रेशीम विभाग कृषीकडे वर्ग करून तुतीची योजना पोकराच्या धर्तीवर राबविण्याची मागणी..
औसा -(प्रतिनिधी )– महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार अभिमन्यू पवार यांनी दि. ११ जुलै रोजी मुंबईत भेट घेतली.या भेटीत गतवर्षीपासून औसा विधानसभा मतदारसंघात शेत तिथे रस्ता अभियानाअंतर्गत सुरु असलेल्या शेतरस्ते तसेच मनरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानातून शेतकरी समृद्धीच्या कामाची माहिती देवून हे दोन्ही अभियानाला व्यापक स्वरूपात राज्यभर राबविण्यात यावेत अशी विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
आ. अभिमन्यू पवार यांनी शेत तिथे रस्ता या संकल्पनेतून मतदारसंघात एक हजार किलोमीटर लांबीचे शेतरस्ते कामे व या शेतरस्ते कामाचे आमदार फंडातून मजबुतीकरण कामे मोठय़ा प्रमाणात झाली असून याचा फायदा शेतकऱ्यांना समृद्ध होण्यासाठी होताना दिसत आहे.राज्याला आदर्श आशा या औसा पॅटर्नची चर्चा राज्यासह दिल्ली दरबारी झाली आहे. या अभियानामुळे शेतकऱ्यांना वेळीत शेती पिकांची रास करता येत असून तो माल योग्य वेळीला बाजारात जात असल्याने शेती मालाला योग्य भाव व शेतकर्यांच्या खिशातही वेळीत पैसा येत आहे. या शेतरस्ते अभियानामुळे शेतरस्त्यांमुळे होणारे वाद निवळले असून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत आहे. आपला संपुर्ण आमदार निधी शेतरस्ते कामासाठी समर्पित करणाऱ्यां आमदार अभिमन्यू पवार यांच्या या निर्णयामुळे मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे.याचबरोबर शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा या हेतूने आ. अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघात हाती घेतलेले दुसरे अभियान म्हणजे नरेगातून ग्रामसमृद्धी या अभियानाच्या माध्यमातून अंदाजे दिड हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली असून. एक हजार शेतकऱ्यांना जनावरांचे गोठे मिळाले आहे.तसेच शेततळे, गांडूळ व कंपोस्ट खत योजनेतून कृत्रिम खत उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतात भर पडली आहे. एकंदरीत या सर्व अभियानाची सविस्तर माहिती आ. अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या भेटी दरम्यान दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रेशीम उद्योगाकडे वळविण्याची आवश्यकता असून रेशीम विभागाकडे असलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळामुळे ते शक्य होत नसल्याचे त्यांना सांगून रेशीम विभाग कृषी विभागात वर्ग करून तुती लागवडीच्या योजना पोकराच्या धर्तीवर राबविण्यात याव्यात अशीही विनंती आ. अभिमन्यू पवार यांनी केली. मंत्रिमंडळ गठीत झाल्यानंतर या मागणीबाबत सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. अभिमन्यू पवार यांना आश्वस्त केले आहे.