पुनश्च हरिओम, बदलत्या तरुण भारत सोबत
नमस्कार, गेल्या 32 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपले प्रेम, स्नेह, जिव्हाळा मोठ्या प्रमाणात लाभला. या प्रेमाच्या शिदोरीच्या बळावरच मला आपल्या भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शासन-प्रशासन दरबारी मांडून त्याची सोडवणूक करता आली. या कार्यामध्ये स्थानिक वृत्तपत्रासह मराठवाडा, एकमत, सकाळ, केसरी, गावकरी, या प्रमुख नामांकित वृत्तपत्रामध्ये काम करता आले. सुरुवातीच्या काळामध्ये घटनास्थळावर फोटोग्राफरला घेऊन तयार केलेली बातमी टपाला मार्फत वृत्तपत्र कार्यालयात पोहोचवून ती फोटोसह प्रकाशित झालेल्या बातमीचा आनंद अगणित होता. आजच्या सोशल मीडियाच्या माध्यमांमुळे पोस्ट केलेल्या बातमीला लगेच मिळणारा प्रतिसाद यापेक्षा त्या काळामध्ये बातमी मिळविल्या पासून ते प्रकाशित होऊन वाचकापर्यंत पोहचविण्याचा जो खडतर प्रवास होता त्याचा त्रास होण्यापेक्षा आनंद जास्त मिळतं होता. तो आनंद आता या सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लाईक मिळाल्या तरी कमीच आहेत.

माझ्या वृत्तपत्राच्या कार्यकाला मध्ये स्वर्गीय पद्माकर बोकील, स्वर्गीय किसनराव वाळके यांच्यासह तत्कालीन कार्यकरत असलेल्या वृत्तपत्राच्या संपादकांची साथ अनमोल आणि कधीही न विसरणारी आहे. साप्ताहिक मनोकामना या वृत्तपत्राच्या माध्यमातून काम करताना वृत्तपत्र आठवड्याला निघत असतानाही या आठवड्यात आता वामन पाठकने काय लिहिले आहे. कोणाची चिरफाड केली आहे. याची उत्कंठा वाचकांनी माझ्याकडून सातत्याने ठेवली. त्याचबरोबर उपरोधिक लिखाणाचे भरभरून कौतुक आणि अशाच लेखनाची अपेक्षा ठेवली. आणि मनोकामना कधी मिळेल याची विचारणा वृत्तपत्र वाटप करणाऱ्या प्रतिनिधीकडे करत असताना जो आनंद त्यावेळी मिळत होता. तो आनंद आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्यांना मिळालेल्या लाखो प्रतिसादा पेक्षा नक्कीच जास्त आहे. प्रादेशिक वृत्तपत्रामध्ये ग्रामीण भागातील प्रतिनिधी ते जिल्हा प्रतिनिधी, उपसंपादक, कार्यकारी संपादक, वृत्तसंपादक, ग्रामीण विभाग प्रमुख या पदावर काम करण्याची संधी मिळाली. ते सर्व आपल्या प्रेम व शुभेच्छाच्या बळावरच आज सर्वांप्रमाणेच covid-19 या दोन वर्षाच्या बॅडपॅच नंतर पुन्हा एकदा सोलापूर तरुण भारत या वृत्तपत्राला प्रसिद्ध निरुपमकार विवेकजी घळसाशी यांचा परिस स्पर्श झालेल्या वृत्तपत्रामध्ये कार्यकारी संचालक दिलीप पेठे, समूह संपादक राजा माने, मुख्य संपादक विजयकुमार पिसे, यांच्यासह आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के यांच्यासोबत 35 वर्षापासून वृत्तपत्र क्षेत्रांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेले दैनिक सोलापूर तरुण भारतचा जिल्हा प्रतिनिधी, वृत्त संपादक म्हणून पुनश्च एकदा हरिओम करत आहे. सोलापूर तरुण भारत च्या मुख्य कार्यालयात समूह संपादक राजा माने यांच्या उपस्थित नवीन कार्याचा पदभार स्वीकारला. यावेळी सोलापूर तरुण भारत मीडिया लिमिटेडचे संचालक प्रशांत बडवे, कार्यकारी संचालक दिलीप पेठे मुख्य संपादक विजयकुमार पिसे, आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के यांची उपस्थिती होती. या कार्यात आपले प्रेम, स्नेह, आपुलकी आणि साथ पूर्वीप्रमाणेच मिळेल. अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.
वामन पाठक