23.1 C
Pune
Thursday, June 19, 2025
Homeशैक्षणिकपरिपूर्णतेच्या दिशेकडे झेप

परिपूर्णतेच्या दिशेकडे झेप

वाढदिवस विशेष

प्रा.डॉ. मुंकुंद गायकवाड
ज्येष्ठ कृषी तज्ञ, पुणे

अण्णाभाऊ उर्फ विश्वनाथ कराड यांनी सहस्त्रचंद्राचे दर्शन घेतले आहे. हा क्षण व पुढील आयुष्य हे पाठीमागे वळून पाहण्यासाठी आणि समीक्षा करण्यासाठी असते. याचा विचार करता स्वतःच स्वतःनी निर्माण केलेला भ्रमाचा भोपळा फोडून पारदर्शकपणे वाटचालीकडे पहावे लागते. तसे विचार करता आतापर्यंत विश्वनाथ कराड यांना देवाने भरभरून माप दिलेले आहेत. तीन पिढ्यांची कुटुंब व्यवस्था पाहिली की एकापेक्षा एक व्यक्तिमत्व देवाने त्यांना बहाल केलेले आहे. त्यांचे स्वतःचे व्यक्तीमत्व त्रिगुणात्मक आहे. त्यामध्ये ब्रम्हा,विष्णू व महेश याप्रमाणे शिक्षण तज्ञ, धार्मिक माणूस व वारकरी बसलेले आहेत. त्यांच्या घराण्यामध्ये तीन भाऊ आणि कुटुंब शेतकरी असून आजही दोन भाऊ शेतीच करतात. या सर्वाचा विचार करता आणि त्यांच्या समग्र आयुष्याकडे दृष्टीक्षेप टाकतांना माझ्या ६० वर्षाची पत्रकारितापणाला लावून हा समिक्षात्मक लेख लिहीत आहे.
यापूर्वीचे मी त्यांचे अनेक वाढदिवस पाहिले. त्यांच्यावर लिहिलेली पुस्तके व पुरवण्या वाचल्या. त्यामध्ये जो स्तूती सुमनांचा भरघोष वर्षाव केलेला असतो. तो न करता त्यांचे आयुष्य सुवर्ण कळसापर्यंत कसे पोहचतील याकडे मुद्दाम लक्ष दिलेले आहे. तसं विचार करता त्यांची स्वतःची अपेक्षा व आकंक्षा, त्यांच्या कुटुंबाची अपेक्षा आणि त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा त्यांनी पूर्ण केलेली आहे. पंरतू खरा कार्यकर्ता कधीच संतुष्ट नसतो. तो आपल्या पदरी व आपल्या कार्याची अपूर्णता शोधत असतो. याचा विचार करता आतापर्यत त्यांनी केलेले कार्य सगळ्यांच्याच डोळ्यापुढे आहे. अनेक वेळा त्यांची उजळणीही झालेली आहे. त्यांनी आपले कार्य पुढच्या पिढीवर सोेपविले असून ते सक्षमपणे कार्य पूर्ण करतील याबद्दल कोणालाही शंका नाही.


ते मुळात शेतकरी कुटुबातील आहे. शेतकरी समाजाचा त्यांच्या बाबत आक्षेप आहे की त्यांनी खूप मोठे कार्य केले पण आमच्यासाठी काय केले? त्याहून त्यांची उत्तरे व भाषणे मी अनेक वेळा ऐकली आहेत. ते म्हणतात, बहुसंख्य शेतकरी हा वारकरी असतो. मग वारकर्‍यांसाठी मी आळंदीचा परिसर सुशोभीत केला, देहूला कमान उभी केली, वाखरीला लाखो भक्तांना महाप्रसाद देतो. या पेक्षा काय केले पाहिजे ? हे कार्य निश्चित पणे स्तुत्य आहे, परंतू त्यामुळे शेतकर्‍यांचे पोट भरत नाही. आजच्या जगण्याची, आर्थिक प्रश्नांची उकल या कार्यातून होत नाही.


