डॉ शेषराव मोहिते, लातूर यांची मुलाखत
ग्रामीण, दलित, मुस्लिम, आदिवासी, अशी वर्गवारी साहित्यात नसावी. जे साहित्य मानवी वेदनेशी नातं जोडतं तेच खरं साहित्य असतं. शिक्षणाची परंपरा नसलेल्या कुटुंबातून खेड्यातील लेखक जे साहित्य लिहित आहेत ते साहित्य मराठीतील मुख्य प्रवाहातील साहित्य आहे असे मत ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ शेषराव मोहिते यांनी मुलाखती मध्ये व्यक्त केले. डॉ.शेषराव मोहिते यांची मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव व डॉ ज्ञानदेव राऊत यांनी ही मुलाखत घेतली.४२ वे मराठवाडा साहित्य संमेलन घनसावंगी (जिल्हा जालना) येथे दि.१० व ११ डिसेंबर २०२२ या दोन दिवशी संपन्न झाले. या मुलाखतीत मधून डॉ शेषराव मोहिते यांचा शेतकरी संघटनेच्या कार्याचा व साहित्य लेखनाचा प्रवास या उलगडत गेला.
डॉ.मोहिते हे शेतकरी संघटनेचे नेते व भाष्यकार असून, साहित्य लेखनामध्ये ‘बरा हाय घरचा गोठा'(१९८३) हा कथासंग्रह, ‘असं जगणं तोलाचं’ (१९९४) व ‘धूळपेरणी’ (२००१) या दोन कादंबऱ्या,’बोलिलो जे काही'(२००४) व ‘अधले मधले दिवस: (२०२२)हे ललित लेखनाचे दोन ग्रंथ, ‘शेती व्यवसायावरील अरिष्ट’ हा वैचारिक आणि ‘ग्रामीण साहित्य: बदलते संदर्भ’ हा समीक्षा ग्रंथ असा त्यांच्या चळवळीचा व साहित्याचा परीचय आहे.त्यांच्या साहित्य लेखनाला महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.’असं जगणं तोलाचं’ या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा वा.म. जोशी सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार, भि.ग.रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान औरंगाबाद यांचा शेतकरी साहित्य पुरस्कार तर धूळपेरणी या कादंबरीला बाबा पद्मनजी उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद यांचा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा हरि नारायण आपटे उत्कृष्ट वांड.मय पुरस्कार तर जालनाच्या ऊर्मी प्रतिष्ठानचा मुक्ताई पुरस्कार प्राप्त आहे. डॉ.मोहिते गडचिरोली येथे झालेल्या ३ रे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर मराठी साहित्य संघ कडोली बेळगाव आयोजित ३४ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.असा त्यांचा परिचय आहे.

सर,शेतकरी कुटुंबातील आपले बालपण आणि शिक्षणाची जडणघडण कशी झाली.
मी शेतकरी कुटुंबातून वाढलो आहे.शेतकऱ्याच्या पोराला अगदी लहानपणापासून गुरं, ढोरं व शेतीशी जोडून घ्यावे लागते.मला शेतीचा लळा होता. गुरं- ढोरं सांभाळणे,शेतीत औत हाणणे आवडायचे.पण आई- वडिलांना व चुलते श्री गोविंदराव मोहिते यांना मी शाळेत जाऊन डॉक्टर, इंजिनिअर व्हावे वाटायचे. कारण शेतकऱ्यांकडे जमीन- जुमला, बैल- बारदाना आणि मळ्याची शेती जरी असली तरी शेतकऱ्यांची परिस्थिती फारशी बरी नसते. हा आई-वडिलांचा अनुभव होता. म्हणून आई- वडील व चुलत्याच्या धाकाणे मी शाळेत जात राहिलो.
सर, आपल्या शैक्षणिक जडणघडणीत बलसूरच्या शाळेचा,गुरूजनांचा मोटा वाटा आहे हे आपण नेहमी सांगत असता, तर या विषयी सांगा.
