शाश्वत समाजासाठी गांधी विचारांची आणि सर्वसमावेशकतेची गरज
एमजीएम विद्यापीठात ‘गांधी आज: शाश्वत समुदायांचा शोध’ आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत तज्ञांची भावना
औरंगाबाद ;( विशेष प्रतिनिधी )–
महात्मा गांधी हे सर्वसमावेशक आणि वैश्विक होते. कोणत्याही जाती धर्म, लिंगभेद, उच्चनिच आदींच्या कक्षेबाहेर होते आणि लोककल्याण हेच त्यांचे अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट होते. गांधीजींच्या नैतिक मुल्यांसोबत त्यांच्या विचारांना आचरणात आणून सर्वसमावेशक समाज घडवता येईल, अशी भावना एमजीएम विद्यापीठात आयोजित बहुशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ञांनी व्यक्त केली.
एमजीएम विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालय, गांधी अभ्यास विभाग तसेच फ्रांसमधील गांधी इंटरनॅशनल अँड कम्युनिटी ऑफ आर्क, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान वर्धा आणि गुजरात विद्यापीठ अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी बहुशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘गांधी आज: शाश्वत समुदायांचा शोध’ (Gandhi Today: A Quest for Sustainable Communities’ असा या आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय असून यात जगभरातील तज्ञ आणि अभ्यासक सहभागी झाले आहेत.

शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०२३ रोजी उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून प्रसिध्द लेखक अशोककुमार पांडे उपस्थित होते. अमेरिकेतील पोर्टलॅंड कम्युनिटी कॉलेजचे प्रोफेसर डॉ. मायकल सोनलाईटनर, फ्रांस येथील गांधी इंटरनॅशनलचे सचिव ख्रिस्तोफी ग्रीग्री, अमेरिकेतील जमनालाल बजाज मेमोरिअल लायब्ररी अँड रिसर्च सेंटर सेवाग्रामचे संचालक डॉ.सीबी जोसेफ, काँगो येथील डॉ.एरीक कुमेदीसा, युनिसेफचे डॉ.जेम्स अर्पूथराज विलियम्स, केरळ विद्यापीठातील प्रोफेसर जोसुकुट्टी सी.ए, बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचे वकील लुबना यास्मिन,नेपाळ येथील गांधी पीस फाउंडेशनचे अध्यक्ष अर्जुन थापा, इंडिया पिस सेंटर नागपुरचे अँजिलीस मायकल, अम्रान मन्सूर, अबूबकर मोहम्मद, मेंढा लेखाचे देवाजी तोफा, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, कुलसचिव डॉ.आशिष गाडेकर आदी उपस्थित होते. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या चमूने सुरुवातीला सांगितीक गांधीवंदना सादर केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

उद्घाटनीय सोहळ्याचे प्रमुख वक्ते अमेरिकेतील पोर्टलॅंड कम्युनिटी कॉलेजचे प्रोफेसर डॉ. मायकल सोनलाईटनर म्हणाले, महात्मा गांधी हे सर्वसमावेशक आणि वैश्विक होते. कोणत्याही जाती धर्म, लिंगभेद, उच्चनिच आदींच्या कक्षेबाहेर होते आणि लोककल्याण हेच त्यांचे अंतिम ध्येय आणि उद्दिष्ट होते. जग आज अनेक समस्यांना सामोरे जात आहे. हवामान बदल ही सध्याची आणीबाणी आहे आणि जगातील कुणीच निसर्गाशी अनुरुप वागताना दिसत नाही. महात्मा गांधींना हे तेव्हा कळाले होते. आपण सर्वांना अन्न मिळावे यासाठी आपल्या योजना बदलू शकतो. परंतु हवामान किंवा वातावरण बदलू शकणार नाही. भारत, चीन, बांगलादेश एकत्र आले तर पर्यावरण बदलावर उत्तम कार्य करू शकतात.