इचलकरंजी/प्रतिनिधी –
वस्त्रोद्योगासह इचलकरंजीचा वाढत चाललेला औद्योगिक पसारा आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता इचलकरंजी तसेच हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांसाठी इचलकरंजीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय व्हावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भातील प्रस्ताव तयार करुन त्याची कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. त्यामुळे बर्याच वर्षापासून असलेली मागणी पूर्ण होऊन लवकरच इचलकरंजीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिरोळ तालुक्यात औद्योगिक विस्तार वेगाने होत चालला आहे. शिवाय वाहनांची संख्याही वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनांच्या एकूण संख्येपैकी जवळपास 50 टक्के वाहने हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांमध्ये आहेत. या सर्व वाहनांच्या पासिंग, रजिस्ट्रेशनसह अन्य कामांसाठी इचलकरंजी शहर परिसरातील वाहनधारकांना कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात येज-जा करावी लागते. एकाचवेळी काम होईल याची शाश्वती नसल्याने वाहनधारकांना हेलपाटे मारावे लागत असल्याने वेळ वाया जाण्यासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यांसाठी इचलकरंजीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याबाबत आपण प्रदीर्घकाळापासून शासन दरबारी प्रयत्नशील होतो. आरटीओ कार्यालय इचलकरंजीत सुरू करण्याचा निर्णय अंतिम टप्यात असतानाच इचलकरंजीला डावलून ते अन्य ठिकाणी सुरु करण्यात आले. परिणामी येथील वाहनधारकांना कोल्हापूर आरटीओ कार्यालयावरच विसंबून राहावे लागत आहे.
जिल्ह्यात कोल्हापूरनंतर इचलकरंजी शहर सर्वात मोठे शहर आहे. शिवाय हातकणंगले व शिरोळ या दोन तालुक्यांतील वाहनांची संख्या मोठी असून या भागात औद्योगिक वसाहतींमुळे वाहनांच्या संख्येत वाढच होत आहे. वाहनधारकांना कोल्हापूरला ये-जा करणे त्रासदायक ठरत असल्यामुळे इचलकरंजी येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री महोदयांना सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या संदर्भातील प्रस्ताव तातडीने तयार करुन तो कार्यवाहीसाठी पाठविण्याबाबत संबंधितांना आदेश दिले. त्यामुळे प्रदीर्घकाळापासून प्रलंबित मागणी पूर्ण होऊन लवकरच इचलकरंजीत स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.