माझ्या शैक्षणिक व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत बलसूरच्या शाळेचा व तेथील गुरूजनांचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या गावी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती.प्राथमिक शिक्षण संपल्यावर पुढील शिक्षणासाठी आम्हाला उमरगा येथे जावे लागे.उमरगा हे गावापासून पंधरा किमी अंतरावर असून उमरग्याला किंवा इतर शहरात शाळेला जाण्या इतपत परिस्थिती बहुतांशी शेतकरी कुटुंबाची नसायची.आमच्या गावासह भोवतालच्या दहा- पंधरा खेड्यांची ही अवस्था होती. त्यामुळे या भागातील मुलांचे पुढील शिक्षण असेच बारगळायचे. या दरम्यानच्या काळात गुंजोटीचे श्री नारायण दामोदर किरकोळ गुरूजी हे बलसूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेत मुख्याध्यापक म्हणून बदलून आले होते.या परिसराची शैक्षणिक अडचण लक्षात घेऊन बलसूरला हायस्कूल असावे यासाठी किरकोळ गुरुजींनी बलसूरचे श्री.भाऊसाहेब बिराजदार व प्रा.दत्तात्रय पटवारी यांना हायस्कूल स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यायला लावला. किरकोळ गुरूजींनी पाठीमागे राहून त्यांना खूप मदत केली. बलसुरला शिवाजी हायस्कूलची मान्यता मिळाली. शाळेच्या मान्यतेनंतर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या व जडणघडणीच्या दृष्टीने खूप चांगले प्रयत्न संस्थाचालक,शिक्षक व किरकोळ गुरूजी कडून झाले.बलसुरच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री चिलोबा जी.एस., श्री बाभळसुरे सर,श्री किसन पुजारी व श्री मोहन शिंदे यांच्या इतकाच किरकोळ गुरूजींचा मोटा वाटा आहे. किरकोळ गुरूजी एक संस्कारशील गुरूजी होते. त्या काळी ग्रामीण भागातील मुलांना घडविण्यात अशा शिक्षकांचा मोटा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने बलसुरच्या हायस्कूलमध्ये मुलांच्या वाचनासाठी ग्रंथालय उघडले. त्यामुळे त्या काळात जे उत्तम ग्रंथ होते ते वाचायला मिळाले.बलसूरच्या शाळेत माझ्या वाचनाची सुरुवात बाबा कदम, बाबूराव अर्नाळकर, चंद्रकांत काकोडकर यांच्या कादंबऱ्यांने जरी झालेली असली तरी त्याच ग्रंथालयात वि.स.खांडेकर,साने गुरुजी,राम गणेश गडकरी, गोविंद बल्लाळ देवल, व्यंकटेश माडगूळकर,ग.त्रं.माडखोलकर या सारख्या लेखकांची पुस्तके देखील वाचायला मिळाली.तेव्हा नुकत्याच प्रकाशित झालेल्या मृत्युंजय, पाचोळा,गोतावळा यासारख्या कादंब-यां वाचायला मिळाल्या.शाळेत मला वाचनाची आवड निर्माण झाली.या वाचनामुळे साहित्याचा वाचक झालो.
सर, आई,वडील आणि चुलते यांना आपण डॉक्टर व्हावे असे वाटत होते.पण आपण कृषी विद्यापीठाच्या शिक्षणाकडे कसे काय वळलात.
मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे.शेतक-यांचा खरा शत्रू कोण ते त्या काळी समजायचे नाही, पण शेती शिक्षण घेऊन उत्तम शेती करावी.शेतीचे उत्पादन वाढवावे आणि घरची परिस्थिती बदलून टाकावी असे वाटत होते.म्हणून एक वर्ष चुलत्याने उमरग्याला पीयुशीत प्रवेश दिला, पण हे वर्ष मी अभ्यास न करता वाया घालविले,आणि दुसऱ्या वर्षी मी स्वतः परभणीच्या कृषी विद्यापीठात घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रवेश घेतला. यामुळे घरी थोडाबहुत विरोध झाला, पण नंतर घरच्यांनी माझ्यावर सोपवून शांत झाले.एक प्रगतशील शेती करावी या हेतूने मी कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला होता.
आपण कृषी विद्यापीठात शिक्षण घेते वेळीच छात्र युवा संघर्ष वाहिणी, शेतकरी संघटनेशी जोडलात याविषयी सांगा.
कृषी विद्यापीठात शिकायला जेव्हा गेलो तेव्हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषी तज्ज्ञ डॉ. दत्ताजीराव साळुंखे हे अमेरिकेतून येऊन तेथे कुलगुरू म्हणून रुजू झाले होते. त्यांनी परभणीचे मराठवाडा कृषी विद्यापीठ भारतातील एक अग्रगण्य कृषी विद्यापीठ बनविण्याचा ध्यास घेतला होता. नेमक्या अशा भारावलेल्या वातावरणात मी विद्यापीठात प्रवेश घेतला. उमरग्यातील पियूसीचे वाया गेलेले वर्ष या पार्श्वभूमीवर परभणीत मला जे वातावरण मिळाले ते अफलातून होते. माझ्या विचाराला पोषक आणि माझ्या ज्या आशा आकांक्षा घेऊन मी परभणीला शिकायला गेलो होतो त्या स्वप्नांची पूर्तता येथे निश्चित होईल अशा प्रकारचा एक आशावाद माझ्या मनात निर्माण झाला होता. दुसरे असे की, मला वाचनाची आवड होती.परंतु कृषी विद्यापीठाचे वाचनालय अतिशय भव्य आणि ॲग्रीकल्चरशी संबंधित ग्रंथांनी समृद्ध होते. तरीही तेथे अवांतर वाचन करण्यासाठी म्हणून फारशी पुस्तके उपलब्ध नव्हती. माझी ती गरज परभणीच्या मराठवाड्यातील पहिले ग्रंथालय जे आहे त्या गणेश वाचनालयाने माझी वाचनाची भूक भागविण्याचे काम केले.यामध्ये जेम्स हेरियट,ल्युओ टाॅलस्टाय,मॅग्झीम गॉर्की, रवींद्रनाथ टागोर,हिंदीतील मुन्शी प्रेमचंद, मराठीतील साने गुरूजी, भालचंद्र नेमाडे,जी.ए.कुलकर्णी, उध्दव शेळके,डोहकार श्रीनिवास विनायक कुलकर्णी, इंदिरा संत यांचे साहित्य वाचत गेलो.त्यावेळेस रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याची पारायणे केली.कवी ग्रेस हा माझा सर्वात आवडता कवी.याच काळात दया पवार,प्र.ई.सोनकांबळे, नारायण सुर्वे, बाबूराव बागुल, वामन निंबाळकर यांची आत्मकथनं वाचली.त्यासोबतच त्या काळात माझा वाचनाचा भर जगभरातली जी थोरामोठ्यांची चरित्र व आत्मचरित्र आहेत ती वाचण्यावर होता.यात प्रामुख्याने सुमती देवस्थळे यांचे अल्बर्ट श्वाईटजर, ‘टालस्टाय एक माणूस’ या पुस्तकाचा जसा समावेश होता,तसा लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती गोखले, डॉ.राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी यांचीही आत्मकथने वाचण्यावर माझा भर होता.
दुसरे असे की,परभणीचे कृषी विद्यापीठ हे विधायक चळवळीचे केंद्र होते. माझ्यासमोर प्रचंड काबाडकष्ट करणारी खेड्यातील माणसं असायची. समग्र व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीत मी याच विद्यापीठात असतांनाच भाग घेतला.कृषी विद्यापीठात असतानाच जयप्रकाश नारायण यांच्या ‘छात्र युवा संघर्ष वाहिणी’चे महाराष्ट्र संयोजक म्हणून १९८०-८१ साली कार्यरत होतो.याच दरम्यान मी कथा आणि कविता लिहायला देखील सुरुवात केलेली होती. जेव्हा माझे बीएस्सी ॲग्री शिक्षण पूर्ण झाले तेव्हा लक्षात आले की या शिक्षणाच्या भरवशावर आपण गावाकडे जाऊन आपणाला हवी तशा पद्धतीची शेती काही करू शकत नाही.कृषी अभ्यासक्रमाच्या पूर्ण काळात माझ्या बुटाकपड्यावर शेतीमातीचा साधा डागही पडला नव्हता.पण मला बी.