संततधार पावसामुळे सतर्क राहण्याची गरज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडतो आहे. कोकणात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार, मध्य महाराष्ट्रासह विदर्भातही पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोकण पट्ट्यावर आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची दाटी कायम असणार आहे . त्यामुळे ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो आहे. 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस अपेक्षित आहे .
21 आणि 22 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट रहाण्याचा इशारा देण्यात आला आहे . प्रामुख्याने पुणे, साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई उपनगरांमध्येही संततधार पावसाचा अंदाज आहे . 21 रोजी मुंबई, ठाण्याला आॅरेंज अलर्ट तर 22 जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे . ज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात अली आहे . नाशिक जिल्ह्यातही 22 जुलै रोजी सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला. विदर्भात पुढील 3-4 दिवस सर्वत्र पाऊस, 21 आणि 22 तारखेला अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 20 जुलैपासून बहुतेक जिल्ह्यात संततधार पाऊस पडतो आहे . काही ठिकाणी मुसळधार तर अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतो आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे . शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर 72 तासांच्या आत पीक विमा कंपनीच्या पोर्टलवर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात माहिती द्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे .
( फोटो : संग्रहित )