समृद्ध महाराष्ट्र
घडवणारा अर्थसंकल्प
कोरोना, नैसर्गिक आपत्ती यामुळे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या संकटांशी समर्थपणे सामना करीत आज महाविकास आघाडी सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासाचा वेध घेणारा आणि त्यातून ‘समृद्ध महाराष्ट्र’ घडवणारा अर्थसंकल्प सादर केला. दूरदृष्टी ठेऊन व सर्व घटकांचा संवेदनशीलतेने विचार करून त्यांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे.

कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण, उद्योग ही पंचसूत्री आणि विविध घटकांसाठी अर्थसंकल्पातून जाहीर केलेल्या महत्वपूर्ण योजना या राज्याच्या विकासाची रेष मोठी करणाऱ्या आहेत. शेतकरी बांधवांना लाभदायक ठरतील, अशा अनेक योजना या अर्थसंकल्पात आहेत. नियमित कर्जफेड करणाऱ्या राज्यातील 20 लाख शेतकरी बांधवाना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेततळ्याच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याबरोबरच कापूस व सोयाबीन पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी १ हजार कोटीचा निधी दिला जाणार आहे. अशा वेगवेगळ्या योजना शेतकरी बांधवांना विकासाच्या दिशेने पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला, सफाईसाठी गटारीत उतरणारे कर्मचारी यांच्यासाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयातून सरकारच्या संवेदशीलतेचे दर्शन होते. सीएनजीचे दर कमी करणे, इ- वाहनांसाठी चार्जिंग सेंटर उभारणे, एसटी महामंडळाच्या ताफ्यात पर्यावरणपूरक बस आणणे हे निर्णयही तितकेच महत्वपूर्ण व स्वागतार्ह आहेत.
- धिरज विलासराव देशमुख, आमदार, लातूर ग्रामीण