एस्सी ॲग्रीला चांगले ग्रेड मिळालेले होते. त्यामुळे एम. एस्सी अग्रीला सहज प्रवेश मिळाला. पण त्या शिक्षणातून मन उचाट खाल्ले होते. त्याचे कारण विनोबा भावे यांनी त्यांच्या ‘शिक्षण विचार’ या पुस्तकात कृषी शिक्षणाबद्दल जे विचार मांडले होते ते मला हादरवून टाकणारे होते. अशातच मी विनोबा भावे यांना प्रत्यक्ष भेटून या काळातील शिक्षणासंबंधी चर्चा देखील केली. तेव्हा त्यांनी सल्ला दिला की, ‘तू तुझे शिक्षण अगोदर पूर्ण कर’ मी परभणीला परत येऊन शिक्षण सुरू तर ठेवले पण त्यात काही राम वाटत नव्हता. यानंतर मी बाबा आमटे यांच्याकडे गेलो. ‘ते म्हणाले की केवळ कुलगुरू हटवून काहीही होत नाही. येथील संपूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे. हा दीर्घ काळ चालणारा लढा आहे. त्यासाठी तू अगोदर स्वतःचे शिक्षण पूर्ण कर आणि मग पुढे काय करायचे ते कर’. पण कृषी शिक्षण आणि प्रत्यक्ष शेती यांचा ताळमेळ लागत नाही, म्हणून या काळात कुलगुरू हटाव सारखी आंदोलने केली. शेतकऱ्यांच्या परिस्थिती विषयी खूप मोठा असंतोष तर मनात होताच. पण त्यातून मार्ग कसा काढावा हे समजत नव्हते. अशातच १९८०-८१ ला शरद जोशी यांनी शेतीमालाच्या भावाचा लढा उभा केला.हा लढा मला माझा वाटायला लागला म्हणून मी १९८० पासून शेतकरी संघटनेत सक्रीय झालो. शेतकरी संघटनेत पहिल्या फळीत जे आठ दहा नेते होते त्यांच्यात माझा समावेश होता. शेतकरी चळवळ मराठवाड्यातील खेड्यापाड्यापर्यंत पोहोचविण्याचा माझ्या परीने मी जिवापाड प्रयत्न केला. त्यावेळी प्रवासाची फारसी साधनं नव्हती. कधी पायी, कधी एसटीने तर कधी सायकलवर आम्ही फिरायचो. १९८० चे नाशिक,निफाड चाकणचे कांदा व ऊस आंदोलन,१९८१ ला निपाणी येथील तंबाखू उत्पादकांचे भाववाढीचे आंदोलन या आंदोलनातील शेतकरी प्रश्नांची धग, शेतकऱ्यांचे संघटन आणि निपाणीच्या आंदोलकांवर कर्नाटकच्या गुंडूराव सरकारने केलेला बेछूट गोळीबार हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक काळा कलंक आहे. त्या काळात शेतकरी संघटना गावोगाव पोहोचवण्याचे काम साप्ताहिक ‘माणूस’ मधून लेखमाला लिहून विजय परूळकरांनी केलेले आहे. १९८० चे ऊस आंदोलन त्यावर त्यांचे ‘योद्धा शेतकरी’ नावाचे पुस्तक निघाले तर १९८१ चे निपाणीच्या तंबाखू आंदोलनावर ‘रक्तसूट’ नावाची लेखमाला ‘माणूस’ मधून लिहिली. आमच्या सभा आणि मेळाव्यांनी जे काम झाले नसते ते विजय परूळकर यांच्या लेखणीने केलेले आहे. या आंदोलनात तेरा शेतकऱ्यांचा गोळीबारात मृत्यू झाला. यानंतर शेतकरी आंदोलनाच्या कार्यपद्धती विषयी अधिवेशनातून विचार मंथन केले.
१९८२ ला शेतकरी संघटनेचे पहिले अधिवेशन नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे झाले. त्याचे अध्यक्ष होते माधवराव खंडेराव मोरे, तर शेतकरी संघटनेचे दुसरे अधिवेशन शरद जोशींनी रामचंद्र बापू पाटील यांचे अध्यक्षतेखाली परभणी येथे घेण्याचे ठरविले. त्या अधिवेशनाचे स्वागतअध्यक्ष होते श्रीरंगराव मोरे तर कार्यवाह मी होतो. देशातील जवळपास ११ राज्यातील शेतकरी या अधिवेशनाला आले होते. शेतीमालाच्या भावाचा निर्णायक लढा देऊन तीन वर्षांच्या आत भारतातील शेतकरी स्वतंत्र करायचा असा निर्धार त्या अधिवेशनात शेतकरी संघटनेने केला. पण दुर्दैवाने ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांची अंगरक्षकाने गोळ्या घालून हत्या केली, आणि आमच्या चळवळीला खूप मोठा सेट बॅक बसला.

