मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : जरांगे यांचे आभार : भ्रम पसरविणार्यांना जागा दाखवा
परभणी,दि.23(प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांची आरक्षणासाठीची लढाई सामाजिक आहे, राजकीय नाही, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करीत या लोकसभा निवडणूकीत मनोज जरांगे पाटील यांनी भाग न घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले. या मतदारसंघात मराठा समाजाने आपणास पाठींबा व्यक्त केल्याच्या विरोधकांनी सुरु केलेल्या अफवा सपशेल खोट्या आहेत. विरोधकांचे हे गैरप्रकार मराठा समाजाने हाणून पाडावेत, विरोधकांना जागा दाखवून द्यावी, असे आवाहनही केले.
परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची मंगळवारी (दि.23) पाथरीत जोरदार जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या जंगी सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, उमेदवार महादेव जानकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार आशिष देशमुख, माजी खासदार अॅड.सुरेश जाधव, डॉ. केदार खटींग, परभणीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण देशमुख, शिवसेनेच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान, दादासाहेब टेंगसे, चक्रधरराव उगले आदी उपस्थित होते.
मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा या सरकारनेच मार्गी लावला. मराठा समाजास दहा टक्के हक्काचे आरक्षण उपलब्ध करुन दिले ते सुध्दा ओबीसी किंवा अन्य घटकांना धक्का न लावता, असे नमूद करतेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा समाजाचा विरोधकांनी सातत्याने केवळ मतासाठी व सत्तेसाठीच वापर केला. आरक्षण वगैरे तर कधी दिलेच नाही. हेच विरोधक आता हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, अशा गप्पा मारु लागले आहेत. विरोधकांनी ते आरक्षण न्यायालयात का टिकाणार नाही, हे सांगावे, न्यायालयात हे आरक्षण कसे टिकेल हे आम्ही सांगू, असेही नमूद करतेवेळी मराठा आरक्षण हे न्यायालयातसुध्दा टिकले पाहिजे याची जबाबदारी आमच्या सरकारची आहे, असे ते म्हणाले.
या सरकारने आरक्षण देतेवेळी कुणबीचे दाखलेसुध्दा वितरीत करणे सुरु केले. विरोधकांनी कधी कुणबी म्हणून या समाजास एकसुध्दा दाखला दिला का? असा सवाल करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टिकेचे झोड उठविले.

एकीकडे चंद्रावर माणसे जावू लागली असतांना दुसरीकडे स्वतःच्या घरात बसून ऑनलाईन कारभार पाहणार्या मंडळींना आम्ही जोरदार करंटचा झटका दिला. तो एवढा की, ती मंडळी आता पायाला भिंगरी लावून गावोगाव फिरु लागले आहेत. त्यांच्या गळ्याचे आणि कंबरेचे पट्टेसुध्दा निघाले आहेत, असा टोला शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला. घरी बसून कारभार करणार्यांनी रस्त्यावर उभे राहून सेवा करणार्यांना शिकवायचा प्रयत्न करु नये, असा इशारासुध्दा दिला.
देश पुढे जातो आहे, जलदगतीने विकास होतो आहे. प्रगतीकडे दररोज एक एक पाऊल पडत आहे. सर्वच क्षेत्रात विकासाने मोठी झेप घेतली आहे. राज्य सरकारनेसुध्दा केंद्र सरकारच्या मदतीने अनेक योजनांना मोठा वेग दिला आहे. एका पाठोपाठ एक कामे पूर्ण होत आहेत. परभणीसारख्या मतदारसंघातसुध्दा तीन हजार कोटींची कामे सुरु आहेत. त्यापैकी काही कामे मार्गीसुध्दा लागली आहेत. या कामांमध्येसुध्दा स्थानिक खासदारांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला होता, अशी टिका करतेवेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी जालना-नांदेड समृध्दी महामार्ग, नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग या जिल्ह्यातून जाणार आहे. परभणी महानगराच्या भूमिगत गटार योजना, मलनिस्सारण योजना, महानगरांतर्गत रस्ते यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला असून आचारसंहितेनंतर सर्व कामे युध्द पातळीवर सुरु होणार आहेत. सेलूतील 242 हेक्टर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावला आहे. मतदारसंघांतर्गत प्रगती आणि रोजगार निर्मितीचे मार्ग डबल इंजिन सरकारने खूले केले आहेत, असे ते म्हणाले.
या निवडूणका सर्वार्थाने महत्वपूर्ण असून या निवडणूकीत सर्वसामान्य मतदारांनी जानकर यांना भरघोस मतांनी निवडून देतेवेळी विरोधकांच्या लंकेचे दहन करावे, असे आवाहनही केले.