विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत तर्फे शैक्षणिक, सामाजिक व अध्यात्माच्या क्षेत्रात कार्य करणार्या पंचकन्यांना
‘पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर…
लातूर, २३ मे: विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे तर्फे पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड यांच्या नवव्या पुण्यस्मरण/ स्मृतिदिनाचे औचित्य साधून, ज्ञान-विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून आयुष्यभर समाजप्रबोधन व सांप्रदायिक सद्भावनेचे सेवाभावी कार्य समर्पित व निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे करून, समाजासमोर आदर्श निर्माण करणार्या, सत्शील प्रवृत्तीच्या, महाराष्ट्रातील थोर तपस्विनी, सतीसाध्वी अशा कुलीन पंचकन्याना (५) “पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व पुणे येथील पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा माता कृष्णा कश्यप, ज्येष्ठ समाजसेविका व थोर तपस्विनी श्रीमती शशिकला भिकाजी केंद्रे, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ व ज्येष्ठ समाजसेविका डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकर, निवृत्त प्राचार्यां व आपुलकी या संस्थेच्या संस्थापक संचालिका डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्ते आणि ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती लक्ष्मीबाई महादु शेळके यांचा समावेश आहे.

सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक व रोख रु. २१,०००/- (रुपये एकवीस हजार) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार, दि. २७ मे २०२२ रोजी, सकाळी १०.३० वा. मानवतातीर्थ म्हणून ओळखल्या जाणार्या रामेश्वर (रूई), ता.जि. लातूर येथे संपन्न होणार आहे.
या समारंभासाठी लोकसभेचे माजी सभापती व माजी केद्रीय गृहमंत्री मा.श्री. शिवराज पाटील चाकुरकर हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नालंदा विद्यापीठाचे कुलपती व जगप्रसिद्ध संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील, अशी माहिती माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे कार्यकारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय विश्वस्त राहुल विश्वनाथ कराड व एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक आमदार रमेशअप्पा कराड यांनी दिलीे.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का कराड या भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या सेवेत अत्यंत श्रद्धा, निष्ठा व भक्तिमय असे व्रतस्थ आणि समर्पित जीवन जगल्या. त्यांच्या कार्यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, हा या पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे.

पुरस्कार विजेत्यांचा अल्प परिचय खालीलप्रमाणे-
पूज्य माता कृष्णा कश्यपः माता कृष्णा कश्यप यांनी संपूर्ण जीवनभर त्याग आणि समर्पणाच्या भावनेतून आणि ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ हे परमध्येय ठेऊन, अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने सन १९९९ रोजी पुणे येथे पुण्यधाम या सेवाभावी आश्रमाची स्थापना केली. त्या ‘पूज्य माताजी’ म्हणून संपूर्ण भारतभर ओळखल्या जातात. समाजातील दीनदुबळे, गोरगरीब व गरजवंतांची अखंड सेवा त्या करीत असतात. नैसर्गिक आपत्तीत पीडितांना मदत करणे, गरजू मुलांना शिष्यवृत्ती, विधवांचे पुनर्वसन, रक्तदानाची व्यवस्था करणे, असे विविध सामाजिक उपक्रम त्या राबवित आहेत. समाजातील तळागाळातील लोक तसेच कष्टकरी, शेतकरी व कामगार यांच्यासाठी मोफत वैद्यकीय व नेत्र शिबिरे, फिरते दवाखान्याच्या माध्यमातून देखील त्या लोकांची अव्याहतपणे सेवा करीत आहेत.
श्रीमती शशिकला भिकाजी केंद्रेः अत्यंत समर्पित भावनेने, श्रद्धेने, निष्ठेने व खर्या अर्थाने भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानानुसार शशिकलाताई अतिशय व्रतस्थ जीवन जगल्या आहेत. स्वत: अशिक्षित असूनसुद्धा, माऊलींची ज्ञानेश्वरी व हरिपाठ, जगद्गुरूंची गाथा, नाथांचे भारूड व भागवत या ग्रंथांचे आयुष्यभर चिंतन, मनन व त्यानुसार आचरण त्यांनी केले आहे. अत्यंत मधुर स्वरामध्ये विविध अभंग, ओव्या, भारूड हे अतिशय तन्मयतेने त्या सादर करतात.
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धिचे कारण ॥ व जे जे भेटे भूत । तयासि मानिजेे भगवंत ॥ या उक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असेच जीवन त्या जगत आहेत. तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरू तुकाराम महाराज व पंढरीचा पांडुरंग यांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा व अपार भक्ती हा त्यांच्या जीवनाचा स्थायिभाव आहे. गेली अनेक वर्षे त्या आषाढी व कार्तिकी वारी नित्यनियमाने करीत आहेत.

