मोदींच्या नेतृत्वात काम करतोय हे आपले भाग्य
भाजपाच्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचे प्रतिपादन
लातूर दि.३० – देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशाची जगात शान आणि मान उंचावली. जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आणि कुवत त्यांच्यातच आहे. आज संपूर्ण जग त्यांच्याकडे एका वेगळ्या आशेने पहात असून अशा जगातील लोकप्रिय नेत्याच्या नेतृत्वात आपण काम करतोय हे आपले भाग्य असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी भाजपाच्या सेवा पंधरवाडा कार्यक्रमात बोलताना केले.

पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा साजरा केला जात असून अहमदपूर येथे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोककाका केंद्रे आणि माजी सभापती आयोध्याकाकू केंद्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीर, निराधार महिलांना शिलाई मशिनचे वाटप, गरीब कुटुंबातील मुलींचा कन्यादान योजनेतून विमा, गरिब कुटुंबाना जीवन उपयोगी साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सफाई महिला कामगारांना साडी चोळीचे वाटप, तीन हजार वृक्षारोपणाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते शुक्रवारी झाला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा सरचिटणीस त्र्यंबकआबा गुट्टे, विक्रमकाका शिंदे, माजी सभापती भारत चामे, प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई तरडे, बालाजी गुट्टे, राधाकिशन तेलंग, राम बेल्लाळे, जयप्रकाश केंद्रे, सिद्धार्थ सूर्यवंशी, अंकुश जनवाडे, विलास सूर्यवंशी, राजू खंदाडे, माधव केंद्रे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आ. कराड यांच्या हस्ते केक कापून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना जन्मदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, गोरगरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून विश्वाचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला विविध योजनेचा थेट लाभ दिला, मोफत अन्नधान्य दिले, कोरोनाच्या काळात आरोग्याच्या सुविधा दिल्या, संपूर्ण देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेणारे यशस्वी पंतप्रधान मोदीजी यांचे नेतृत्व जपण्यासाठी त्यांना दीर्घआयुष्य लाभावे त्यांच्याच नेतृत्वात भारत देश विश्वगुरु व्हावा यासाठी भाजपाच्या वतीने सेवा पंधरवाडा कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली.

गेल्या अडीच वर्षातील महाविकास आघाडी सरकारने कसल्याही प्रकारची शेतकऱ्याला मदत केली नाही कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधेचा काळा बाजार करुन मड्यावरचे लोणी खान्याचे काम केले. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी केवळ वसुलीचेच काम केले असा आरोप करुन आ. कराड म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आलेल्या नव्या सरकारने गोगलगायीमुळे आणि सततच्या पावसामुळे नुकसानीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करून दिलासा देण्याचे काम केले. देण्यात येणारी मदत ही दुप्पट करुन दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढविली त्याचबरोबर नियमीत कर्ज परतफेड करणार्या शेतकर्यांना अनुदान दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजपाच्या संघटनात्मक कामात लातूर जिल्हा राज्यात क्रमांक एकचा असून प्रदेशाकडून आलेले सर्व कार्यक्रम आजपर्यंत यशस्वीरीत्या राबविले. अहमदपूर विधानसभा हा भाजपाच्या विचाराचा मतदार संघ आहे. गेल्या विधानसभेत झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद यासह सर्व निवडणुकीत उमेदवारी कोणालाही मिळो, कमळ हेच आपले उमेदवार समजून भाजपाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकार्यांनी एकजुटीने, एक ताकतीने आणि एका विचाराने काम करावे. नांदेड-लातूर या महामार्गाचे काम दोन वर्षापूर्वीच झाले असते मात्र कोणामूळे रखडले हे सर्वांना माहीत असून त्यांना त्यांची येत्याकाळात जागा दाखवून द्यावी असेही आवाहन यावेळी आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
या कार्यक्रमात बोलताना विनायकराव पाटील म्हणाले की, भाजपाचा दुश्मन कोण आहे हे ओळखून अहमदपूरच्या भाजपा प्रमुखांनी एकत्रीतपणे मुकाबला करावा तसे झाले तरच इथे कमळाशिवाय काहीच उगवत नाही असे सांगून येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे काम करू असे बोलून दाखविले. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रेखाताई तरडे, कार्यक्रमाचे संयोजक अशोककाका केंद्रे, आयोध्याताई केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद गिरी यांनी केले या कार्यक्रमास भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी सर्व स्थरातील नागरिक महिला पुरुष तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.