लातूर दि ११( माध्यम वृत्तसेवा )-
सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या अस्मानी संकटाने उध्वस्त झालेल्या बळीराजाला मदत करण्यासाठी दर हेक्टरी १३ हजार ६०० रुपये अनुदान देणार असलेल्या घोषणाचा अक्षरश: पाऊस पाडला . परंतु बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांना चार-दोन हजाराची तुटपुंजी मदत प्रत्यक्षात केल्याने केवळ गाजराचीच उगवण झाल्याचे वास्तव चित्र दिसत असल्याची घणाघाती टीका शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केली .
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला असून अतिवृष्टीच नव्हे तर गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि संततधार अशा नैसर्गिक संकटात बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे . येणारी दिवाळी त्याच्यासाठी दिवाळी नसून त्याच्या संसाराचे दिवाळे काढणारी ठरु नये, अशी भीती निर्माण झालेली आहे .
मोरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता गत वर्षी झालेल्या अतिवृष्टी अनुदानासाठी
तत्कालीन पालकमंत्री अमित देशमुख यांच्या पाठपुराव्याने तब्बल ४३९ कोटी ७० लाख रुपयाची भरघोस मदत प्रशासनाला सूचना करून सर्व शेतकऱ्यांना सरसगट मदत दिल्याची आठवण शेतकरी करीत असल्याचे दिसून येत आहे .
यावर्षी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे अद्याप जिल्ह्यात आलेच नाहीत तेव्हा मदतीची अपेक्षा कशी आणि कोणाकडे करावी असा प्रश्न राजेंद्र मोरे यांनी विचारला आहे .
खरतर सरकारने तीन हेक्टर पर्यंत प्रत्यक्ष मदत करण्याचे जाहीर केले होते . त्यावेळी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या . आपल्या पिकांची नुकसान भरपाई निश्चित मिळेल परंतु लातूर जिल्ह्यासाठी फक्त १३० कोटी ३४ लाख एवढीच तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला अक्षरश:
पाने पुसण्याचे काम या सरकारने केल्याचे दिसून येत आहे .
जिल्ह्यातील विविध तालुक्यात अतिवृष्टी गोगलगाई व संततधार अशा नैसर्गिक संकटातील मदत हि लातूर तालुक्यासाठी २० कोटी ५७ लाख ७९ हजार , रेणापूर ३ कोटी ६५ लाख , शिरूर अनंतपाळ २ कोटी ८७ लाख ५६ हजार , उदगीर ७ कोटी ११ लाख २० हजार , अहमदपूर ७ कोटी ६१ लाख , देवणी २ कोटी ७७ लाख ५६ हजार , जळकोट फक्त १ लाख ५७ हजार तर औशासाठी ५१ कोटी १७ लाख आणि निलंगा ३४ कोटी ३१ लाख अशी अतिशय तुटपुंजी मदत करतानाच चाकूर सारख्या तालुक्याला एका दमडीची ही मदत केली नसल्याचे आकडेवारी नुसार दिसून येत आहे .


एकंदरीत गतवर्षाचे पालकमंत्री अमित देशमुख आणि विद्यमान पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यातील आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याप्रती असलेल्या भावनाची तुलना शेतकरी करीत आहेत .
सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रसिद्धीपत्रकातून शेतकरी नेते राजेंद्र मोरे आणि निराधार संघर्ष समितीचे राजीव कसबे यांनी दिला आहे .