आमदार महाशय, श्रेय सहजासहजी मिळत नाही त्यासाठी मेहनत परिश्रम लागतात – अॅड. सरवदे
लातूर दि.१३– कोणतेही काम सहज होत नाही त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात. पाठपुरावा, मेहनत करावी लागते त्याशिवाय श्रेय मिळत नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी पानगाव ते खरोळा फाटा दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी केलेले प्रयत्न आणि पाठपुरावा कोणीही नाकारू शकत नाही. याची जाणीव असूनही लातूर ग्रामीणच्या आमदार महाशयांनी सदरील कामाचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला असून श्रेय लाटण्याचा हा प्रकार समजण्याइतकी जनता दूधखुळी राहिली नाही असे भाजपाचे रेणापूर तालुका अध्यक्ष अँड दशरथ सरवदे यांनी बोलून दाखविले.
परळी- धर्मापुरी – पानगाव – खरोळा पाटी – रेणापूर फाटा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ हा रस्ता लातूर व बीड जिल्ह्याला जोडणारा असून धर्मापुरी ते पानगाव आणि खरोळा पाटी ते रेणापूर फाटा रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र पानगाव ते खरोळा पाटी दरम्यानच्या १४ किलोमीटर लांबीचे काम रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी अडथळा निर्माण केल्यामुळे पूर्ण होऊ शकले नव्हते काम रखडल्याने सदरील रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने अनेक अपघात या रस्त्यावर झाले वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

रस्त्याची दूरवस्था लक्षात घेऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी संबंधित शेतकऱ्यांना रस्त्याचे महत्त्व पटवून दिल्याने सदरील रस्त्याचे काम करू देण्यास शेतकऱ्यांनी सहमती दिली. तेव्हा आ. कराड यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रस्त्याच्या दूरवस्थेची आणि रस्त्यालगतचे शेतकरी काम करू देण्यास तयार असल्याची माहिती दिली. आ रमेशआप्पा कराड यांनी आग्रही मागणी करून रस्त्याचा प्रश्न तात्काळ निघाली काढावा अशी विनंती केली असता ना. गडकरी यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतच्या तातडीने सूचना दिल्या.
ना. नितीनजी गडकरी यांच्या सूचनेनुसार आणि आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुरावाने पानगाव ते खरोळा फाटा दरम्यानच्या रस्त्याचे काम तातडीने व्हावे याकरिता प्रशासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात आली. सदरील रस्त्याचे नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली येत्या महिना दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून सदरील रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे बुजविण्याचे काम संबंधित एजन्सी कडून करण्यात येत आहे असे सांगून भाजपाचे तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे म्हणाले की, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नामुळेच पानगावच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही तरीही या रस्त्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा केवीलवाना प्रयत्न लातूर ग्रामीणच्या आमदार महोदयांनी सोशल मीडियातून केला आहे.
पानगावचा हा रस्ता केंद्रीय वाहतूक मंत्रालयात अंतर्गत असून केंद्रात कोणाची सत्ता आहे. या रस्त्याला कोणी मान्यता दिली नव्याने निविदा प्रक्रिया कोणामुळे सुरू झाली याबाबतची जाणिव पानगावसह रेणापूर तालुक्यातील जनतेला आहे. जनता ना समजणे इतकी दूधखुळी नाही. फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रकार यापूर्वीही अनेक वेळा झाला आताही सुरू आहे तेव्हा आमदार महाशय आणि त्यांच्या पिल्लावळाणी असले प्रकार थांबवावेत असेही अँड. दशरथ सरवदे यांनी बोलून दाखवले.
