एक रुपयात प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रत्येक शेतकऱ्यांनी विमा उतरवून घ्यावा
- मंत्री संजय बनसोडे यांचे आवाहन
लातूर दि.13(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. फक्त 1 रुपया नाममात्र तुमच्या नोंदणीच्या वेळी भरायचे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकही शेतकरी या योजनेपासून वंचीत राहू नये असे आवाहन राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यात पीक विमा योजनेच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी चित्र रथ फिरविण्यात येत आहे, त्या चित्र रथाला हिरवी झेंडी दाखवतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी (प्रभारी) श्रीमती रक्षा शिंदे, लातूर तहसीलदार ( प्रभारी ) श्रीमती शोभा पुजारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पिकाखाली क्षेत्र येते. खरीपाची पीकं पूर्णतः निसर्गाच्या अनुकूलतेवर अवलंबून आहेत. हवामानातील बदलामुळे होणारी गारपीट, वादळ, पूर, भुस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी संकट असतात. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही, त्यात शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान होते. अशावेळी त्याला या पिकाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीक विमा योजना महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार यांच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील गावागावात एक रुपयात पीक विमा काढता येते हे पोहचविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तीन तर जिल्ह्यात एकूण 30 चित्ररथ फिरत असल्याची माहिती यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती रक्षा शिंदे यांनी दिली.
