केंद्र आणि राज्य शासनांच्या विविध योजना
भाजपा महिला मोर्चाने गरजूपर्यंत पोहंचवाव्यात
लातूर येथील मेळाव्यात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ.चित्राताई वाघ
लातूर दि.१२ – पाच सहा महिन्यापूर्वी विरोधी पक्षात होतो त्यावेळी महिलांच्या विविध प्रश्नी मोर्चे काढले आंदोलने केली आता आपण सत्तेत आहोत हजार पटीने आपली जबाबदारी वाढल्याने केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजना गावागावात आणि खेड्यापाड्यात राहणाऱ्या गोरगरीब गरजू शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी महिला मोर्चाची आहे याची जाणीव करून देऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी जिद्दीने जोमाने काम करून महिला मोर्चाने मोठे योगदान द्यावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांनी केले.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर आणि ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस संध्याताई कुलकर्णी, उपाध्यक्ष माधुरी अदावंत, सचिव मिनाक्षी पाटील, अॅड. जयश्री पाटील, जिल्हा प्रभारी सविताताई कुलकर्णी, जिपच्या माजी उपाध्यक्ष भारतबाई साळुंखे, कल्पनाताई डांगे, उत्तराताई कलबुर्गे, सरोज वारकरी, महिला मोर्चाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखाताई तरडे, शहर जिल्हाध्यक्ष मीनाताई भोसले, प्रेरणा होनराव, ज्योती हलकुडे, लता भोसले, सुरेखा पुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यास लातूर शहरासह जिल्हाभरातील भाजपाच्या महिला पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्या सह महिला भगिनीचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी अनेक मुस्लीम भगिनींसह महिलांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घराघरात शौचालय, उज्वला गॅस, पक्की घरे देऊन मातृशक्तीचा सन्मान केला आणि कायद्याची अंमलबजावणी करून बळ देण्याचे काम केले. कोरोनाच्या काळात देश ठप्प असताना कोणीही काम धंद्यावर नसताना प्रत्येक कुटुंबाला मोफत अन्नधान्य देऊन कोरोना प्रतिबंधक लस देऊन आपल्याला जिवंत ठेवण्याचे काम केले असल्याचे सांगून सौ. चित्राताई वाघ म्हणाल्या की, राज्यातील एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार प्रत्येक घटकासाठी काम करीत आहे. महिला सुरक्षा आणि अत्याचार हा विषय महिला मोर्चाचा महत्त्वाचा असून सरकारचा तो अजिंडा आहे अशा घटना सहन करणार नाही. त्यामुळे महिलाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणी हिम्मत करणार नाही असे बोलून दाखविले.

पुढे बोलताना सौ चित्राताई वाघ म्हणाल्या की देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे विश्वगौरव नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्यात आन-बान शान असणारे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात काम करणारे कार्यकर्ते आहोत. लुंगे सुंगे नाहीत त्यामुळे भिण्याचे काही कारण नाही. राजकारणा बरोबरच जिव्हाळ्याच्या विषयावर महिलांना प्रबोधन करणे मार्गदर्शन करणे ही महिला मोर्चाची जबाबदारी असल्याचे बोलून दाखविले.
लातूरला महिला शक्ती सक्षम आहे. ज्यावेळी महिला राजकारणात नव्हत्या, घराबाहेर पडणे मुश्किल होते, राजकारण तर खूपच पुढचे होते, त्यावेळी लातूर जिल्ह्याने रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून सक्षम आणि कार्यक्षम महिला खासदार दिला. महिलांना सक्षम करण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात येते. पक्षाची खूप मोठी ताकद आहे. सर्वांना सोबत घेऊन महिलांनी सख्या आणि पक्क्या मैत्रिणी होऊन भाजपा मजबूत करण्यासाठी काम करावे आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या विजयात महिला मोर्चाने मोठे योगदान द्यावे असेही आवाहन सौ. चित्राताई वाघ यांनी महिलांना केले.

या महिला मेळाव्यात मीनाक्षीताई पाटील, भारतबाई साळुंखे, सविताताई कुलकर्णी, रेखाताई तरडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी शहर जिल्हाध्यक्ष मीनाताई भोसले यांनी प्रास्ताविकातून मेळाव्याची भूमिका विषद केली. मेळाव्याचे सूत्रसंचालन सौ. स्वातीताई घोरपडे आणि उमाताई व्यास यांनी केले. तर शेवटी ललिता कांबळे यांनी आभार मानले.