गवळी समाजाच्या दुधाभिषेकाने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या यात्रेचा शुभारंभ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण दर्शनासाठी भाविकांच्या मध्यरात्रीपासूनच रांगा
हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला
लातूर /प्रतिनिधी : शनिवार व रविवारच्या मध्यरात्री गवळी समाजाच्या वतीने लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला.परंपरेप्रमाणे या दुग्धाभिषेकानंतर महाशिवरात्री यात्रेचा शुभारंभ झाला. सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी लातूर व पंचक्रोशीतील भाविकांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या.

सकाळी जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दिवाणी न्यायाधीश गोटे व धर्मादाय सह आयुक्त राजेश सासणे, प्रशासक सचिन जांबुतकर आणि विश्वस्त उपस्थित होते. लातूरसह सीमावर्ती भागात सिद्धेश्वरांची महाशिवरात्री यात्रा प्रसिद्ध आहे.या कालावधीत सिद्धेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी लाखो भक्त लातूर येथे येत असतात. शिवरात्रीपासून यात्रेला प्रारंभ होतो. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे गवळी समाजाच्या वतीने मध्यरात्री वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढत मंदिरात येऊन श्री सिद्धेश्वरांना दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.

सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रा महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश गोटे, सह धर्मादाय आयुक्त राजेश सासणे व प्रशासक सचिन जांबुतकर, ईशानी घुगे यांच्यासह ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे,श्रीनिवास लाहोटी,अशोक भोसले, बाबासाहेब कोरे,नरेश पंड्या,सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह दिसेन, मन्मथ लोखंडे, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा व महाआरती करण्यात आली.

यावेळी विश्वस्त मंडळाकडून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणेच श्री सिद्धेश्वरांच्या दर्शवण्यासाठी भक्तांनी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या. ” हर हर महादेव’चा जयघोष करीत भाविक-भक्त रांगा लावून दर्शन घेत होते.भक्तांना दर्शन घेण्यात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली होती.दर्शन रांगा तसेच भक्तांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.दर्शन रांगेमध्ये आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या तर उपचारासाठी वैद्यकीय पथकही तत्पर होते. देवस्थान व भालचंद्र रक्तपेढीच्या सहकार्यातून रक्तदान करणाऱ्यांना थेट दर्शन देण्याचा उपक्रम यावर्षीही राबविण्यात आला.या शिबिराला दर्शनासाठी येणारे भक्त,नागरिक व युवकांनी मोठा प्रतिसाद दिला. यात्रा कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.यात्रा कालावधीत विविध सोयी- सुविधा पुरविण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनेही व्यवस्था करण्यात आली आहे.





