इचलकरंजी/प्रतिनिधी –
ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी महापालिकेचे नुतन आयुक्त सुधाकर देशमुख यांची भेट घेऊन शहरातील पाणी आणि आरोग्य यांना प्राधान्य देऊन हे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. आयुक्त श्री. देशमुख यांनी प्राधान्याने सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासह इचलकरंजी महापालिकेला लौकिक प्राप्त करुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.

इचलकरंजी नगरपालिकेचे नुकतेच महापालिकेत रुपांतर झाले असून आयुक्तपदी सुधाकर देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुतन आयुक्त श्री. देशमुख यांची सदिच्छा भेट घेत ताराराणी पक्षाच्यावतीने इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
इचलकरंजी शहर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. वस्त्राद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने उदरनिर्वाहाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोपर्यातून अनेक कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. कामगारांची संख्या लक्षणीय असून हे कामगारांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. शहरात पाणी, आरोग्य आणि दिवाबत्ती या आवश्यक सुविधांची गरज आहे. मात्र शहरात काही वर्षांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहेत.

शहर कोंडाळामुक्तची अंमलबजावणी केली जात असली तरी शहरातील अनेक भागात कचर्याचे ढिग साचलेले दिसून येतात. तर संपूर्ण शहरात उभारण्यात आलेले एलईडी दिव्यांची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक त्याठिकाणी मागणी करुनही दिवाबत्तीची सोय देण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. कचरा उठाव व साफसफाईचे काम ठेकेदारामार्फत होत असले तरी त्यामध्ये सातत्य दिसत नसल्याने कचरा साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होते. त्यामुळे प्राधान्याने पाणी आणि आरोग्य या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी श्री. दत्तवाडे यांनी यावेळी केली. आयुक्त श्री. देशमुख यांनी, मध्यंतरीचा काळ वगळता इचलकरंजी नगरपालिकेचा जो लौकिक होता तो महापालिका म्हणून पुनश्च मिळवून देण्यासाठी आणि नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, राजाराम बोंगार्डे, माजी नगरसेवक दीपक सुर्वे, राजू बोंद्रे, संजय केंगार, एम. के. कांबळे, नितेश पोवार, रमेश पाटील, कुमार पलंगे आदी उपस्थित होते.