आपल्याला जशी जाणीव होते तसे वागायला हवे. आपल्या नातू-पणतूंच्या पिढ्यांच्या आपल्या वागण्यातून विचार व्हायला हवा. सध्या जगाची लोकसंख्या ८ अब्जांवर पोहोचली आहे आणि अशा काळात गांधींच्या विचारांमधून निर्माण झालेली शाश्वतता अत्यंत महत्वाची आहे. जगात एकीकडे प्रचंड समृद्धी आहे तर दुसरीकडे दुर्भिक्ष्य. केवळ ६२ धनाढ्यांकडे जगभरातील ४ अब्ज लोकांइतकी संपत्ती आहे. श्रीमंत-गरीबीतील हे अंतर दूरगामी परिणामकारक असून अशी ही परस्परविरोधी परिस्थिती सर्वांसाठीच घातक आहे. यासाठी महात्मा गांधी यांची शाश्वत विचारसरणी करून त्यावर कृती करण्याची गरज आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध लेखक अशोककुमार पांडेय यांनी ‘गांधीचे राम आणि हिंदुत्वाचे राम’ या अनुषंगाने मांडणी केली. पांडेय म्हणाले, महात्मा गांधी यांचा विचार हिंसात्मक नव्हता तर तो सर्वसमावेशक होता. राम आणि रावणातील युद्ध हे रावणाच्या अहंकारामुळे झाले. पण, यात नष्ट रावणच झाला. रामाने त्यावेळी हिंसेचा मार्ग नव्हता स्वीकारला. महाभारताचे युद्ध दुर्योधनाच्या अहंकारामुळे झाले आणि त्यात दुर्योधनच नष्ट झाला. महात्मा गांधी यांची धार्मिकता आणि राष्ट्रवादाची संकल्पना अन्य कोणत्याही धर्माला डावलणारी नव्हती. त्यांची सर्वोदयाची संकल्पना ‘सर्वे संतू निरामय’ची होती आणि तीच खरी भारताची संकल्पना होती. संगणक आणि तंत्रज्ञानासोबत वाढलेल्या पिढ्या भलेही तंत्रज्ञानात पारंगत झाल्या असतील पण त्या इतिहासापासून दूर गेल्या. त्यामुळेच २०१४ नंतर इतिहासासोबत प्रचंड छेडखानी सुरू झाली. पं.जवाहरलाल नेहरूंचे आजोबा मुस्लिम होते, अशी मांडणी केली जाते. त्यांचे आजोबा कोण होते याने काय फरक पडतो. मोहम्मद अली जिनाचे आजोबा हिंदू होते हे संपूर्ण पाकिस्तानला ज्ञात आहे. ज्यास हिंदूराष्ट्र म्हटले जाते ते हिंदूचे राष्ट्र नव्हे तर त्याची प्रेरणा हिटलर किंवा जिया उल हकशी मिळतीजुळती आहे. हे एक हिंदू पाकिस्तान बनवण्याची तयारी आहे आणि यात महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, भगतसिंग सर्वांत मोठा अडथळा ठरतात.कारण त्यांची भूमिका सर्वसमावेशक होती. गांधी केवळ खादीचे कपड्यांपूरते मर्यादित नाहीत तर ते विचार आचारातून झळकायला हव्यात. गांधींच्या नैतिकतेची चर्चा करतो तेव्हा आपण आयडिया ऑफ इंडियाची चर्चा करायला हवी. या बहुभाषिक, बहुधार्मिक देशात जर सर्वसमावेशकतेची बाब आकारास येणार नसेल तर ही गोष्ट केवळ हिंदू मुस्लिमपुरती मर्यादित राहणार नाही तर पुढे प्रदेश, लिंग द्वेषापर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार नाही. गांधी आणि गांधी विचारांची आज आपल्याला भारत एक राष्ट्र आणि समाज म्हणून शाश्वत बनवण्यासाठी अत्यावश्यक आहे, अशी भावनाही अशोककुमार पांडेय यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. विलास सपकाळ अध्यक्षीय भाषणात म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारानुसार आज सर्वच बाबींच्या अनुषंगाने सर्वसमावेशकतेची गरज आहे. अर्थव्यवस्थेत असमतोल असेल तर ते अनेक सुरक्षेपासून पर्यावरणापर्यंत सर्वांवरच परिणाम करणारे ठरते. शाश्वततेवर चर्चा होऊन त्यातून वातावरण बदलापासून मानवतेपर्यंतच्या कल्याणाचे निराकरण होऊ शकते. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून गांधी विचार आणि शाश्वतता या अनुषंगाने महत्वपूर्ण विचार पुढे येऊन त्यावर कृती होईल, अशी अपेक्षाही डॉ. सपकाळ यांनी या वेळी व्यक्त केली. उद्घाटनीय सत्राचे प्रास्ताविक परिषदेच्या संयोजिका डॉ. रेखा शेळके आणि डॉ. जॉन चेलादुराई यांनी केले. तर डॉ. आशा देशपांडे आणि डॉ. रश्मी जायभाये यांनी सुत्रसंचलन, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी आभार मानले. दरम्यान, शुक्रवारी या परिषदेत तीन सत्र पार पडले. यात ‘शाश्वत समाज, संकल्पना आणि तत्वे’, ‘सामाजिक आर्थिक दृष्टिकोन’, ‘तांत्रिक आणि पायाभूत सुविधात्मक दृष्टिकोन’ या संकल्पनांवर जगभरातील नामांकित तज्ञ तसेच अभ्यासकांनी विचार मांडले.
