लातूर शहर जिल्हा भाजपाचा जल्लोष
लातूर/प्रतिनिधीः- संपुर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या मिशन चंद्रयान-3 ने एैतिहासिक कामगिरी करत चंद्राच्या दक्षिण धु्रवावर यशस्वीपणे पाय रोवले आहे. यामुळे भारताची चंद्रयान मोहिम फत्ते झालेली असून या एैतिहासिक कामगिरीबद्दल लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने येथील गांधी चौकात जल्लोष करण्यात आला.

गत सव्वा महिन्यापासून संपुर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या मिशन चंद्रयान-3 मोहिमेचा दि. 23 ऑगस्ट हा महत्वाचा दिवस होता. यादिवशी बरोबर संध्याकाळी 6.4 मिनिटानी चंद्राच्या दक्षिण धु्रवावर जगातील पहिला देश ठरलेला भारताने आपला तिरंगा फडकावलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) ने ही एैतिहासिक कामगिरी केलेली आहे. या कामगिरीमुळे चंद्राबाबत आता अधिक संशोधन करण्यास मोठी मदत होणार आहे. चंद्राच्या दक्षिण धु्रवावर भारताच्या इस्त्रोने आपले यान उतरवून जगात भारत सर्वश्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या एैतिहासिक कामगिरीचे साक्षीदार होण्यासाठी लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या संकल्पनेतून येथील महात्मा गांधी चौकात मोठ्या स्क्रिनची सोय करण्यात आलेली होती.

भारताचे चंद्रयान दक्षिण धु्रवावर उतरताच येथील गांधी चौकात शहर जिल्हा भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह उपस्थित नागरीकांनी फटाक्याची आतिषबाजी करत यात एैतिहासिक कामगिरीचा जल्लोष व्यक्त केला. या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत आता होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही असा विश्वास व्यक्त करून शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळे या एैतिहसिक क्षणाचे साक्षीदार 140 कोटी भारतीयांना होण्याचे सौभाग्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याचबरोबर इस्त्रोने ही कामगिरी केल्याबद्दल त्यांचे शास्त्रज्ञ व या मोहिमेत सहभाग नोंदविलेल्या प्रत्येकांचे अभिनंदन केले.