लातूर/प्रतिनिधी:येथील श्री केशव शिशुवाटिकेत राखी पौर्णिमेचे औचित्य साधून समाजरक्षक पोलिस बांधव तसेच पर्यावरण रक्षक झाडांना विद्यार्थीनींनी राख्या बांधल्या.’राखी कार्यशाळा’ या उपक्रमात माता-पालक व मुलांनी सुंदर राख्या तयार केल्या.
या कार्यक्रमास पोलिस निरिक्षक संजीवन मिरकले,भाजप महिला मोर्चा अध्यक्षा मीनाताई भोसले व शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंजुषा जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. “वृक्षवल्ली आम्हा सोयरे” असे संत तुकोबारायांनी म्हटलेले आहे.झाडे म्हणजे आपला प्राणवायु.या रक्षणकर्त्या वृक्षांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने शाळेतील मुली व माता पालकांनी झाडांना राख्या बांधल्या. राखी पौर्णिमा व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा योग जुळून आल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ‘मिले सुर मेरा तुम्हारा हे गीत सादर केले. पोलीस निरीक्षक मिरकले यांनी “खाकी हीच आमची राखी आहे”, त्यामुळे आम्ही कायम समाजाचे रक्षण करणारच,असे आश्वासन दिले.कार्यक्रम प्रमुख श्रीमती प्रज्ञा कुलकर्णी,सहप्रमुख सोनाली भातलंवडे,शिशुवाटिकच्या अध्यक्षा योगिनीताई खरे व सर्व शिक्षिकांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.