शहर जिल्हा भाजपाची निवेदनाद्वारे मागणी
लातूर/प्रतिनिधीः- लातूर शहरातील वाहन पार्किंगला शिस्त लावण्यासाठी मनपा प्रशासनाच्या वतीने खाजगी एजन्सीधारकांना काम देण्यात आलेले आहे. या एजन्सीकडून शिस्त लावण्याच्या नावाखाली पार्किंग केलेल्या वाहनांना जामर लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर या एजन्सीधारकाने जे कर्मचारी ठेवली आहेत त्यांची मनमानी आणि बेशिस्त वागणुकीने लातूकरांना सातत्याने मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच जोपर्यंत शहरात पार्किंगची व्यवस्था होत नाही तो पर्यंत जामर नको या प्रमुख मागणीसह विविध मागण्या लातूर शहर जिल्हा भाजपाने मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.
लातूर शहर जिल्ह्याचे ठिकाण असून या ठिकाणी विविध कामानिमित्त आणि बाजारपेठेत खरेदीसाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक नागरीक गर्दी करीत असतात. या नागरीकांकडे असलेली वाहने कोठे उभी करावीत असा प्रश्न पडलेला असल्यामुळे अनेक नागरीक जागा मिळेल तेथे वाहने उभी करतात. मात्र या वाहनांना पालिका प्रशासनाने नेमलेल्या खाजगी एजन्सीकडून जामर लावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असून वाहनधारकडून अव्वाच्या सव्वा दंड जबरदस्तीने वसुल करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे या एजन्सीने हे काम करण्यासाठी ज्या कर्मचार्यांची नेमणूक केली आहेत ते कर्मचारी सर्वसामान्य नागरीकांशी असभ्य वर्तन करून त्यांच्याशी अर्वाच्च भाषेत बोलत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रकार घडत असून याचा महिला वर्गालाही मोठा त्रास होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असून बाजारात खरेदीसाठी महिलांसह नागरीकांचीही मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे वाहनपार्किंगची व्यवस्था तात्काळ पालिका प्रशासनाच्या वतीने होणे अपेक्षीत आहे. मात्र या सर्वच प्रकाराकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.

सदर बाब लक्षात घेऊन लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष देविदास काळे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये जो पर्यंत पार्किंगची व्यवस्था होत नाही तो पर्यंत जामर बंद करण्यात याव्यात ही प्रमुख मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वाहन पार्किंगसाठी शहराच्या मुख्य बाजारपेठेसह विविध मार्गावर नव्याने पिवळे पट्टे ओढण्यात यावेत, फुटपाथसह रस्त्यांवर हातगाडी व टपरीधारकांनी केलेले अतिक्रमण तात्काळ हटवून फुटपाथ मोकळे करावेत. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ज्या एजन्सीला काम दिले आहे त्या एजन्सीचे नाव, त्याचा संपर्क क्रमांक व कोणत्या वाहनाला किती दंड लावण्यात येणार याबाबतचे माहिती फलक शहराच्या विविध भागात लावण्यात यावेत तसेच ज्या एजन्सीला काम दिले आहे त्या एजन्सीसाठी काम करणार्या कर्मचार्यांना ड्रेसकोड व ओळखपत्र सक्तीचे करावेत. जामर लावण्याची सुचना स्पिकरच्या माध्यमातून देण्यात यावी आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून शहर भाजपाने केलेल्या आहेत. वाहतुकीला शिस्त लावावी मात्र ती शिस्त नागरीकांच्या लुटीसाठी नसावी अशी अपेक्षा व्यक्त करून आगामी काळात अशा प्रकारची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी. त्याचबरोबर या निवेदनाच्या नंतरही पालिका प्रशासनाने याबाबत ठोस पाऊले न उचलल्यास शहर जिल्हा भाजपाच्या वतीने आणखीन तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी भाजपाने केलेल्या मागण्याचा लवकरात लवकर योग्य विचार केला जाईल आणि जोपर्यंत व्यवस्था होणार नाही तोपर्यंत जामर लावण्यात येणार नाहीत. असे आश्वासीत केले आहे.
या निवेदनावर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, माजी स्थायी समिती सभापती अॅड. शैलेश गोजमगुंडे, अॅड. दिपक मठपती,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, माजी परिवहन सभापती मंगेश बिराजदार, संगीत रंदाळे, विशाल जाधव, देवानंद साळूंके, प्रविण अंबुलगेकर, सौ. रागिनी यादव, सुनील मलवाड, गणेश गोमसाळे, सरचिटणीस अॅड. दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रविण सावंत, रवि सुडे, अॅड. प्रदिप मोरे, मंडल अध्यक्ष विशाल हवा पाटील., संजय गिर, संतोष ठाकूर, ज्योतिराम चिवडे, श्रीराम कुलकर्णी, मोहसिन शेख, प्रमोद गुडे, सुरेश राठोड, विवेकानंद उजळंबकर, शिवसिंह सिसोदिया, अनिल पंतगे, प्रविण येळे, आनंद कोरे, रविशंकर केंद्रे, अजय भुमकर, शिवदयाल बायस, धनंजय हाके, विवेक बाजपाई, राजकुमार गोजमगुंडे, किशोर जैन, मुन्ना हाश्मी, सुनील राठी, आकाश बजाज, निखिल गायकवाड, अॅड. अभिजित मदने, शेख सालार, गोपाळ वांगे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.