लिंगायत स्मशानभूमी व स्टॅच्यू ऑफ नॉलेजचे काम तात्काळ मार्गी लावून लातूर शहरातील विकासकामांना गती द्या
पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे मनपा प्रशासनाला निर्देश
लातूर प्रतिनिधी – लातूर शहरातील कन्हेरी परिसरात असलेल्या लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावून लातूर शहरात उभारण्यात येत असलेल्या स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उभारणी कामास लवकरात लवकर सुरुवात करावी असे निर्देश देऊन शहरातील इतर विकासकामांसाठी आवश्यक असलेल्या सर्व कार्यवाही पुर्ण करून या कामांना गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.

शहर जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी लातूर शहरातील लिंगायत स्मशानभूमी, स्टॅच्यू ऑफ नॉलेज, अंतर्गत भुयारी गटार योजना स्व.विलासराव देशमुख मार्ग, शहरातील बंद पथदिवे व त्यांची दुरुस्ती, अमृत योजना टप्पा २, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, नाट्यगृह, शादिखाना यासह जिल्हा रुग्णालयांच्या कामांबाबत पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मनपा प्रशासनाची बैठक घेऊन आढावा घेण्यात यावा अशी मागणी केली होती. यानुसार पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, अर्चना पाटील चाकूरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मनपा आयुक्त मानसी मीना, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, मनपा उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे, माजी शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, गुरुनाथ मगे, शैलेश गोजमगुंडे, दिपक मठपती, रागिणी यादव आदींसह प्रशासकीय अधिकारी, माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

लातूर शहरातील कन्हेरी परिसरात असलेल्या लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा अशी मागणी सातत्याने समाजबांधवांकडून होत आहे. समाजबांधवांची भावना व स्मशानभूमीची गरज ओळखून हा प्रश्न सोडवण्यासाठी मनपा प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना कराव्या असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांना दिले आहेत. शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उभारणी कामास तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले होते. मात्र अद्यापपर्यंत यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही असे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी निदर्शनास आणून दिले. स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या उभारणी कामास प्रशासकीय मान्यता अद्यापपर्यंत का दिली नाही याचा जाब विचारून मनपा प्रशासनाने या कामात कोणतीही दिरंघाई न करता तत्परतेने काम करावे अशी सूचना पालकमंत्री भोसले यांनी दिली.

लातूर शहरात अमृत योजनेचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेला असून याबाबत आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव आणि यासंदर्भात असणारी टिप्पणी तात्काळ नगरविकास विभागात दाखल करावे अशी सूचना देऊन यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावा करण्यात येईल असे पालकमंत्री भोसले यांनी यावेळी सांगितले. शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्यानजीक असलेल्या मोकळ्या जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह उभारण्यात यावे अशी मागणी होत असून याठिकाणी वाहनतळ होत असले तरी या वाहनतळाच्या वरच्या मजल्यावर सभागृह आणि वाचनालय उभारण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी तयार करून तो मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर शहरातील बंद पथदिवे व दुरुस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने त्वरित तयार करून तो मंजूरीसाठी मंत्रालय स्तरावर पाठवून द्यावा आणि हा मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारा पाठपुरावाही करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री भोसले यांनी दिली. यासोबतच शहरातील स्व.विलासराव देशमुख मार्ग, नाट्यगृह, शादीखाना ही विकासकामे गतीने पुर्ण करण्यासाठी तातडीने पावले उचलून यासाठी कोणतीही अडचण असल्यास सदर अडचण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात येईल असा विश्वास देऊन लातूर जिल्हा रुग्णालयाचा भुमिपूजन सोहळा लवकरात लवकर आयोजित करण्यासाठी प्रशासकीय व शासकीय स्तरावर सूचना दिलेल्या असून हा सोहळा लवकरच पार पडेल अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांना दिली.

या बैठकीच्या वेळी अजित पाटील कव्हेकर यांनी सदर विकासकामांबाबत आढावा बैठक आयोजित केल्याबद्दल पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानून प्रशासनाने शहरातील विकासकामे अधिक गतीने आणि दर्जेदाररित्या पुर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देऊन पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होईल असा विश्वास व्यक्त केला. लातूर शहर व परिसरात गत महिन्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकासह घरांचेही नुकसान झालेले असून या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर पुर्ण होऊन नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासनाला सूचना देऊन नुकसान भरपाई पासून कोणीही वंचित राहू नये याकरिता प्रशासन सतर्क राहील, अशी अपेक्षा अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगरसेवक व पक्ष पदाधिकारी यांनी मांडलेल्या समस्या आणि सुचनांबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.




