लातूर जिल्हा बँक व साखर कारखान्यांच्या वतीने ऊसतोडणी यंत्र कलश पूजन सोहळा संपन्न
लातूर : लोकनेते विलासराव देशमुख हे यांच्या दूरदृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचा विकास झाला. त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून पुढे जाणारे आपण विकासाचे वारकरी आहोत. लातूरचा विकास हेच आपले एकमेव ध्येय आहे. हे ध्येय सदैव समोर ठेवून आपण आपल्या कार्यातून लातूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने आणखी पुढे घेऊन जावूया, सहकार चळवळ आणखी मजबूत करुया, असे प्रतिपादन सहकारमहर्षी व माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांनी येथे केले. कोरडवाहू शेतकऱ्यांना ताठ मानेने जगता यावे यासाठीही आम्ही नियोजन करून नवी योजना आणत आहोत, असेही ते म्हणाले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, साखर कारखान्यांच्या आणि न्यू हॉलंड, शक्तिमान व करतार हार्वेस्टर कंपनी यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे आयोजित ऊस तोडणी यंत्राचा (हार्वेस्टर) कलश पूजन सोहळा सहकारमहर्षी व माजी मंत्री श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
लातूरचे माजी पालकमंत्री श्री. अमित विलासराव देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार व बँकेचे अध्यक्ष श्री. धिरज विलासराव देशमुख, आमदार व बँकेचे संचालक श्री. बाबासाहेब पाटील, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, श्रीशैल उटगे, सर्जेराव मोरे, विक्रांत गोजमगुंडे, यशवंतराव पाटील, गणपतराव बाजुळगे, मोईज शेख, विजय देशमुख, रवींद्र काळे, अनंतराव देशमुख, शक्तीमान कंपनीचे माणिकराव पाटील, न्यू हॉलंड कंपनीचे तुळशीदास टेंभुर्णे, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक हणमंत जाधव, प्रमोद जाधव, सपना किसवे, अनिता केंद्रे, स्वयंप्रभा पाटील , अशोक गोविंदपूरकर, अनुप शेळके, सुभाष घोडके, पृथ्वीराज शिरसाठ चांदपाशा इनामदार संभाजी सूळ, एन. आर. पाटील, संचालक, बँकेचे अधिकारी कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

श्री. दिलीपराव देशमुख म्हणाले, आमच्या सर्वांचा असा विचार आहे की, जे कोरडवाहू शेतकरी आहेत, ज्याच्या शेतात ऊस येऊ शकत नाही, ज्याच्या शेतात सोयाबीन, तुर, हरभरा अशी पिके येतात अशा शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्हाला महत्वपूर्ण पावले उचलायची आहेत. त्याचे नियोजन सुरू आहे. त्याच्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी कशी करता येईल, सहा महिने बॉयलर बंद असतो तो अधिक काळ चालावा, अशा दृष्टीने आम्ही नियोजन करीत आहोत. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना ताठ मानेने जगता येईल.
श्री. अमित देशमुख म्हणाले, लातूर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी आहे. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. ऊस तोडणी यंत्र ही काळाजी गरज आहे. मजूर मिळत नाहीत. यामुळे शेतीत यांत्रिकीकरण गरजेचे आहे. अनेक देशात 100 टक्के यांत्रिकीकरण झाले आहे. लातूरमध्येही त्या दृष्टीने दमदारपणे पावले पडत आहेत. हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणाऱ्या लातूर जिल्हा बँकेमुळे शक्य झाले, याचे कौतुक आहे. बँकेने पारदर्शकपणे कारभार केला. जिल्हा बँकेचे कार्य इतर बँका अनुकरण करतील असेच आहे. लातूरशी आमची बांधिलकी आहे. ही विलासराव देशमुख साहेबांची शिकवण आहे. तीच परंपरा, तीच शिकवण आम्ही आमच्या लोकहिताच्या कार्यातून पुढे नेत आहोत.

आमदार श्री. बाबासाहेब पाटील म्हणाले, एकेकाळी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे नव्हते, अशी आपल्या जिल्हा बँकेचे स्थिती होती. मोठ्या अडचणीत बँक सापडली होती. अशा स्थितीत विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख यांनी दूरदृष्टी ठेवून इथल्या जिल्हा बँकेची आणि इथल्या परिसराची आर्थिक स्थिती बदलली. शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणला. सहकार रुजवला. म्हणून एकत्र राहून विकासाची ही परंपरा आपल्याला पुढे कायम ठेवायची आहे. जनतेनेही विकास करणाऱ्यांसोबत, सर्वसामान्यांची प्रगती करणाऱ्यांसोबत रहावे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार श्री. धिरज देशमुख म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडे वरुणराजाच्या कृपेमुळे मांजरा धरण, जिल्ह्यातील सर्व बराज तुडुंब भरत आहेत. चांगला पाऊस असल्याने उसाची उच्चांकी लागवड आपल्याकडे होत आहे. त्यामुळे मागच्या वर्षी ऊस गाळपासाठी जाईल की नाही, ही चिंता सर्वांसमोर होती. अशा अडचणीच्या काळात ‘आपल्या शेतातील शेवटचे टिपूर जाईपर्यंत मांजरा परिवार स्वस्थ बसणार नाही’, असे सांगून सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, लातूरचे तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांनी यंत्रणा उभी केली आणि अडचणीतून मार्ग काढला. शेतकरी बांधवांना दिलासा दिला.
जिल्हा बँकेने ९१ हार्वेस्टर आणि त्यासाठी लागणारी १८० वाहने मंजूर केले आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न तर सोडवलाच. शिवाय, शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा दुहेरी आनंद आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना मदत करू, रोजगार उपलब्ध करून देऊ, अशा केवळ आम्ही घोषणा केल्या नाहीत. त्या आधी पूर्ण करून दाखवल्या आणि नंतर सगितल्या, ही आमची कामाची पद्धत आहे, असे श्री. धिरज देशमुख यांनी सांगितले.—