….
वडवळ नागनाथ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी सदस्य, वडवळ नागनाथ येथील माजी सरपंच तथा ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य हर्षवर्धन बाबुराव कसबे (वय ५८) यांचे रविवारी (दिं.१६) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी (दिं.१७) दुपारी येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती गोविंद चिलकुरे, संजय दोरवे, माजी सदस्या उषा रोडगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील, चाकूरचे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, ॲड.माधवराव कोळगावे, वसंत डिगोळे, शिवकुमार चांडसुरे, नारायण कांबळे, राहुल गायकवाड, विवेकानंद पाटील, माणिकराव हलींगे, मच्छिंद्र कसबे, माया सोरटे, वसंत सोरटे यांच्यासह विविध पक्षातील राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विविध मान्यवरांनी भावांजली वाहिल्यानंतर सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
दरम्यान समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तालमीत तयार झालेले (कै.) कसबे यांचा येथील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात तसेच गावच्या विकासात मोठा सहभाग होता. सोमवारी येथील बाजारपेठ बंद ठेऊन व्यापाऱ्यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, भावजय, बहीण, पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार असून, त्यांच्या अकाली निधनाने सर्व स्तरातून तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.