एकदा त्यांच्याशी सहज चर्चा करीत असतांना त्यांनी मला प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर श्रेष्ठ की मार्स्क श्रेष्ठ. त्यावर त्यांना अपेक्षीत उत्तर होते की ज्ञानेश्वर श्रेष्ठ परंतू मी सांगितले की कार्ल मार्क्स श्रेष्ठ आहे. त्यांनी कोपर्‍यापासून मला नमस्कार केला आणि कारण विचारले. मी, सांगितले हजारो वर्षापासून मानव जातीची प्राथमिकता ही पोटाची राहिलेली आहे. कार्ल मार्क्सनी पोटासाठीचे तत्वज्ञान दिले. त्यामुळे आपल्या घटनेतील प्रियांबल मधील जे चार शब्द आहेत ते कोणत्याही संतांनी दिलेले नाही. त्यातील दोन कार्ल मार्क्स यांनी दिले आहे. ते म्हणजे निधर्मीपणा व समाजवाद आणि दुसरे दोन शब्द फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेले आहे. ते म्हणजे स्वातंत्र्यता आणि बंधुभाव. जगात ८०० कोटी लोक आहेत असे समजले तर त्यांच्या पर्यंत फक्त कार्ल मार्क्स चे नाव पोहचलेले आहे. जगातील १९३ देशांमध्ये सरकार जे कार्य करते ते समाजवादाच्या व्याख्येत बसणारे आहेत. जगातील मुस्लीम देश सोडले तर सुमारे १६० देश स्वतःला निधर्मी मानतात.
या पार्श्वभूमीवर ते तुकारामाचे एक अभंग सांगतात. वास्तविक तुकारामांनी ५ हजार अभंग लिहिलेले आहे. त्यांचा अभंगाचा ताल हा रंजल्या गांजल्यांसाठी आहे. स्वतःच्या मोठ्या पणासाठी तुकारामांनी काहीही लिहिलेले नाही. अण्णाभाऊ तुकारामाची एकच ओळ म्हणतात ती म्हणजे ‘अणू रेणू थोकडा, तुका आकाशा ऐवढा,’ या मध्ये त्यांची अपूर्णता दिसून येते. कारण रंजल्या गांजल्याची सेवा केवळ देवळे बांधून होत नाही तर त्यांची शांती ही पोटभर मिळाल्यानंतरच होते.
अण्णाभाऊ विश्वशांती बद्दल फार बोलतात. पण भारतातील व येथील ६४ टक्के शेतकरी समाजामध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. अशांतता निर्माण झालेली आहे. याकडे त्यांचे लक्ष का जात नाही? हा मला पडलेला प्रश्न आहे. त्यांच्या एका संस्थेमध्ये शेती कॉलेज सुद्धा आहे. पण तेथे शेतकरी दिन सुद्धा साजरा होत नाही. इतकी बेपरवाही पाहून मला खरोखर खूप आश्चर्य वाटते. म्हणून लेखाचे शिर्षक मी परीपूर्णतेकडे झेप असे दिलेले आहे.


त्यांनी समाजाची प्राथमिकता ओळखायला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. उदा. ते म्हणतात मी जगातील सर्वात मोठा घुमट बांधला. त्यात ५४ पुतळे बांधले, बद्रिनाथ येथे सरस्वतीचे मंदिर निर्माण केले. यामधून कोणता संदेश जातो. तर तो संदेश असा जातो की तुम्हाला डोळ्यांनी जे पाहिल्या जाते त्यालाच प्राथमिकता समजता आणि पोटाच्या प्रश्नांना मात्र उपेक्षा करता. ते अनेक वेळा आपल्या भाषणांंमध्ये सर्व धर्माचा अभ्यास करण्याकडे लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. ६२ हजार स्केअर फूटची लायब्ररी ही केवळ धर्माचा अभ्यास करण्यासाठी निर्माण केली जाणार आहे का? आश्चर्य असे की बहुतेक माणसे, आपल्या धर्माचा तर सोडाच दुसर्‍या धर्माचा कुठे अभ्यास करतात. मग या येवढ्या मोठ्या सामग्रीचा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे का?
याचा चांगला उपयोग कसा करावा या संदर्भातील सूचना त्यांना दिली आहे. त्या सूचना म्हणजे आता ग्रामिण भागामध्ये स्मार्ट फोन पोहचून तो जवळपास प्रत्येकाकडे आहे. शिक्षण येवढे महाग झालेले आहे की ग्रामिण भागातील मुले शिकूच शकत नाही. त्यासाठी ऑनलाइन विद्यापीठ या ६२ हजार स्केअर फूटामध्ये करावे. तसेच शेतकरी व त्यांच्या मुलांकडून पैसा न घेता कौशल्यवर्धन शिकविले तर त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटू शकेल. खर्‍या अर्थाने जगातल्या सर्वात मोठ्या घुमटावर सुवर्ण कळस चढविला जाईल.
ते शिक्षण तज्ञ आहेत. परंतू जगातल्या ५०० विद्यापीठामध्ये भारतातील एक ही विद्यापीठ नाही ते आपण कसे निर्माण करू याकडे लक्ष दिले तर परिपूर्ण निर्माण होईल. परंतू जे उपक्रम आणि पाठ्यक्रम परदेशी विद्यापीठाने ऑनलाइन निर्माण केले ते सहजपणे नेटवर पाहता येतात.


जगात व भारतात कौशल्य प्राप्त केलेले सेवानिवृत्त व्यक्ती भरपूर आहेत. त्यांच्या सोईने त्यांचे ज्ञान फूकट देऊ इच्छीता. त्यांची डिरेक्टरी या लाइब्ररीमध्ये ठेवली. ज्या तरूणांना कौशल्य शिक्षण पाहिजे त्यांची माहिती एकत्रित केली पाहिजे तर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या तंत्रज्ञानाने, आज जसे सभा संम्मेलने होतात त्या पद्धतीने अमेरीकेचा प्राध्यापक भारतातल्या आर्टस, कॉमर्स, १२वी झालेल्या विद्यार्थ्यांना सहज पैसा मिळवून देणारी कौशल्ये प्रदान करू शकेल. जे स्वप्न अक्का बाईंनी पाहिले असे ते म्हणतात ते स्वप्न देऊळ बांधून आणि वारकर्‍यांना जेवन देऊन पूर्ण होणार नाही. तर त्या वारकर्‍यांच्या घरात कौशल्य प्रदान करूनत्यांना ते कौशल्य शिकवून प्राप्त होणार आहे.
ख्रिश्चन धर्माच्या चर्च उपयोग जसा शिक्षणासाठी केला जातो. तसा आमच्या देवळांचा उपयोग कौशल्य प्रदान करणारे तळ म्हणून केला जावा. तरच यावर खर्च केलेला पैसा कामी लागला असे समजता येईल.
धार्मिक बाबतीत त्यांचे मन अयोध्यापर्यंत जाते. त्यांनी केलेल्या काही सूचना सुप्रिम कोर्टाने ग्राह्य धरल्या ते कौतुकास्पद आहे. ते आपल्या भाषणामध्ये स्वामी विवेकानदांच्या एका वाक्याचा सारखाच वापर करतात ते म्हणजे आम्ही २१ व्या शतकात विश्वगुरू होणार. त्याला चमत्काराची पुष्ठी ही देतात. विवेकांनदांनी ५० वर्षानंतर स्वातंत्र मिळणार हे सांगितले. मग हे ही खरे होणार. माझा त्यावर एक प्रश्न आहे की, समजा विवेकनंदांनी सांगितल्याप्रमाणे भारत जगदगुरू झाला तर भारताच्या नदया आपोआप स्वच्छ होणार काय? शेतकर्‍याच्या आत्महत्या थांबणार का? भुकबळी कमी होणार का? भारतातील ३० टक्के समाज कुपोषित आहे. तो पोषित होऊन सृदुढ होणार आहे का ? या व असे अनेक प्रश्नांचे उत्तरे नकारात्मक येते. बाबा वाक्य प्रमाणम व भुतकाळाचे गुलाम होऊ नका.
स्वामी विवेकांनदांचे सर्व वांडःमय वाचले की त्यांनी भारताच्या गरिबी विषयी लिहिले आहे की त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचे तीन आराध्य दैवत आहेत. ते म्हणजे संंत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व स्वामी विवेकानंद या तिघांनीही, पिडीत वर्गाची समस्या दुर करण्यावर भर दिलेला आहे. याचा विचार करता अण्णाभाऊंनी आतापर्यंत केलेल्या कामावर समाधान न मानता खर्‍या अर्थाने ज्ञानेश्वर, तुकाराम आणि विवेकानंदांच्या संपूर्ण कार्याकडे लक्ष दयावे. भारतीय समाजात शांतता कशी नांदेल असे उपक्रम जगातील सर्वात मोठ्या घुमटाद्वारे राबविल्यास हा समाज त्यांना कित्येक शतके डोक्यावर घेऊन नाचेल.
या लेखाचा समारोप करतांना माझ्या डोळ्यापुढे अण्णाभाऊंनी केलेले आतापर्यंतचे आश्चर्यकारक कामांची यादी डोळ्यासमोरुन जाते. त्यांनी ६३ दिवसांत बद्रिनाथ येथे मंदिर उभारले. जो ताजमहल उभारायला २५ वर्ष लागले तो घुमट १० ते १२ वर्षात त्यांनी उभारला. याचा अर्थ परमेश्वरांनी त्यांना भरपूर सहाय्य केले व सामर्थ ही दिलेले आहे. त्यांच्या मनात आले की ते काहीही सहजपणे व कमी वेळात करु शकतात. म्हणून सहस्त्रचंद्र दर्शनानंतर त्यांनी आपल्या कामाचे स्वरूप बदले पाहिजे. झाले ते कार्य पुढे नायला त्यांची दुसरी पिढी समर्थ आहे. त्यांच्यामध्ये लूडबूड करण्याची गरज ही नाही. त्यांचे आरोग्य आणि आर्थिक स्थिती ही मजबूत आहे. कर्मचार्‍यांचा भरणा भरपूर प्रमाणात आहे. या सर्व सामुग्रीचा उपयोग तळागळातील माणासांसाठी झाला तर ते खर्‍या अर्थाने ‘विश्वशांती’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या कडे वाटचाल करु शकतील. नुसते भाषण देऊन आणि पाट्या बदलून विश्व शांती होत नाही. भारतीय समाज यामुळेच मागे राहिलेला आहे. आमची व परदेशी विद्यापीठांची तुलना केले तर आमच्या विद्यापीठातील तज्ञ व्यक्ती भाषण देणे येवढेच कार्य समजतात. कृती करणे, समाजाचे प्रश्न सोडविणे हे आपले काम नाही असे मानल्यामुळे व बिंबविल्यामुळे एक ही शास्त्रज्ञ जन्माला येत नाही. अच्यूत गोडबोले यांनी ‘ किमयागार’ या पुस्तकात सर्व जगातील शास्त्रज्ञांची चरित्र गंठित केले आहे. ते वाचतांना असे जाणवते की भारतीय समाजावर निष्कारण बोलण्यावरच जास्त भर दिला गेला आहे. कृतीकडे दुर्लक्ष केले आहे. या सगळ्यांचा विचार करता जगामध्ये शांतते ऐवजी कृतीशिल शिक्षण देणारे एकमेव विद्यापीठ अण्णाभाऊंनी निर्माण केले तर त्यांची झेप व वाटचाल राहिलेल्या वर्षात पूर्णात्वाकडे जाऊ शकेल.
वाढदिवसा निमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]