डॉ. तेजस्विनी जनार्दन वाडेकरः डॉ. तेजस्विनी वाडेकर या अतिशय निष्णात स्त्रीरोगतज्ञ असून, त्यांचे पती वै. डॉ. जनार्दन वाडेकर यांच्या जोडीने त्यांनी अत्यंत निरलस, निस्वार्थी, निरपेक्ष व निस्पृह भावेने रुग्णसेवा आयुष्यभर केली आहे. पुणे येथील सुप्रसिद्ध बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये त्यांनी अध्यापन केले असून, कुटुंबकल्याण व स्त्रियांचे आरोग्य या विषयावर त्यांनी आकाशवाणीवरून समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व लैंगिक शिक्षण यावर अनेक शिबिरे व व्याख्याने आयोजित केली होती. किनवट व माहूर या सारख्या दुर्लक्षित भागात मोफत आरोग्य शिबिरे घेतली होती. श्री सत्य साईसेवा समितीच्या माध्यमातून २०० स्त्रियांची मोफत कर्करोग तपासणी केली होती. त्याचबरोबर ७ हजार वृक्षारोपण व संवर्धन करून पर्यावरण संरक्षणासाठी ही त्यांनी कार्य केले आहे.
डॉ. ललिता शरद (नानासाहेब) गुप्तेः डॉ. ललिता गुप्ते या एक निष्ठावंत शिक्षिका असून त्यांनी गेली ३४ वर्षे अध्ययन व अध्यापन केलेले आहे. आज, वयाच्या ८५ व्या वर्षीही त्या आपुलकी या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून अत्यंत निरपेक्ष व समर्पित भावनेने समाजसेवेचे व लोककल्याणाचे महान कार्य करीत आहेत. शिक्षक प्रशिक्षण, पालक प्रबोधन, कार्यकर्ता प्रशिक्षण, एनसीसी व्याख्यानमाला. व्यवस्थापन, प्रकल्प नियोजन-कार्यवाही, लेखन, वाचन, नाट्य, वक्तृत्व स्पर्धा, सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था इ. क्षेत्रात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. अनेक वर्तमानपत्रातून जीवन शिक्षण, शिक्षण समीक्षा, नव शिक्षक, मैत्रिच्या पलिकडे, पालक शिक्षक, शिक्षक आणि समाज, शिक्षण संक्रमण अशा विषयांवर त्यांनी विपुल लेखन व त्याद्वारे समाजप्रबोधन केले आहे. तसेच आकाशवाणी वरून हिंदी पाठ, हिंदी कार्यक्रम, चर्चा, गृहिणी, बालोद्यान, शैक्षणिक कार्यक्रम व मुलाखती असे ४५० हून अधिक कार्यक्रम केले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी अनेक शाळा महाविद्यालय व सामाजिक संस्थांमध्ये एकूण २८४२ व्याख्याने दिली आहेत.
श्रीमती लक्ष्मीबाई महादू शेळके- श्रीमती लक्ष्मीबाई महादू शेळके या व्यवसायाने शेती करतात. एक निष्ठावंत वैष्णव वारकरी म्हणून दरवर्षी न चुुकता पंढरीची वारी करणे, तसेच हरिनाम, भजन, कीर्तन, यामध्ये त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. कोरडवाहू शेती असल्याने मजूरी करून, अत्यंत काबाडकष्ट व पडेल ते काम करून, आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले व त्याप्रमाणे त्यांना उत्तम डॉक्टर व उत्तम शिक्षक बनविले आहे. त्याग व समर्पणाच्या भावनेतून आणि कष्टाला परमेश्वर मानून त्या आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहेत.