औरंगाबाद : ( प्रतिनिधी )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परीक्षेच्या काही तास आधी परीक्षा केंद्रात बदल करण्याची परंपरा पदव्युत्तर परीक्षेतही कायम राखली आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा आज मंगळवार दि.२१ जूनपासून सुरू होत आहेत. त्यापूर्वी काल सोमवारी सायंकाळी एमबीए अभ्यासक्रमांच्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आले. अचानकपणे झालेला बदल विद्यार्थ्यांपर्यंत किती पोहचला याबाबत साशंकता असून विद्यार्थ्यांची धावपळ उडण्याची शक्यता आहे.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षा १ जूनपासून सुरू झाल्या तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा मंगळवार २१ जूनपासून सुरू होणार आहेत. पदवी परीक्षेत पहिल्याच दिवशी विद्यापीठ प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला होता. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यासह अनेक परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यानंतर पदव्युत्तर परीक्षेतही परीक्षा केंद्रात ऐनवेळी बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एमबीए अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे केंद्र बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी हा निर्णय घेण्यात आला. मंगळवारपासून परीक्षा सुरू होत असताना ऐनवेळी परीक्षा केंद्रातील बदल विद्यार्थ्यांना गोंधळात टाकण्याचा ठरू शकतो असे सांगण्यात येते. एमबीए अभ्यासक्रमासाठी शहरात देवगिरी अभियांत्रिकी व मॅनेजमेंट व एमजीएम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट असे दोन केंद्र निश्चित करण्यात आले होते. परंतु त्यात आता परीक्षा केंद्रात बदल करत तीन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

नवीन केंद्रातील अंतर दूर…
परीक्षेचे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट मिळालेले आहेत. त्यामुळे ऐनवेळी केंद्रातील बदल परीक्षार्थी विद्यार्थ्यांची धावपळ उडवणारी ठरण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पूर्वीचे निश्चित केलेले केंद्र हॉलतिकीटावर आहे. नव्याने बदलेले केंद्र हे शहरात जुन्या केंद्रापासून दूर आहेत. पूर्वी दोनच केंद्र होते, नव्या बदलात तीन केंद्र निश्चित करण्यात आले. त्यामुळे जुन्या केंद्रावर चुकून विद्यार्थी पोहचला तर पुन्हा त्याला नवीन केंद्रावर पोहचण्यास विलंब होणार आहे.