बदलांची प्रक्रिया पुरुषांपासून सुरू व्हावी
अक्का फाऊंडेशनच्या प्रोजेक्ट आनंदीचा शुभारंभ
लातूर/प्रतिनिधी:
मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये विविध गैरसमज आहेत.महिलांच्या आरोग्याशी हा विषय निगडित असून त्याकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन बदलत नाही.मासिक पाळी हा जाणीव जागृतीचा विषय आहे.महिलांच्या आरोग्यासाठी या संदर्भातील सामाजिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे,असे मत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी व्यक्त केले.
अक्का फाऊंडेशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या प्रोजेक्ट आनंदीच्या शुभारंभप्रसंगी "ती" फाउंडेशनच्या संस्थापक,आ. डॉ.लव्हेकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी मंचावर उपस्थित होते.माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या शुभारंभास खा.सुधाकरराव शृंगारे,माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर,गोविंद केंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे,दिलीपराव देशमुख, गणेशदादा हाके,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे,प्रेरणा होनराव,शैलेश लाहोटी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह डॉक्टर्स,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ.डॉ.लव्हेकर म्हणाल्या की, प्रत्येक घरासाठी हा विषय अत्यंत महत्वाचा आहे.देशातील ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते.यापैकी केवळ १५ टक्के महिलांना सॅनिटरी पॅड मिळतो. इतर महिलांनाही सॅनिटरी पॅड मिळावे यासाठी पाच वर्षांपूर्वी मी सॅनिटरी पॅड बँक सुरू केली.आज १ लाख ९ हजार ३६० महिला आणि ११८ शाळा या बँकेच्या सदस्य आहेत.दर महिन्याला प्रत्येक महिला व युवतीस या माध्यमातून १० पॅड मोफत उपलब्ध करून दिले जातात,असे त्या म्हणाल्या.

समाजात आजही स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. महिलांच्या समस्याविषयी कोणीही उघडपणे बोलत नाही. परंतु २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींसाठी स्वच्छतागृह व सॅनिटरी पॅड यासंदर्भात निर्णय घेतले.अशा विषयात बोलणारे ते देशाचे पहिलेच पंतप्रधान ठरले. महिला आमदारांनी याबाबत पुढाकार घेतला पाहिजे.या कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे आ. निलंगेकर हे पहिलेच पुरुष आमदार असल्याचे त्या म्हणाल्या.
मुलींच्या शारीरिक रचनेविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.प्रत्येक पुरुषाने याबाबत पुढाकार घ्यावा. सामाजिक बदलांची सुरुवात पुरुषांपासून व्हावी.सामान्य पुरूषांनी यात सहभाग नोंदवावा, असे त्या म्हणाल्या.

आमदार संभाजी पाटील यांनी या प्रकल्पा विषयी माहिती दिली.

आजघडीला सहावी ते बारावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या १ लाख ३८ हजार मुली जिल्ह्यात आहेत. या प्रत्येक तरुणीला मोफत पॅड पोचवले जाणार आहेत. महिनाअखेरीस घरपोच हे पॅड दिले जातील.तीन वर्षानंतर ग्रामीण भागात बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी पॅडचे उत्पादन केले जाणार आहे. जिल्ह्यातील दीड लाख भगिनींच्या आरोग्याची काळजी करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत.प्रत्येक भगिनीची काळजी घेणे हे आपले कर्तव्य असल्याचेही आ.निलंगेकर यांनी सांगितले.
पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी महिलांच्या आरोग्यासाठी या विषयात लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली. आज याकडे दुर्लक्ष केले तर भविष्यात महिलांच्या आजाराचे प्रमाण वाढू शकते,असे ते म्हणाले.

अध्यक्षीय समारोपात माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर यांनी हा विषय नाजूक असल्याचे सांगत त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे मत व्यक्त केले.परंतु या विषयाला वाचा फोडण्याची गरज आहे. मुलींसाठी काहीतरी केले पाहिजे. आपणास केवळ एकच बहीण नाही तर जिल्ह्यातील दीड लाख युवती या तुमच्या भगिनी असल्याचे आ.संभाजीराव यांना मी म्हटले.त्यांनी घेतलेला वसा पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्या सहभागाची गरज आहे,असेही त्या म्हणाल्या.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.अक्का फाउंडेशनचे कार्य दाखवणाऱ्या माहितीपटाचे सादरीकरण करण्यात आले. भाग्यश्री कौळखेरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

रेशन दुकानात मिळावेत सॅनिटरी पॅड ….
यावेळी बोलताना आ.डॉ. लव्हेकर म्हणाले की,दुर्बल घटकांसाठी आपल्याकडे रेशन दुकानातून धान्य पुरवठा केला जातो.याच पद्धतीने या घटकांसाठी रेशन दुकानातून सॅनिटरी पॅडचा पुरवठा केला जाऊ शकतो.शासनाने यासंदर्भात भूमिका निश्चित केली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

अक्का फाऊंडेशनचा पुढाकार …
प्रास्ताविकात आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अक्का फाऊंडेशनने आजवर केलेल्या कार्याची माहिती दिली.दुष्काळी स्थितीत सुरु झालेल्या फाऊंडेशनने नंतर जागतिक विक्रम करणारी शिवरायांची रांगोळी,हरित शिवप्रतिमा,यंदा शिवरायांचे तैलचित्र तसेच कोरोनाकाळात नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.