- शरद काटकर, नांदेड
“उत्तराखंडमधील पितूरगड या गावात माझा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षापर्यंत माझं पालन-पोषण आई-वडिलांनी केलं. मी तृतीयपंथीय असल्याचं समजताच नंतर मात्र त्यांनी मला न स्वीकारता महाराष्ट्रातील नांदेडमध्ये ‘गौरी बकस’ या माझ्या गुरूंकडे आणून सोडलं. या वयात मला काहीच कळत नव्हतं. पहिल्यांदाच मी आई-वडिल घरातील सदस्यांना सोडून राहत होते. माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. खायचं, प्यायचं आणि झोपायचं हेच करत होते. माझ्यावर आई-वडिलांचं खूप प्रेम होतं. पण, समाजात त्यांचीही काही किंमत आहे. माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या समाजात आले, असं म्हणणंही चुकीचं ठरू नये,” असं तृतीयपंथीय सेजल सांगत होती.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील आपले सरकार सेवा केंद्र (सेतू सेवा केंद्र) नुकतंच सेजलकडे हस्तांतरित करण्यात आलं आहे. आत्तापर्यंतचा प्रवास सेजल उलगडून सांगत होती.
सेजल म्हणते, आई-वडलांवर माझा कोणताही आक्षेप नाही. त्यांच्यामुळे हे जग पाहाते आहे. ते माझे जन्मदाते आहेत. साहजिकच त्यांची नेहमीच आठवण येते. रस्त्याने लेकराबाळांना त्यांच्या आई-वडलांसोबत जाताना पाहून मला पप्पांची आठवण येते. एकेकाळी माझे पप्पाही मला शाळेतून आणायचे, सोडायचे. दिवाळी, दसरा सणाच्या दिवशी जास्तच भरून येतं. घरी असताना आम्ही एकत्र पूजा करायचो. सगळं आठवलं की डोळे भरून येतात. एकटी असते तेव्हा अश्रुंना वाट मोकळी करून देते, गुरूंशीही बोलते. यावेळी गुरू मला समजावतात. त्या म्हणतात, “तुझी, आई, वडिल, बहिण, भाऊ मी आहे. तू सगळं काही माझ्यात बघं, मी तुला सगळं प्रेम देईल.” हे सगळं समजून घेत, सगळ्याशी जुळवून घेत पुढे चालत राहिली आहे. ती सांगते, “आई-वडिल हे आई-वडिलच राहतात. गुरूही तितकाच जीव लावतात. आईसारखंच सगळं काही विचारतात.”

पुढे सेजल तृतीयपंथीयांमधल्या प्रथा, परंपरेविषयी सांगत असते. ती म्हणते, “पुढे मला आमच्या गुरू-शिष्यांच्या परंपरेविषयी माझ्या गुरूंनी सांगितलं. त्यांनी नातेसंबंध सांगितले. गुरूभाऊ कोण, चेला कोण? मोठ्यांना कसं बोलावं, तुम्ही जसं कोणी आल्यावर नमस्ते करता, तसं आमच्यात सलाम दुआ असते. हे सगळं मी शिकत गेले. यावेळी मला ब-याच अडचणीही आल्या. गुरूंनी मला एकच शिकवलं, बाळा आपण किन्नर आहोत. सगळ्यांचं भलं करायचं. सर्वांना आशीर्वाद द्यायचा. सगळ्यांचा चांगलाच विचार करायचा. वाईट कधी बोलायचं नाही. कोणाकडून बोलून घ्यायचं नाही. हे सतत गुरू शिकवतात. एक दिवस मला बाहेर पडावं लागलं. भिक्षा मागण्यासाठी मी जात होते. भिक्षा मागताना कुणी चांगला वागतं. तर कधी वाईट प्रसंगालाही तोंड द्यावं लागतं. लोक कसंही बोलतात. कोणी तुच्छ नजरेने बघतात. ‘ए मी तुला काही देणार नाही, कशाला द्यायचं,’ असं म्हणून हकलून लावत. या प्रत्येक प्रसंगाला तोंड देत आज इथंपर्यंत आले. हे सांगतानाच सेजलला अश्रू अनावर झाले.
तृतीयपंथीयात आली तरी सेजलला शिकायचं होतं.

- लहानपणापासूनच तिला शिक्षणाची आवड होती. सेजल सांगते, मी गुरूंना विचारलं की मी तृतीयपंथी आहे. पण, मी शिकू शकत नाही का? मला पुढे जायचं आहे. मला काम मिळालं नाही तरी मला चांगलं जीवन जगायचं आहे. मला तुम्ही शिकवाल का? तेव्हा गुरूंनीही तिला शिकवायची तयारी दाखवली. दहा वर्षांच्या सेजलला नांदेडमधील एका शाळेत दाखल केलं गेलं. सेजलने अभ्यासात चुणूक दाखवली आणि दहावीला ७२ तर बारावीला ८२ टक्के गुण तिने मिळवले. या प्रवासातही खूप अडचणी आल्याचं ती सांगते. शाळा, कॉलेजमध्ये आजूबाजूच्यांच्या नजरा चांगल्या नसायच्या. डब्बा खायलाही तिच्यासोबत कुणी बसायचं नाही. सर, मॅडम सोबतचे सहकारी यांच्यामुळे खूप अडचणी आल्या. ते माझ्याशी असं का वागतात? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. मला अजून पुढे जायचं होतं. पण, समाजाने मला स्वीकारलं नाही. त्यामुळे बी.कॉमपर्यंतचं शिकले. सेजल सांगत होती.

