प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन
कोल्हापूर ता. १७ महाराष्ट्राचा समाजकारण व राजकारणामध्ये सात दशकाहून अधिक काळ प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे योगदान अनमोल स्वरूपाचे आहे. संपूर्ण आयुष्य रस्त्यावरील लढ्यात व्यतीत करणारे एन.डी.सर तेवीस वर्षे आमदार होते. विधानसभेचे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते,सरकारच्या समन्वय समितीचे अध्यक्ष ,विविध खात्यांचे मंत्रीपद त्यांनी भूषविले.त्यांची नाळ सदैव सर्वसामान्य माणसांशी जुळलेली होती.सत्ताधाऱ्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही एक प्रकारचा नैतिक धाक त्यांच्याबाबत वाटायचा. त्याच पद्धतीने सर्व समस्यातून निश्चितपणे मार्ग काढू शकतील असा एन.डी. सरांबाबत विश्वासही सर्वांना वाटत होता. त्यामुळेच त्यांनी केलेली सर्व आंदोलने यशस्वी ठरली.महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर आपला दीर्घकालीन ठसा उमटवणारे एक दुर्मिळ आणि बुलंद व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. सामाजिक न्यायाचे आग्रही असलेल्या एन.डी.नी सुदृढ वैचारिक अधिष्ठानाचे समाजकारण व राजकारण केले.या दीर्घ वाटचालीत एन.डी. सरांना त्यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई यांनी दिलेली साथ अत्यंत महत्त्वाची आहे. माईनी एन.डी.या प्रेरणामागील प्रेरणा होण्याची भूमिका मोठ्या ताकदीने निभावली ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

ते राजर्षी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज (कोल्हापूर ) येथे प्रा. डॉ.एन. डी. पाटील यांच्या दहाव्या मासिक स्मृतिदिनी ‘ प्रा.डॉ.एन.डी.पाटील : व्यक्तित्व व कर्तुत्व ‘ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.डी.कदम होते. मंचावर उपप्राचार्या डॉ.एस जे. आवळे , ग्रंथालय समितीचे सचिव प्रा.एस. टी.लोखंडे होते.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.लोखंडे यांनी करून दिला.
प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले ,एन.डी.पाटील हे ज्येष्ठ विचारवंत, शिक्षण तज्ञ महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी- प्रबोधन -विज्ञानवादी — विवेकवादी चळवळीचे नेते होते ,शेतकऱ्यांचे -वंचितांचे -कष्टकऱ्यांचे -सर्वहारा वर्गाचे तारणहार होते. समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य असलेले एन.डी. सर अखेरची अकरा वर्षे अध्यक्षही होते.सर्वांगीण समतेसाठी आयुष्य व्यतीत करणारे महान कृतिशील प्रज्ञावंत म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा आणि न्याय मिळवून देणारा एक योद्धा त्यांच्या निधनामुळे आपण दहा महिन्यांपूर्वी गमावला आहे.ही कधीही भरून न येणारी हानी आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी एन. डी. सरांचे समाजकारण, राजकारण ,विविध आंदोलने एकूणच त्यांचे व्यक्तित्व व कार्यकर्तृत्व यांचा सखोल आढावा घेतला.
अध्यक्षीय स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. एल.डी.कदम म्हणाले,प्रा.डॉ.एन.डी.पाटील हे कृतिशील विचारवंत होते.वंचितांचा सर्वात प्रखर व प्रभावी आवाज म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात बजावलेली भूमिका अतिशय महत्वाची आहे.त्यांच्या व्यक्तीत्वामधील विविध पैलू समजून घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे. आभार यांनी मानले.सूत्रसंचालन यांनी केले.या व्याख्यानास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .आभार प्रा.डॉ.बी.बी.घुरके यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती एस.डी. मुरकर यांनी केले.