कृषी शिक्षण आणि शेतीमधील वास्तव याचा संबंध आपण कसा सांगाल.
कृषीविषयक शिक्षण आणि वास्तव यांचे नाते नसणे ही मोठी तफावत असून कृषी विद्यापीठामधील शिक्षणानंतर आंबेठाणच्या प्रशिक्षणाने दिशा दिली.कृषी विद्यापीठातील पुस्तकी ज्ञानाने निराशाच केली.शेतकरी संघटनेचे आंदोलन हा दारिद्रय मुक्तीचा लढा होता. दुसरे असे की,
“भारावलेल्या काळात महागाईविरोधात काढलेल्या मोर्चामध्ये शेतकरी आत्महत्येची बीजे पेरली गेली”.तसेच आजच्या शेतकरी संघटना शेती व्यवसायाला सरकारी वर्चस्वातून मुक्ती देत नाहीत.कृषीमधील सरकारी हस्तक्षेप संपला पाहिजे.जिथे जिथे सरकारी हस्तक्षेप संपला आहे ते क्षेत्र आज प्रगतीपथावर आहे.असे परखड मत व्यक्त करून ते पुढे म्हणाले की, “नव्या कृषी कायद्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यास मदत झाली असती, पण दिल्लीच्या आंदोलनाने शेतकरी पन्नास वर्ष मागे गेला ” अशी टिपणी डॉ शेषराव मोहिते यांनी केली.
सर, आपले ग्रामीण साहित्याविषयी आपल्याला काय वाटते?
मी शालेय जीवनात असतानाच आनंद यादवांची ‘इंजिन’ कथा वाचण्यात आली होती.आपल्या भावविश्वाशी नातं सांगणारी कथा म्हणून मला आवडली होती. व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी,आनंद यादवांची गोतावळा,रा.रं.बोराडे यांची पाचोळा, भालचंद्र नेमाडे यांची कोसला, उध्दव शेळके यांची धग या कादंब-यां वाचल्या.धग कोसला या आवडत्या कादंब-या.पण ग्रामीण साहित्यातून ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्रण होताना दिसत नाही ही खंत आहे. ग्रामीण लेखक शहरी वाचकांची मनोवृत्ती पाहून लिहितात.ग्रामीण माणूस म्हणजे येठनछाप,भोळसर, अडाणी दाखवला आहे.तो टिंगल टवाळीचा विषय म्हणून साहित्यात येतो.शेती व शेतकऱ्यांच्या वास्तव जीवनाकडे डोळे झाक केली जाते. यावर नरहर कुरुंदकर यांनी १९८०-८१ मध्ये ‘ मराठी ग्रामीण साहित्य सामाजिक दृष्ट्या पुरेसे प्रक्षोभक आहे का?’ असा लेख लिहिला. हा लेख ग्रामीण लेखकाला अंतर्मुख करणारा होता. ग्रामीण साहित्य वास्तव असावे ते किस्से प्रधान नसावे.मी अशा किस्से प्रधान लेखनावर ग्रामीण साहित्य संमेलनातून विरोध केला होता. या लेखना विषयी मी ‘दुर्दशा विकणारे लेखक’ असा लेख लिहिला. हा लेख प्रस्थापित ग्रामीण लेखकांना रूचला नाही. प्रस्थापित लेखकांनी मला लेखनाचे आव्हान दिले.या आव्हानातून मी कादंबरी लेखनाकडे वळलो.यापूर्वी माझा ‘बरा हाय घरचा गोठा’ छोटासा कथासंग्रह प्रकाशित होता.पुढे शेतकरी संघटनेमुळे उमरगा मतदार संघातून आमदारकीची निवडणूक लढविली. या निवडणुकीत मी हरलो. शेतकरी संघटनेमधून मी दिलेला लढा हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी होता.पण हे समजून घेण्याची स्थिती समाजात नव्हती.यावेळी एक क्षण वाटले की आपले सर्व संपले आहे.पण मी जे काही शेतकरी संघटनेतून भूमिका घेऊन काम करीत होतो. ग्रामीण साहित्य फॅक्टस् ने लिहिले पाहिजे असे म्हणत होतो. त्या भूमिकेतून मी कादंबरी लेखनाकडे वळलो.
