*जनसेवेसाठी समर्पित*

0
347
संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित करणारे-किशनराव पाटील इंचूरकर
महाराष्ट्र-कर्नाटक सिमालढ्यात स्वतःला झोकून देत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्याला वाहुन घेतलेले, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी, बसवकल्याण, औराद बार्‍हाळीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे हा महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा आपण अखेरच्या क्षणापर्यंत संपूर्ण ताकदीनिशी लढत राहणार आहोत अशी ग्वाही देणारे किशनराव पाटील इंचूरकर हे 72 वर्ष पूर्ण करून 73 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. 01 जानेवारी 2022 रोजी त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा, भालकी शहरात मोठया थाटामाटात साजरा होत आहे. संपूर्ण हयातीत समाजकारण व राजकारणात सक्रीय सहभाग नोंदवून अनेकाच्या जीवनाचे कल्याण करणारे किशनराव पाटील सर्वांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक-हार्दिक शुभकामना! व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात इंचूर ता.भालकी यागावी जन्म घेतलेल्या किशनराव पाटील यांनी आपले शिक्षण इंचूर व उदगीर येथे पूर्ण केले. इंचूर गावची पोलीस पाटीलकी सांभाळत-सांभाळत गावाच्या नावाचा लौकीक त्यांनी केला. आपल्या नावातच इंचूरकर म्हणून त्याने गावास गोवले. आज इंचूरकर म्हटले की किशनराव पाटील यांचे गाव असे लोक ओळखतात.
छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळाची इंचूरमध्ये स्थापना करून त्यांनी 1982 मध्ये शिवरायाच्या पुतळ्याची उभारणी केली. 1980 ते 1985 पर्यंत ते भालकी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहीले. काँग्रेस सेवादलाचे भालकी तालुकाध्यक्षही ते होते. 1994 मध्ये बिदर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते बिनविरोध निवडले गेले होते. माजी मंत्री भिमन्नाप्पाजी खंड्रे संस्थापक अध्यक्ष असलेल्या महात्मा गांधी सहकारी साखर कारखान्याचे सलग 18 वर्षे संस्थापक उपाध्यक्ष राहीले. यांच्या कार्याचे कौतुक म्हणून त्यावेळेचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला होता.
पिता विठ्ठलराव व माता चंद्रभागाबाई यांच्या पोटी जन्म घेतलेल्या या शेतकरी पुत्राला चार बहिणी व एक भाऊ व पत्नी कुशलबाई यांचे पोटी दोन मुले 3 मुली नातवंडे पंतु असा मोठा परिवार आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी आ.कै.बापूसाहेब एकंबेकर, कै.माधवराव वकील जवळगेकर, कै.बापूराव पाटील हुलसूरकर, कै.त्र्यंबकराव पाटील लखनगावकर, कै.बाबाराव वकील व्हणाळीकर, कै.यशवंतराव सायगावकर, माणीकराव जानापुरकर, बाबुराव वकील गौरचिंचोळीकर, अ‍ॅड.गोविंदराव पाटील भाटसांगवीकर, रामराव राठोड यांच्या समवेत काम केल्याने ते स्वतःला धन्य समजतात. हाळीखेड व नारंजा साखर कारखान्याच्या उभारणीत व ते चालविण्यामध्ये किशनरावांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. भालकी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असतांना त्यांनी भालकीचा जनावराचा आठवडा बाजार सुरू केला 100 प्लॉटची निर्मिती करून लोकांना आडत करून दिली. तो आजतागायत चालू आहे.
गेल्या 55 वर्षापासून ते स्वखर्चाने जनसेवेत कार्यरत आहेत. हा वसा आपण कधी टाकणार नाही असे ते सहकारी, कार्यकर्त्यांना सातत्याने सांगत असतात. एका सहकारी साखर कारखान्याचा सलग 18 वर्षे संस्थापक उपाध्यक्ष, भालकीच्या शांतीवर्धक शिक्षण संस्थेचे 20 वर्ष सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे 5 वर्ष सभापती, बिदर जिल्हा विकास स्वराज्य जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कुळकायदा ट्रिमलन अ‍ॅक्ट (1990-1996) भालकी तालुका शासकीय कमिटी सदस्य, बिदर जिल्हा किसान सेल जिल्हाध्यक्ष, सेवादल जिल्हाध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. एकाच कालावधीत गौरचिंचोळी ता.भालकी सोसायटीचे उपाध्यक्ष, डी.सी.सी. बँक भालकी तालुकाध्यक्ष, बिदर जिल्हा डी.सी.सी. बँकेचे उपाध्यक्ष म्हणून एकाचवेळी तीन पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. या काळात त्यांनी लोन व वसुली 100% करून जनता व शासनाचे दुत म्हणून यशस्वी योगदान दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीत वर्षानुवर्षे निष्ठेने सक्रीय कार्य आजतागायत सुरू आहे. सीमा लढ्यात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. एवढी सगळी भक्कम पार्श्‍वभुमी असलेली राजकीय क्षेत्रातील बडी हास्ती आणि आजही मनाने निर्मळ, वागणुकीत प्रांजळ, कसलाच स्वार्थ नसलेली ही व्यक्ती जीवनात कधी एक साधी मोटार सायकल त्यांनी घेतली नाही. संपूर्ण जीवन जनसेवेसाठी समर्पित करणार्‍या सीमाभागातील या निस्वार्थी, सेवाभावी, निरगस अशा या हरहुन्नरी तरूण मनाच्या क्रियाशील महान व्यक्तीला वाढदिवसानिमित्त आमचा मानाचा मुजरा….!
विद्यासागर पाटील
औराद शहाजानी, ता.निलंगा, जि.लातूर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here