ती म्हणते, काही लोक आम्हाला देव समजतात तर, काहीजण तुच्छ लेखतात. लोकांनी आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. आमचा समाज आता पुढे येत आहे. आमच्या समाजातील काही लोक इतर समाजाचेही कल्याण करत आहेत. लॉकडाऊनमध्ये आम्ही अन्नदान केलं. आम्ही चांगलं काम केलं. समाजाला काय वाटतं माहित नाही. यात प्रतिसाद देणारे पण होते, न देणारे पण होते. किन्नर असून ही समाजात आपलं नाव व्हावं असं स्वप्न होतं असं सेजल सांगते.

एक दिवस मी माझ्या गुरूंसोबत नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी गुरूंना विचारले, तुमच्याकडे कुणी शिक्षण घेतलेलं आहे का? तेव्हा गुरूंनी सांगितले हो म्हणून. जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर म्हणाले, ‘तुम भीख क्यों मांगते हो? तुमको रोजगार दिया तो कर सकोगे?, असं त्यांनी विचारताच आम्ही होकार दिला. त्यांनीही ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू सुविधा केंद्र) चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. यात कमल फाऊंडेशनची खूप मदत झाली. त्यांनी पुढाकार घेऊन यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याची पूर्तता करून घेतली.
अखेर तो आनंदाचा क्षण येऊन ठेपला. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी दिनी १५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मला प्रदान केलं. माध्यमांमधून ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. आई-पप्पांनाही मिडीयातूनच कळलं. तोवर मी कधीच त्यांच्याशी संपर्क केला नाही. त्यांचा नंबरही माझ्याकडे नव्हता. त्यांनी माझा मोबाईल नंबर मिळवला आणि पप्पांनी मला फोन केला. माझी विचारपुस केली. मी त्यांना सगळं सांगितलं. यावेळी त्यांच्या फोनमुळे माझं मन भरून आलं होतं. मी जिंकले असं सारखं वाटत होतं. मी अशी राहूनही आई-वडिलांचं नाव कमवलं. असं सेजल म्हणाली.
‘आपले सरकार सेतू केंद्र’ चालवताना सुरुवातीला अडचणी आल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक सोलापूरे मॅडम यांची वेळोवेळी मदत घेतली. पंधरा दिवसात बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला कर्मचारी ज्या पद्धतीने वावरतात त्याच पद्धतीने मी वावरते. त्यांचेच स्वच्छतागृह मी वापरते. या ठिकाणच्या महिला कर्मचाऱ्यांचा मला पाठिंबा मिळतो. माझ्याकडे त्या स्त्री भावनेतून पाहतात. तेव्हा खूप चांगलं वाटतं असे सांगण्यासही सेजल विसरत नाही.
सेजल म्हणते, “आपले सरकार सेतू केंद्र’ मिळाल्याने माझं आयुष्यच बदललं आहे. मी एक तृतीयपंथीय आहे. ते माझं आयुष्य मला जगावंच लागेल. ते मी जगत आहेच. पण, दुसरं हे जे आयुष्य नव्याने मिळालेल्या जबाबदारीचं आहे तेही उत्तम जगणार आहे. शिक्षण घेतल्यामुळे माझा फायदा झाला.”
आमचा दिनक्रम सकाळी सहाला सुरू होतो. इतरांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांना आशीर्वाद देतो. हे काम सुरूच ठेवूनच सेतू केंद्राला वेळ देणार आहे. समाजाला मी सोडू शकत नाही. या लोकांमुळेच मी आज उभी आहे. सकाळी भिक्षा मागून मी सेवा केंद्रात येते. आता पहिल्या सारखं आयुष्य राहिलं नाही. आता मी ‘सेलिब्रिटी’ झाले आहे. कधी लोक मला कार्यक्रमासाठी त्यांच्या गाडीतून घेऊन जातात. सगळे जण चांगले बोलतात. चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोक सेवा केंद्राला, घरी येऊन भेट देत आहेत. आम्ही पण, तुमच्या सारखेच माणूस आहोत. इतर स्त्री पुरुषांप्रमाणेच आम्हाला सन्मान द्या आणि घ्या, एवढीच अपेक्षा सेजल समाजाकडे व्यक्त करते.
नवीउमेद #नांदेड
लेखन : शरद काटकर
( सौजन्य : नवी उमेद )