अत्यंत सुदृढावस्थेत जन्मलेली एक बालिका अचानक ताप येण्याचे निमित्त होऊन वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षीच विकलांग, इंद्रियशिथिल बनते… आणि आई-बापाचा तिला पूर्ववत करण्याचा संघर्ष सुरू होतो… हे मूल आता बरे होऊ शकणार नाही, ही वस्तुस्थिती एक दिवस सामोरी येते… त्या वस्तुस्थितीसह ते तिला जीवापाड सांभाळतात… आपल्या माघारी तिच्या आयुष्याची तरतूद म्हणून पै न पै जोडून ३५ लाख रुपयांची बचत करतात… मात्र, वयाच्या ४५व्या वर्षी ती मुलगी अखेरचा श्वास घेते… तिच्या जाण्याने कोलमडून पडलेले हे दांपत्य त्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा एक अतिशय मोठा निर्णय घेते… आणि त्या मुलीचेच असणारे ३५ लाख रुपये तिच्याच स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठाला प्रदान करतात… आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हा हृद्य सोहळा विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये घडून आला… या निधीमधून आता विद्यापीठात संशोधक विद्यार्थिनींसाठीचे वसतीगृह साकारले जाणार आहे… कोल्हापूर येथील पंडित सदाशिव मारुलकर आणि सौ. रजनी पंडित मारुलकर हे या ज्येष्ठ दांपत्याचे नाव आणि अस्मिता पंडित मारुलकर ही त्यांची दिवंगत कन्या!
श्री. मारूलकर हे १९६८ ते १९९९ या कालावधीमध्ये शिवाजी विद्यापीठात कार्यरत होते. सहाय्यक कुलसचिव पदावरून ते निवृत्त झाले. त्यांची कन्या अस्मिता तीन वर्षांची असताना तापाचे निमित्त होऊन अंथरूणाला खिळली. तिच्या शरीराचे नियंत्रण करणारे मेंदूतील केंद्र निकामी झाले. केवळ दृष्टी, श्रवण आणि बुद्धीमत्ता एवढेच कायम राहिले. १९ डिसेंबर २०२० रोजी वयाच्या ४५व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. आपल्या माघारी तिची हेळसांड होऊ नये, यासाठी या दांपत्याने पै न पै साठवून ३५ लाख रुपयांची बचत केली. मात्र, आता मुलगीच न राहिल्याने तिचाच अधिकार असलेल्या रकमेचा विनियोग स्वतःसाठी न करता समाजासाठी करण्याचा निर्णय मारुलकर दांपत्यानं घेतला.
सौ. रजनी आणि पंडित मारूलकर या दांपत्यानं अस्मिता हिच्या स्मृती शिवाजी विद्यापीठामध्ये कायमस्वरुपी जतन केल्या जाव्यात, यासाठी तिच्या स्मरणार्थ शिवाजी विद्यापीठास ३५ लाख रुपये इतकी रक्कम विनाअट देणगीरूपाने स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदान केली. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी विद्यापीठाच्या वतीने या निधीच्या धनादेशाचा स्वीकार केला.
यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मारुलकर कुटुंबियांनी ज्या भावनेतून हा निधी विद्यापीठास प्रदान केला, तिचा आदर राखून विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनींसाठी प्रस्तावित असलेल्या वसतीगृहाच्या बांधकामासाठी या निधीचा विनियोग करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणं वसतीगृहाच्या प्रथम मजल्यावर ‘सौ रजनी पंडीत मारूलकर आणि पंडीत मारूलकर यांनी कन्या अस्मिता हिच्या स्मृतीप्रित्यर्थ दिलेल्या देणगीतून या मजल्याचे बांधकाम झाले’ अशी कोनशिला दर्शनी भागात बसविण्यात येईल, असंही सांगितलं. मारुलकर दांपत्यानं या देणगीद्वारे दातृत्वाचे एक महान उदाहरण जगासमोर ठेवले आहे, असे गौरवोद्गारही कुलगुरूंनी काढले. मारुलकर दांपत्यास विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली द्विखंडीय ‘तुकारामबोवांची गाथा’ प्रदान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी मारुलकर यांनी, हा निधी अस्मिताचा आहे. तो केवळ तिच्या वतीने आम्ही विद्यापीठास सुपूर्द करीत आहोत. त्याचा विद्यापीठाने योग्य कारणास्तव विनियोग करावा, अशी निरलस अपेक्षा व्यक्त केली.
काल स्वातंत्र्यदिनानिमित्त या एका आगळ्या आणि हृद्य कार्यक्रमाचा साक्षीदार होता आलं… त्यातून दातृत्वाचं तेज किती प्रखर असू शकतं आणि एखाद्या संस्थेवरील विश्वासही किती पराकोटीचा असू शकतो, हेही दिसून आलं… मारुलकर यांचं देणं जितकं श्रेष्ठ तितकाच त्यांचा शिवाजी विद्यापीठावरील विश्वासही अत्यंत सार्थ… गेल्या तीनेक वर्षात ज्येष्ठ साहित्यिक सतीश काळसेकर, समीक्षक म.सु. पाटील, कवी पंडित आवळीकर यांच्या कुटुंबियांनी अशाच विश्वासानं शिवाजी विद्यापीठास भरीव निधी प्रदान केला, त्यातून त्यांच्याच नावे विविध साहित्य पुरस्कार विद्यापीठाकडून संस्थापित करण्यात आले. काळसेकर कुटुंबियांनी तर सरांची समग्र ग्रंथसंपदाही विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राकडं मोठ्या विश्वासानं सुपूर्द केलीय. प्राचार्य श्रीधर हेरवाडे यांच्यासारख्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वानं महावीर अध्यासनासाठी भरीव निधी द्यावा, हेही त्या विश्वासाचंच प्रतीक. असं दातृत्वतेज आणि पराकोटीचा विश्वास यांचं आणखी एक उदाहरण मारुलकर दांपत्याच्या रुपानं पाहता आलं, अनुभवता आलं… एखादी किरकोळ रक्कम देणगी द्यायची, तर भलीमोठी अटींची आणि नियमांची जंत्री जोडणारे, त्या माध्यमातून आपलं दानश्रेष्ठत्व कसं सातत्यानं लोकांवर बिंबत राहील, याची चिंता वाहणारे दाते अनेक आले पाहण्यात; पण कोणत्याही अटीविना आयुष्याची पुंजी केवळ मुलीचं नाव जपलं जावं, एवढ्या माफक अपेक्षेनं विद्यापीठाच्या हाती सोपविणारे मारुलकर किती वेगळे उठून दिसणारे! कर्णाच्या दातृत्वाबद्दल आम्ही वाचलंच फक्त, प्रत्यक्षात पाहिलं ते मात्र मारुलकरांना!
- अलोक जञाटकर
जनसंपर्क अधिकारी
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर