व्यक्तिगत संपर्कातून लढा उभारू शकतो – डॉ अशोक कुकडे
लातूर (प्रतिनिधी) – आणीबाणीचा कठीण काळ देशासाठी अतिशय बिकट होता. हा काळ मी केवळ अनुभवला नव्हे तर जगलो असल्याचे सांगून पद्मभूषण डॉ.अशोक काका कुकडे यांनी या आणीबाणी विरोधात लढा उभारताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तिगत संपर्काचा अतिशय मोलाचा वाटा होता. या संपर्कातूनच आणीबाणीच्या विरोधात लढा उभारून हि आणीबाणी संपुष्टात आणली. या आणीबाणीचा इतिहास विकसित भारताची संकल्पना मांडत असताना सर्वांना ज्ञात असणे आवश्यक असून याकरिता सध्याच्या व भावी पिढीने आणीबाणी विषयी साहित्याचे वाचन करावे, असे आवाहन डॉ.अशोक काका कुकडे यांनी केले आहे.

लातूर शहर जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणीबाणी दिवसा निमीत्त जे.एस.पी.एम. शैक्षणिक संकुलात पद्मभूषण डॉ.अशोक काका कुकडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, सरचिटणीस प्रवीण सावंत, अॅड.प्रदिप मोरे, सौ.मीना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते भारतमाता, पंडित दिनदयाळ उपाध्याय, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आणीबाणीच्या काळात २१ महिने तुरुंगवास भोगलेले पद्मभूषण डॉ.अशोक काका कुकडे यांनी आणीबाणीच्या काळ्याकुट्ट इतिहासाची पाने उलगडताना आणीबाणीचा काळ म्हणजे लोकशाहीची हत्या करणारा काळ होता, असे सांगितले. या काळात देशाच्या राज्य घटनेला व संविधानाला बाजूला सारत व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली होती. विशेष म्हणजे या काळात संपूर्ण देशच तुरुंगसमान वाटत होता, असे सांगून या काळात इंदिरा गांधी यांच्या सरकार विरोधात किंवा त्यांच्या विचाराच्या विरोधात आंदोलने किंवा लढा उभारणाऱ्यांना कोणताही गुन्हा नसताना तुरुंगात टाकले जात होते. याकरीता मिसा कायदा अस्तित्वात आणून त्या अंतर्गत अटक झालेल्यांना न्यायालयासमोर उभे केले जात नव्हते. विशेष म्हणजे किती काळापर्यंत त्यांना तुरुंगात डांबायचे हे सुद्धा इंदिरा गांधी यांचे सरकारच ठरवत असल्याचे डॉ.कुकडे यांनी सांगीतले.

याच काळात सामाजिक व राजकीय असणाऱ्या जवळपास 22 संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही समावेश होता. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीच इंदिरा गांधी यांच्या विरोधात टिका अथवा आंदोलन केले नव्हते. तरीही ही बंदी आणून संघाच्या सरसंघचालकांसह हजारो स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले होते असे डॉ.कुकडे यांनी सांगितले. आणीबाणीच्या काळात वर्तमानपत्रांवर सुद्धा सेन्सॉरशीप आणून वर्तमानपत्रात काय छापायचे आणि काय नाही याचा अधिकारही सरकारने आपल्याकडे घेतला होता, असे सांगून डॉ.कुकडे यांनी यामुळे देशात कुठे काय चालू आहे याची माहिती जनतेला मिळत नव्हती. आणीबाणीचा काळ सुरुवातीला काही जणांना चांगला वाटला मात्र यानंतर याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आणि हळूहळू आणीबाणीच्या विरोधात लढा उभारण्यास सुरुवात झाली. हा लढा उभारताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनेचा आणि व्यक्तिगत संपर्काचा मोठा फायदा झाला असे सांगून यामुळेच आणीबाणीचा लढा संपूर्ण देशभरात अधिक तीव्र झाला असल्याचे डॉ.कुकडे यांनी सांगितले. लोकशाहीच्या तत्वाला तिलांजली देणाऱ्या या आणीबाणीच्या काळाचा जगभरातून तीव्र निषेध होऊ लागला होता. आंदोलनास बळ मिळत आहे असे लक्षात आल्या नंतर इंदिरा गांधी यांनी नमते घेत निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी यांच्या सरकारचा दारूण पराभव झाला आणि आणीबाणीचा काळ संपुष्टात आला, असे सांगून डॉ.अशोक काका कुकडे यांनी या आणीबाणीच्या काळाने मात्र देशातील जनतेला बरेच काही शिकवले आणि यातून राजकीय पक्षांनी बोध घेतला असे सांगितले.
या आणीबाणीच्या लढ्यामुळे व्यक्तिगत संपर्कातून लढा उभारू शकतो हे सिद्ध झाले असे सांगून हा इतिहास काळा असला तरी तो विकसित भारत घडवण्यात ज्यांचा वाटा आहे त्यांना ज्ञात असणे आवश्यक असल्याचे डॉ.अशोक काका कुकडे यांनी स्पष्ट केले.याकरीता विधार्थ्यानी व तरुणांनी आणीबाणी विषयी लिखाण केलेल्या साहित्याचे वाचन करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी करताना सांगीतले की आणीबाणीचा काळ म्हणजे नेमके काय, या काळात लोकशाहीचा खुन कसा झाला याची माहिती देशातील प्रत्येकाला आणि विशेषतः पुढील पिढीस होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यामुळेच या कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण देशभरात भाजपच्या वतीने करण्यात येत असून असा आणीबाणीचा काळ पुन्हा कोणत्याच देशातील जनतेच्या नशिबी येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सौ.रागिणी यादव यांनी केले. या कार्यक्रमास सरचिटणीस अॅड.दिग्विजय काथवटे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मधुसुदन पारीख, मंडल अध्यक्ष विशाल हवा पाटील, काकासाहेब चौगुले, माजी नगरसेविका श्वेता लोंढे, स्वाती घोरपडे, संजय गीर, संतोष ठाकूर, भरत भोसले, शीतल पाटील, सीमा करपे, हेमा येळे, अजय भूमकर, रविशंकर लवटे, शशिकांत हांडे, किशन बडगीरे, उदय देशपांडे, मुन्ना हाश्मी, व्यंकटेश हंगरगे, संतोष इगवे, वैभव वनारसे, अरुण जाधव, मंदार कुलकर्णी, पंकज देशपांडे, सागर घोडके, संतोष तिवारी, प्रमोद गुडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व विधार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
