पालकमंत्री देशमुखांनी घेतला ऊस परिस्थितीचाआढावा

लातूर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे मे अखेर गाळप
होईल या दृष्टीने नियोजन करावे
ना. अमित विलासराव देशमुख
लातूर जिल्ह्यातील शिल्लक ऊस परिस्थितीचा घेतला आढावा

साखर कारखाने, शासनाच्या कृषी विभागाने एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक ऊसाची माहिती संकलित करावी
ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून एकमेकांना सहकार्य करावे
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात.
अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणीची माहिती लेखी स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी
सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांची संपर्क करून तेथील साखर कारखान्यातून मार्फत लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे
मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा
साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान आणि ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत वसंतदादा शुगर इन्सट्यूटकडून मार्गदर्शन घ्यावे


लातूर प्रतिनिधी : शुक्रवार दि. १८ मार्च २०२२ :


यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाचे एकरी उत्पादन वाढून तोडणी कार्यक्रम लांबला आहे असे असले तरी जिल्हयातील सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय राखून मे अखेर पर्यंत सर्व ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन करावे, हे करीत असतांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसाड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत.


पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हयातील शुक्रवार दि. १८ मार्च २०२२ रोजी दुपारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात लातूर जिल्ह्यातील सर्व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील आता पर्यंतचे ऊसाचे गाळप तसेच शिल्लक ऊस परिस्थितीचा आढावा घेतला या प्रसंगी ते बोलत होते.
या बैठकीस लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, नॅचरल शुगर लि.चे चेअरमन बी.बी.ठोबरे, साई शुगरचे चेअरमन राजेश्वर बुके, रेणाचे कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजुळगे, विभागीय सहनिबंधक (साखर) बी.एल.वागे, जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखानाचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे,टवेन्टिवन शुगर लि.चे व्हा.चेअरमन विजय देशमुख तसेच जिल्हयातील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत बोलतांना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हयातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी गळीत हंगामाच्या या पूढील कालावधी देखील कारखाने अधिकाधिक कार्यक्षमतेने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे मे अखेर पर्यंत गाळप होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. या ऊसाचे सर्व कारखान्यांना नियोजनपूर्वक गाळप करता यावे यासाठी साखर कारखान्यानी आणि शासनाच्या कृषी विभागाने शिल्लक असलेल्या ऊसाचा एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक ऊसाची माहिती संकलित करावी. ही माहिती अदययावत झाले नंतर जास्तीत जास्त ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून एकमेकांना सहकार्य करावे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात. अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणीची माहिती लेखी स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी म्हणजे शासन पातळीवरून आवश्यक ती मदत मिळणेसाठी पाठपूरावा केला जाईल. शेजारी जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्पयात आहे या कारखान्यांना आवश्यक ते सहकार्य करून ऊस घेऊन जाण्यासाठी विनंती करावी. सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांची संपर्क करून तेथील साखर कारखान्यातून मार्फत लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे, मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा, जास्तीचे दिवस साखर कारखाना चालवल्यानंतर साखर कारखाना होणाऱ्या नुकसानीबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून माहिती घेऊन शासनाकडे सादर करावी, ही माहिती मिळाल्या नंतर साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान आणि ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत वसंतदादा शुगर इन्सट्यूटकडून मार्गदर्शन घ्यावे आदी सुचना पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी या बैठकीत केल्या आहेत.

प्रारंभी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी जिल्हयातील एकूण ऊस्‍ परिस्थितीचा आढावा सादर केला. त्यानंतर साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाकडून त्यांच्या कारखान्यातील गाळपाची माहिती देण्यात आली. संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोबरे, साई शुगरचे राजेश्वर बुके यांनी तसेच कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी यांनी ऊस गाळप बाबतच्या सुचना मांडल्या.