गंधर्व परिवाराच्या वतीने स्वच्छता करणाऱ्या महिलांचा गौरव
लातूर /प्रतिनिधी:देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समाजातील वंचित घटकांचा विकास करून राजकारणाचा पोत बदलण्याचे काम होत आहे,असे मत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी येथे व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला.या निमित्ताने येथील गंधर्व परिवाराच्या वतीने शहराच्या स्वच्छतेची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.त्यांना रेनकोटचे वाटपही करण्यात आले.यावेळी उपाध्ये बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून आ.रमेश कराड,गणेश हाके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहराध्यक्ष देविदास काळे, गंधर्वचे प्रवीण कस्तुरे,श्रीराम कुलकर्णी,प्रेरणा होनराव,पंकज मोदी, जनाधार संस्थेचे संजय कांबळे आदी उपस्थित होते. राजकारणाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. आतापर्यंत नकारात्मकतेतूनच राजकारणाकडे पाहिले जात होते.पण आता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचा पोत बदलण्याचे काम केले आहे.समाजातील वंचित घटकाच्या विकासावर भर देण्याचे काम होत आहे.

राजकारण हे सकारात्मक दृष्टीने केले जाऊ शकते हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले आहे. फडणवीस यांचा आजचा वाढदिवस सेवा दिन म्हणून आपण साजरा करत आहोत.प्रवीण कस्तुरे यांनी स्वच्छता करणाऱ्या महिलांचा गौरव करून एक वेगळा उपक्रम हाती घेतला.असेच उपक्रम वर्षभर घेण्यात यावेत,अशी अपेक्षा उपाध्ये यांनी यावेळी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजकारणातील चाणक्य म्हणून पाहिले जात आहे. त्यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून आज साजरा होत आहे.शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या महिलांचा या निमित्ताने आज गौरव होत आहे. फडणवीस यांच्या हातून समाजाची सेवा घडत राहो,अशा शब्दात आ.रमेश कराड यांनी भावना व्यक्त केल्या. यावेळी जनाधार संस्थेचे प्रमुख संजय कांबळे व नंदकुमार बिजलगावकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंधर्व परिवाराचे प्रमुख प्रवीण कस्तुरे यांनी तर सूत्रसंचलन बालाजी सुळ यांनी करून सर्वांचे आभार मानले.
