23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसाहित्यपुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

संत गाडगेबाबा कृतिशील कर्मयोगी- शिवानंद टाकसाळे

गंगाधर निमलवार यांच्या संत गाडगेबाबा जीवन व कार्य या पुस्तकाचे प्रकाशन

नांदेड,दि.१४

थोर संत गाडगेबाबा यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून वैराग्य स्वीकारून आयुष्यभर स्वच्छतेचा मूलमंत्र दिला.देशातील दुःख, पिडीतांना समजून घेऊन त्यांचं वाईट रुढी, प्रथा, परंपरेपासून प्रबोधन केलं. त्यामुळे ते कृतिशील कर्मयोगी आहेत.असे प्रतिपादन परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले.
गंगाधर नीलमवार यांनी लिहिलेल्या ‘संत गाडगेबाबा जीवन व कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, दैनिक सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संतोष पांडागळे, यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड साहित्यिक डॉ. राम वाघमारे, अखिल भारतीय धोबी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजीराव शिंदे, उद्योजक बालाजी इबीतदार, गटशिक्षणाधिकारी किशन फोले यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना टाकसाळे म्हणाले, गाडगेबाबा यांचे जीवन व कार्य अलौकिक स्वरूपाचे होते. त्यांची शिकवण आजच्या पिढीसाठी उपयुक्त आहे.
समाजव्यवस्थेने सेवेकरी यांना बदनाम केले आहे. व्यवस्थेत बारा बलुतेदार -आलुतेदार आहेत. त्यांचे स्थान आणि त्यांचा दर्जा काही बदललेला नाही तो बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. आपण खूप शिकलो, पण चांगला माणूस बनलो नाही. वाचून त्यानुसार जगणं महत्त्वाचं आहे असेही ते म्हणाले. आपले जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं असल्याचेही त्यांनी सांगितले.
समाजव्यवस्थेमध्ये जातिप्रथेच्या अंतासाठी रोटी-बेटी व्यवहार महत्त्वाचा आहे तो आता होतो आहे, भविष्यामध्ये यामुळे कदाचित जातीयता संपुष्टात येऊ शकेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. निसर्ग बरोबर या पद्धतीने जातो आहे, असेही ते म्हणाले.माणसाने सत्यशोधकी वृत्तीने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात गोविंद नांदेडे यांनी एका शिक्षकाने संत गाडगेबाबा यांच्या जीवन चारित्र्याचा पुवार्ध आणि उत्तरार्ध या दोन्ही बाजू पुस्तकात मांडल्या. या पुस्तकाचे बोलीभाषेमध्ये लेखन करून गाडगेबाबांचे कार्य लोकांसमोर मांडले आहे. हे अलौकिक स्वरूपाचे काम आहे. गाडगेबाबा यांनी कृतीतून जगाला तत्त्वज्ञान दिले आहे. या संताने अनेक परिवर्तनाचे पैलू मांडलेले आहेत.असेही ते म्हणाले.
बालाजीराव शिंदे यांनी गाडगेबाबांच्या जीवनावर विस्तृत प्रकाश टाकला.ते म्हणाले, गाडगे बाबांच्या जीवनाचा आलेख लेखकांनी परिश्रम पूर्वक मांडला आहे. गाडगेबाबा एकमेव असे कर्मयोगी आहेत ज्यांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. हे पुस्तक वाचल्यानंतर अनेकांचे डोळे उघडतील असे त्यांनी सांगितले.
संतगाडगे बाबा म्हणजे कृतिशील काम करणारा महात्मा होय.त्यांना शाळेची संधी मिळाली नाही. महापुरुषांच्या यादीत अनेक जण आपण पाहतो मात्र गाडगेबाबांचे स्थान हे वेगळे आहे असे बालाजी इबितदार म्हणाले.
यावेळी संतोष पांडागळे यांनी शाळेपासून परावृत्त राहिलेला हा संत मात्र आपल्या शिकवणीने सर्वांच्या मनामध्ये बसलेला आहे. त्यांच्या कार्याची आजही गरज आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीमध्ये गाडगे बाबांसारखा कृतिशील संत निर्माण झाला हे महाराष्ट्राचे भाग्य असून अनेक संतांच्या शिकवणीतून समान धागा असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. राम वाघमारे यांनी गाडगेबाबा यांच्या अनेक नव्या पैलूंना उजागर करण्याचे काम लेखकाने केल्याचे सांगितले. डॉ. बबन जोगदंड, किशन फोल यांनीही संत गाडगेबाबा यांच्या कार्यावर चौफेर प्रकाश टाकला.
प्रारंभी पुस्तकाचे लेखक गंगाधर निमलवार यांनी या पुस्तक लेखनामागची भूमिका विशद केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपिन पवनकर यांनी तर आभार गंगाधर मावले यांनी मानले.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]