एक अतिशय खोटी अफवा सोशल मीडियावर फिरते आहे. शहारूख खान लतादीदींच्या अत्यंदर्शनावेळी थुंकला अशी ती अफवा आहे.
आपण कशावर विश्वास ठेवावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हजारो लोकांसमोर अंत्यदर्शन घेतानाच्या एडिटेड व्हिडियोमध्ये – शहारूख ने मास्क खाली घेतला म्हणजे शाहरुख थुकला ! असा विदवत्तापूर्ण निष्कर्ष काही उजव्या मंडळींनी काढला आहे.
सर्वात प्रथम हे समजून घ्यायला हवे की ,

1) मुस्लिम द्वेष किंवा कोणाचाही जन्मावरून द्वेष हा शत प्रतिशत मूर्खपणा असतो . इस्लाम धर्माची चिकित्सा झाली पाहिजे . इस्लामी राजकारणाला विरोध समजू शकतो .पण सरसकट मुस्लिम व्यक्तीचा द्वेष करणे चूक . असा आंधळा द्वेष हिंदूंना भगवे इस्लामी बनवेल .
2) शाहरुख हा सरळ दाऊदचा माणूस आहे असे माझे मत आहे . पण म्हणून त्यावर खोटे आरोप करू नयेत . खोटे बोलल्याने खऱ्या आरोपातली हवा निघून जाते
3) हजारो लोकांसमोर असे थुकणे वगैरे कोणीही करत नसतात , इतपत अक्कल प्रत्येकाला असणे अपेक्षित आहे .
यात सर्वात महत्वाचा मुद्दा आंधळ्या मुस्लिम द्वेषाचा आहे. मुसलमान पावात थुकतात म्हणून बेकरी वर बहिष्कार . मुसलमानांचा स्पर्श नको आर्थिक व्यवहार नको …. सरसकट मुस्लिमाना हीन लेखणे , त्यांना पंक्चरपुत्र म्हणणे हा सर्व व्यक्तीद्वेष आहे . मुजोरी आहे . हे सर्व करून हिंदूंचा कोणताच फायदा नाही . उलट एका नकारात्मक द्वेषाच्या खाईत घेतलेली ही उडी आहे .
याच फेसबुक वोल वर इस्लाम धर्माची कठोर चिकित्सा मी आधी केली आहे . यापुढेही करेन . इस्लामचा राजकीय हस्तक्षेप हा सगळ्या जगासमोरचा प्रॉब्लेम आहे . आज इस्लामी कायदे लागू करणे मूर्खपणा आहे आणि मध्ययुगीन रानटी विचारावर टीका होणे क्रमप्राप्त आहे .
मुस्लिम व्यक्ती आणि इस्लामी राजकीय विचार यात फरक करायला शिकले पाहिजे. व्यक्तीशी व्यवहार करताना धर्माचा विचार करण्याची गरज नाही . आणि राजकारणात इस्लाम ढवळाढवळ करत असेल तर त्याला विरोध करायला लाजायची गरज नाही.
आपण हिंदूंनी – हिंदुत्व वाद्यानी नेमके उलटे वर्तन चालवले आहे . इस्लाम धर्माची आपण ( न वाचताच ) स्तुती करतो. सर्व धर्म समभावाची गाणी गातो . आणि दुसरीकडे गरीब अडाणी मुस्लिमाचा द्वेष करतो. यांच्या नेमके उलट वर्तन अधिक हिंदू हिताचे आहे .
मुसलमान एकजिनसी नाहीत आणि सारेच मुसलमान इस्लाम धर्म जसाच्या तसा पाळत नाहीत . इस्लाम धर्माला आणि इस्लामिक राजकारणाला विरोध योग्य आहे पण ….. मुस्लिम माणसाचा द्वेष चूक आहे .
लता मंगेशकर यांच्या सारखं व्यक्तिमत्त्व जात,धर्म, प्रांत, देश, खंड, लिंग, भाषा या सगळ्या भिंती ओलांडून कोट्यावधी लोकांच्या मनावर अधिराज्य करत असतं.

त्यामुळे त्यांच्या पश्चात आपले स्थानिक राजकारण, हेवेदावे यांचे सावट जोडणे म्हणजे विकृती. आपलं वागणं विकृतीकडे झुकत चाललं नाहीये न हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे.
लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. ही वेळ थोड्या जवाबदारीने वागण्याची आहे.
- डॉ अभिराम दीक्षित