिला. दोघांची पाकिटे त्यांच्या टेबलवर ठेवली. बस आल्यावर वाहतूक नियंत्रकानी चालकांकडे ही पाकिटे दिली. बसचा नंबर लिहून घेतला. नगरपालिकेत आलो. विजयनेच तिथे असलेल्या सगळ्यांशी माझा परिचय करुन दिला. तिथूनच दैनिकांच्या कार्यालयात फोन करुन बसचे क्रमांक सांगितले. नंतर पोलिस ठाण्यात गेलो. तिथे परिचय सत्र झालं.
पोलिस ठाण्यात जाताच विजयला पाहून ठाणे अंमलदारानं म्हटलं होतं, “शांत आहे…!!” मला काही कळलं नव्हतं. परिचय सत्र संपवून बाहेर पडल्यावर विजयला विचारलं, “ते शांत आहे,” असं का म्हणाले रे …!! विजयनं खुलासा केला, शांत आहे म्हणजे आज पोलिस ठाण्यात काही बातमी नाही. शहरात काही क्राईम घडलेलं नाही. माझ्या वार्ताहर म्हणून होत असलेल्या परिचयासोबतच पत्रकारितेतील सांकेतिक शब्दांचा मला परिचय सुरु झाला होता. “दररोज नगरपालिका आणि पोलिस ठाण्यात जायचच..!!” विजय मला न्यूज सोअर्स आणि ते कसे हाताळायचे हे शिकवत होता. माझ्यासाठी सगळच अदभूत आणि नवीन होतं.
दुसरे दिवशी मोठ्या उत्सुकतेने मँचेस्टर पाहिला. अंकात बातमी नव्हती. महेश ताकभाते यांना फोन केला. “बातमी मिळाली आहे, पण प्रायॉरिटीत नाही, उद्याच्या अंकात येईल,” महेश ताकभाते म्हणाले. दैनिकात बातम्यांना प्राधान्यक्रम असतो, संध्याकाळी पहिले पान असते, त्यावर फक्त महत्वाच्या बातम्या घेतात, बाकी बातम्या दुसरे दिवशी आतल्या पानात घेतल्या जातात. विजयनं मला हे सांगितलं आणि या क्षेत्रात मला अपडेट केलं. दुसरे दिवशी उत्युकतेने मँचेस्टर पाहिला. जशीच्या तशी बातमी छापून आली होती. मी वार्ताहर झालो होतो…. पत्रकार झालो होतो ….!!!
अरविंद कुलकर्णी ने मला पत्रकारितेचा मार्ग दाखवला, महेश ताकभाते यांनी संधी दिली आणि विजय जाधवनी आजच्या भाषेत सांगायचे तर मला या क्षेत्रात एस्टँब्लिश करायला सुरुवात केली होती. माझ्या आयुष्याची ट्रेन फार्मसीच्या ट्रँक वरुन पत्रकारितेच्या रुळावर आली होती …. सुसाट धावण्यासाठी ….!!!

- आनंद वामन कुलकर्णी
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
भ्रमणध्वनि – ७७४४९६४५५०