विक्रम काकाना साधारण साडेतीन वर्षांपासून खूप जवळून पाहता आलं.. अनुभवता आलं.. अभिनेता म्हणून ते काय ताकदीचे होते. हे जगाने पाहिलं.. आज त्यांना या व्यासपीठावर काका म्हणतेय कारण त्यांनीच मला त्यांची पुतणी बनवून घेतली होती. पण मी शेवटपर्यंत त्यांना काका म्हणू शकले नाही.. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर असल्याकारणामुळे मी त्यांना कधीच काका म्हणायला धजावले नाही.
आज मात्र त्यांना काका म्हणायचं धाडस करतेय.
चित्रपट महामंडळाच्या कामामुळे मला त्यांच्या घरी कित्येकदा जाण्याचा योग आला. तिथे गेल्यावर वेळ काळ विसरून गप्पा झाल्यात. वृषाली मॅडमच्या हाताचं सरबत, ज्यूस, चहा, कॉफी चा आस्वाद घेतलाय.. काकांच्या ऑफिसमध्ये जाऊन मस्त गप्पांचा फड रंगवलाय… त्यांच्या ऑफिसमध्ये एक फोटो आहे. त्यांच्या वडिलांचा. जिथे चंद्रकांत गोखले डॉ अब्दुल कलामांना अगदी वाकुन नमस्कार करताहेत.. तो फोटो बघून मला आश्चर्य वाटल्यावर काकांनी मला त्यावर फार छान माहिती सांगितली होती..


खरंतर चंद्रकांत गोखले यांच्या आई, स्वतः चंद्रकांत गोखले आणि विक्रम गोखले या तिन्ही पिढ्यानी त्यांची सामाजिक बांधिलकी जपत बरंच काम केल आहे. नुकतीच विक्रम गोखले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला जागा देऊ केली आहे.
मागे एकदा रात्री अचानक त्यांचा कॉल आला. आणि म्हणाले अश्विनी ते मेघराजबद्दल नक्की काय सुरु ए गं… मी त्यावर झालेली घटना त्यांना सांगितली. अगदी उत्स्फूर्तपणे त्यांनी मेघराज सरांना पाठिंबा देत त्यांच्याबद्दलच्या भावना बोलून दाखवल्या..
साधारण तीन महिन्यांपूर्वी भाजपा च्या सांस्कृतिक सेल द्वारा एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्या बक्षीस वितरणासाठी विक्रम गोखलें ना बोलावशील का असा शैलेश चा कॉल आला. म्हटलं बोलते काका ना. काका ना कॉल केला आणि माहिती सांगितली.
शैलेश ला घेऊन काकांच्या घरी गेले. त्याने सगळी माहिती दिली. कार्यक्रमाची वेळ, तारीख ठिकाण सगळं ठरलं. आणि त्यांना कार्यक्रमाला न्यायची आणि पुन्हा घरी परत सोडवायची जबाबदारी काकांनीच मला दिली.
कार्यक्रमादिवशी काही मान्यवरांसह घरी गेलो. त्यांना अगदी हाताला धरून सोबत घेतलं… अगदी कार्यक्रमभर त्यांचा मोबाईल माझ्या ताब्यात… या कार्यकमाच्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं कि, माझी चित्रपट महामंडळातील मैत्रीण अश्विनी तिने मला या कार्यक्रमाबद्दल विचारणा केली आणि मी तिला लगेच होकार दिला.. माझ्यासाठी हा अगदीच आश्चर्याचा धक्का होता.. काकानी एव्हढ्या मोठ्या व्यासपीठावर माझं नाव घेत मला धक्का दिला होता..

कार्यक्रम संपल्यावर पुन्हा गाडीत बसवेपर्यंत ते माझा हात धरून होते. माझ्या लातूरची मंडळी आहेत सर त्यांना फोटो काढायचा आहे तुमच्या सोबत असं सांगितल्या क्षणी आमच्या लातूरच्या अनेकांसोबत त्यांनी अगदी आनंदाने फोटो काढले…
परत जाताना मात्र का कोण जाणे ते मरणाबद्दल बोलू लागले. माझ्या आयुष्यात नुकतच मृत्युंच तांडव झाल होत. वडील गेले होते. मी अगदी पटकन त्यांना म्हणाले काका plz नका न बोलू असं. त्यावर त्यांनी त्यांच्या शारीरिक अडचणी सांगितल्या. पण का कोण जाणे ते पचणी पडत नव्हतं.. काकांना घरी पोचवल्यावर काकू अगदी शॉक मध्ये म्हणाल्या, अरेच्चा तू इतक्या लवकर परत आला?? थांब आता तुझी आरती च ओवळायला हवी. त्याक्षणी मी नि काका एकमेकांकडे बघत इतक्या मोठ्याने हसलो कि काकू दचकल्याच. काका एकदम मला म्हणाले, बघ तुला सांगितलं होत न वृषाली काय म्हणणार ते. करणं आम्ही लिफ्ट मध्ये जाताना च काका मला म्हणाले होते कि काकू काय म्हणतील ते आणि नेमक तेच झालं.

मधल्या काळात त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली खरी .. पण तसे असले तरी विक्रम गोखले ‘अभिनयात बाप’ होते हे कोणीही नाकारणार नाही..
माझ्यासह अनेकांनी त्यांच्या अभिनयावर कायमच प्रेम केल. या सगळ्यात सुदैवाने माझ्या वाट्याला एक उत्तम माणूसच आला…
गेले चार दिवस त्यांच्या मृत्युंच्या येणाऱ्या बातम्या बघून हा सगळा पट डोळ्यापुढून सरकत होता. केवळ याच नाही तर आणखीन कित्येक आठवणी आता भरल्या डोळ्यासमोर येत आहेत.
मी स्वतःला नशीबवान समजते कि इतक्या ग्रेट अभिनेत्याशी माझा वारंवार आणि इतका छान संवाद होत गेला.. या आठवणी आणि हा ‘बाप अभिनेता’ कायमच समरणात राहील.
विक्रम काकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

अश्विनी कोळेकर ,पुणे