गझल
गाव सारा ओस झाला, ‘गावपण’ रुजलेच नाही !
मिटत गेल्या पायवाटा, चालणे सरलेच नाही !
आज का घरट्यास व्हावा, उंबऱ्याचा भार माझ्या
तुटत गेल्या बंधनांना सांधणे सुचलेच नाही !
रातराणी गावची मज साद घाली का कळेना ?
काचणाऱ्या त्या व्यथेला पाळणे जमलेच नाही !
रोज त्यांच्या आठवांची पालखी नेतो घराशी
आज खिडकीच्या गजांशी पण कुणी दिसलेच नाही
पाहिला संसार सारा चाखली सारी नशा मी…
कैफ ही होता दिवाणा झिंगणे स्मरलेच नाही !
हरवलेल्या त्या क्षणांची ओढ वाटे आज मजला
बालपण जगलो तरीही बालपण कळलेच नाही !

– व्यंकटेश कुलकर्णी
दिनांक: ५.९.२०१८