सर, असं जगणं तोलाचं, धूळपेरणी या दोन कादंबऱ्या आपण लिहिल्या आहेत.आशय, निवेदन, भाषा या सर्व अंगांनी या कादंब-या ग्रामीण साहित्यात स्वतंत्र जाणीवेच्या आहेत.या दोन्ही कादंब-यांना खूप प्रसिद्ध मिळाली, शासनाच्या पुरस्काराबरोबर इतर साहित्य संस्थेचे पुरस्कार मिळाले. यांच्या लेखनाविषयी काय सांगाल ?
मी या अगोदर सांगितले आहे की, ग्रामीण साहित्याला संत तुकाराम, महात्मा जोतिराव फुले, साने गुरुजी ते बहिणाबाई चौधरी इथपर्यंतची समृद्ध परंपरा आहे,पण त्या परंपरेला अनुसरून ग्रामीण लेखक लिहित नव्हते.किस्से वजा लेखन किंवा ग्रामीण जीवनाच्या वास्तवाला हात न लावता एक आभासी जीवन येत होते.म्हणून या दोन कादंबऱ्या लिहिल्या.यातील लेखन हे वास्तवाशी समांतर आहे.शेतक-यांच्या जगण्याचा संघर्ष आहे.या दोन्ही कादंबऱ्यांनी मला भरभरुन दिले.लौकिक दिला.आणि मी प्रस्थापित लेखकावेगळे पण वास्तव जीवन चित्रित केले याचे समाधान आहे.
ललित लेखनाची आपली दोन पुस्तकं प्रकाशित आहेत.या दोन्ही पुस्तकांमधून आपण ग्रामीण जीवनानुभवासह अगदी इतर विषयातून मनस्वी पणे व्यक्त झालात.यातून निरीक्षण, संदर्भित वाचनाचा प्रत्यय येतो.या लेखनात स्पष्टता व परखडपणा दिसतो.
बरोबर आहे.ललित लेखन हे मी लोकसत्ता, सकाळ व अग्रोवन या वृत्तपत्रातून केले आहे.वृत्तपत्रातील ललित लेखन हे हलकं फुलकं असावं असा संपादकाचा आग्रह असतो.पण मी फारसं हलकं फुलकं लिहिलेले नसून देखील संपादकांनी कसलीही खळखळ न करता ते जशाला तसे छापले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.या लेखनातून माझी भूमिका मी मांडत राहिलो आहे.ललित लेखन हे इतर वाड्.मयापेक्षा मोकळेपणाने व्यक्त होता येतं.यातूनही मी गंभीरपणे शेती, शेतकरी वर्गाला केंद्रस्थानी ठेवून लेखन केले आहे.ग्रामीण जीवनातील अभावग्रस्तता जशी मांडणी तशीच ग्रामीण समाजातील स्वतःच्या सामर्थ्यावर संघर्षातून पुढे आलेल्या व्यक्तीविषयी लिहिले आहे.खेड्यात जी सुबत्ता आली आहे ती शिक्षणातून आली आहे.
आज ग्रामीण साहित्य खूप लिहिले,वाचले जात आहे. या साहित्याला कृषीजन संस्कृतीचे साहित्य म्हणून ओळखले जाते.आज मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी हे साहित्य समजले जाते.या विषयी आपणास काय वाटते?
आज जे काही लेखक चांगले लिहित आहेत,ते खेड्यातून, अत्यंत साध्या कुटुंबातून आलेला लेखक वर्ग आहे. स्वर्गीय पुरूषोत्तम बोरकर यांची ‘मेड इन इंडिया’ ही अप्रतिम कादंबरी १९८६ आली. पण या लेखकाच्या हयातीत त्या कादंबरीची योग्य ती दखल येथील वाड्.मयीन संस्कृतीने घेतली नाही. हे आपले दुर्दैव आहे. आजच्या घडीचे चांगले आणि महत्त्वाचे लिहिणारे लेखक खेड्यातील आहेत. या लेखकाच्या कविता, कथा, कादंबऱ्या ग्रामीण जीवनावर खोलवर प्रकाश टाकणा-या आहेत असे मला वाटते. हे साहित्य ग्रामीण नव्हे तर भारतीय साहित्याच्या मुख्य प्रवाहातील साहित्य आहे.साहित्य हे समाज जीवनाशी समांतर असावे. अशी माझी भूमिका आहे.

शब्दांकन : डॉ जयद्रथ जाधव