ओबीसी समाजाचा विश्वासघात; आघाडी सरकार
विरोधात १५ रोजी भाजपातर्फे आंदोलन – आ. कराड
लातूर १४- ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसीचे आरक्षण घालविणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने १५ सप्टेंबर २०२१ बुधवार रोजी लातूर जिल्हासह राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी दिली असून आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकिलच दिला नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली.
गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचाली केल्याच नाहीत असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. राज्य सरकारने केलेल्या हलगर्जीपणामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत.
सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही आ. कराड यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.१५ सप्टेंबर २०२१ बुधवार रोजी संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येणार आहे. लातूर जिल्हतील सर्वच तालुकास्तरावर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा जिल्हाभरातील भाजपाच्या लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि ओबीसी समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी होवून आघाडी शासनाचा निषेध करावा असे आवाहनही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.











