मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला पुष्प सहावे , महात्मा गांधी महाविद्यालय,अहमदपूर येथे संपन्न
लातूर दि.23 ( जिमाका ) लढ्याचे मोल कळल्याशिवाय लोकशाहीचे महत्व अधोरेखित होत नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा भारतीय स्वातंत्र्य लढ्या एवढाच अनमोल आहे.तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला की मौखिक माध्यमातून तो सर्वदूर समाजा पर्यंत पोहचतो. त्यामुळे अशा व्याख्यानमाला महत्वाचे भूमिका बजावतात असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष, साहित्यिक प्रा. जयद्रथ जाधव यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील सहावे पुष्प महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथे गुंफताना ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी,तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, विचार विकास मंडळाचे अध्यक्ष ॲड.किशनराव बेंडकोळे, जिल्हा माहिती अधिकारी मा युवराज पाटील, प्राचार्य कॅप्टन सौ. शिंदे, प्रा. निशिकांत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा. जाधव म्हणाले, हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे योगदान लातूर जिल्ह्याचे तर आहेच पण एकट्या अहमदपूर तालुक्यातील 42 स्वातंत्र्य सैनिकांचा सक्रिय सहभाग होता. त्या इतिहासाला उजाळा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले जात केले जाणे कौतुकास्पद आहे.
यावेळी प्रा. निशिकांत देशपांडे यांनीही अहमदपूर तालुक्यातील योगदान विशद करतांना दोन महत्वपूर्ण घटना सांगून तो इतिहास अधिक जिवंत केला. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी लातूरच्या प्राचीन इतिहासापासून हैदराबाद मुक्ती लढ्याच्या इतिहासापर्यंतचा लेखाजोखा मांडला. विभागीय उप अधिकारी प्रवीण फुलारी यांनी या व्याख्यानमालेमागे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांची भूमीका प्रास्ताविकातून विशद केली.ॲड.किशनराव बेंडकाळे यांनी अधिक्षीय समारोप करतांना जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेली व्याख्यानमाला विचार विकास मंडळाच्या महात्मा गांधी महाविद्यालयाची निवड केल्या बद्दल आभार मानले.