सांस्कृतिक कार्य विभागाच्या “सावळ्या विठ्ठला” या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद
संगीतकार दशरथ पुजारी यांना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना
नांदेड, दि.१० एप्रिल:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर रचनांचा “सावळ्या विठ्ठला” या विशेष सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ९ एप्रिल रोजी कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमास नांदेडकरांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना मिळाली.या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक श्री. गोविंद नांदेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संगीतकार दशरथ पुजारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जगी ज्यास कोणी नाही , देव माझा विठू सावळा , झिम झिम झरती श्रावणधारा ,क्षणभर उघड नयन देवा , अशीच आमुची आई असती , अजून त्या झुडपांच्या मागे ,त्या सावळ्या तनुचे अशी व अजूनही अवीट गोडीची गाणी शेफाली कुलकर्णी ,सागर जाधव आणि वर्षा जोशी यांनी गायली . संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी तर होतेच पण संगीतकार दशरथ पुजारी यांच्या शिष्या संगीतकार आनंदी विकास यांनी त्यांच्या काही गाण्यांचे ,पुजारीजी यांच्या सहवासातून अनुभवलेले काही आठवणीतील किस्से सांगून सभागृहात वेगळ्याच आनंद लहरी निर्माण केल्या .

प्रत्येक वादकानी अतिशय कसून आणि अभ्यासपूर्ण अशी साथ गायकाना दिली वादकांच्या मध्ये विकास देशमुख , विवेक कयाळ ,विश्वेश्वर जोशी ,भगवानराव देशमुख , पंकज शिरभाते ,श्रीनिवास ,नईम शेख व इस्माईल शेख साथीला होते ..या कार्यक्रमातून अभंग, भक्तीरचना , भावगीते या सादरीकरणांद्वारे संगीतकार दशरथ पुजारी यांच्या जीवनकार्याचा व विचारांचा वेध घेण्यात आला. “सावळ्या विठ्ठला” या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, भक्ती ,भाव यांचा सुंदर संगम साकारण्यात आला.

या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत कलावंतांचा सत्कार करण्यात आला आणि सांगीतिक कार्याच्या परंपरेचे महत्त्व दिले गेले. कार्यक्रमाते गायक कलाकारांनी सादर केलेल्या अभंग व भजनांनी , भावगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.या कार्यक्रमात रसिक नंतर एवढे मंत्रामुग्ध झाले कि अनेक दर्जेदार गाणी सादर करणाऱ्या गायक गायिका यांच्या अभंगावर रसिकांनी ठेका धरत विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषणे संपूर्ण सभागृह भक्तीमय झाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. श्री. ॲड. आशिष शेलार यांच्या यांच्या संकल्पनेतून व तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.नांदेड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड हे कार्यक्रमास पूर्णवेळ उपस्थित होते..सूंदर सादरीकरण, प्रभावी रंगमंच व्यवस्था, सभागृह परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्मिती व अचूक नियोजनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नांदेड मध्ये अध्यात्मिक वर्ग, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, तरुण वर्ग व इतर सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

oooooo




