लातूर/प्रतिनिधी:हिंसा हाच प्रमुख आधार मानून कम्युनिस्ट विचारप्रणाली कार्य करते आणि हा विचार लोकशाहीसाठी घातक असल्याचे माधव भांडारी यांच्या लिखाणातून स्पष्ट होते. लोकशाही वाचवावयाची असेल तर भांडारी यांच्या लिखाणावर चिंतन आवश्यक आहे,असे मत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांनी व्यक्त केले.
माधव भांडारी लिखित “डाव्यांचा खरा चेहरा “ या पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. गव्हाणे यांच्या हस्ते रविवारी (दि.१६ ऑक्टोबर)संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते.मराठवाडा साहित्य मंचच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर आ.अभिमन्यू पवार,लेखक माधव भांडारी,भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, मराठवाडा साहित्य मंचचे प्रांत संयोजक प्रवीण सरदेशमुख, जिल्हा संयोजक उमेश सेलुकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.गव्हाणे म्हणाले की, माधव भांडारी यांनी एका चांगल्या विषयाला हात घातला आहे.कम्युनिस्ट विचार नेमका काय आहे ? त्याचा खरा चेहरा काय आहे ? हे त्यांनी उघड केले आहे.या बाबी सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत.कम्युनिस्ट विचारप्रणाली हिंसेवर आधारित आहे.हा विचार लोकशाहीला मारक असून हे घटक समाजासमोर यावेत,त्यांच्यावर कारवाई व्हावी, हा या लेखनामागचा हेतू आहे.भांडारी यांनी पुराव्यासह मांडणी केली असून संशोधकाला लाजवणारा हा ग्रंथ आहे.प्रत्येकाने या ग्रंथाचा अभ्यास,चिंतन व मनन केले पाहिजे.कम्युनिस्ट विचार हे लोकशाही समोरील मोठे आव्हान असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना माधव भांडारी यांनी कम्युनिस्ट पक्ष भारताबाहेरील शक्तींचा विचार करत असल्याचे स्पष्ट केले.समाजवादी समाजरचनेच्या नावाखाली कम्युनिस्ट पक्षाने मानवाधिकारांची पायमल्ली केली.हे सत्य जगासमोर मांडण्यासाठी मी लिखाण केले. त्यांनी राजकीय खोटारडेपणा केला.स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी करार करून या लढ्याचा घात केला.भारताचे तुकडे करणे हा त्यांचा मूळ हेतू आहे.भारत हे स्वतंत्र राष्ट्र नाही तर अनेक राष्ट्रांचा समूह असल्याची धारणा आजही कायम आहे.निवडणुकीत हा पक्ष पराभूत होत आहे परंतु विचार पराभूत होत नाही. पराभवाने ते आणखी बेजबाबदार झालेले आहेत.विविध यंत्रणांमध्ये प्रवेश करून देशविरोधी कारवायांसाठी त्या यंत्रणांचा वापर कम्युनिस्टांकडून केला जात असल्याचेही माधव भांडारी यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी प्रवीण सरदेशमुख यांनी साहित्य संमेलने ही राजकारणाचा अड्डा झालेली असल्याचे सांगितले.मराठी साहित्याचा, सारस्वतांचा होणारा अपमान थांबविण्यासाठी मराठवाडा साहित्य मंचची स्थापना करण्यात आलेली आहे.याच उद्देशाने यावर्षी उदगीर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभाग नोंदवला,असे ते म्हणाले.सुरेश द्वादशीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कांही दिवसांपूर्वी वक्तव्य केले.हे वक्तव्य चुकीचे आहे त्यामुळे आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना देवू नये,असेही ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमाता,सरस्वती देवी आणि अरविंद घोष यांच्या प्रतिमा व ग्रंथ पूजन करण्यात आले.प्रास्ताविक आणि उपस्थितांचा परिचय उमेश सेलूकर यांनी करून दिला. बालासाहेब केंद्रे,प्रवीण सरदेशमुख,अतुल ठोंबरे यांनी उपस्थित पाहुण्यांचा सत्कार केला.उदगीर येथील मराठवाडा साहित्य संमेलनातील विविध उपक्रमात सहभाग घेतल्याबद्दल सुनील वसमतकर,संतोष बीडकर,संजय गुरव,बबन गायकवाड,प्रदीप कुलकर्णी, गुरुदत्त महामुनी,सुरज समुखराव, मनोज भंडे,ज्ञानेश्वर सोनटक्के, योगेश साळवे, परिसंवादात सहभाग घेतलेले जेष्ठ पत्रकार अरुण समुद्रे,प्रदीप नणंदकर, अनिता येलमटे,नीता मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संतोष बिडकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. संजय गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले. दयानंद सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास शहरातील मान्यवर नागरिक, विद्यार्थी,शिक्षक-पालक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.