स्वकर्तृत्वातून मोठं होणे हा लातूरच्या मातीचा गुण
– प्रवीण सरदेशमुख यांच्या सत्कार समारंभात मंत्री संजय बनसोडे यांचे गौरवोद्गार
लातूर/ माध्यम वृत्तसेवा:’लातूरचा माणूस स्वकर्तृत्वाने मोठा होतो. लातूरची माती व पाण्याचा हा गुणच आहे’ असे गौरवोद्गार राज्याचे क्रीडा व युवककल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी काढले.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी समितीवर सदस्य म्हणून प्रवीण सरदेशमुख यांची निवड झाली.या निमित्ताने केदारनाथ प्रतिष्ठान,लातूर,विलासराव देशमुख फाउंडेशन, लातूर, सांदिपनी टेक्निकल कॅम्पस, लातूर, डी.बी.ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,महाळंग्रा, जीवनरेखा प्रतिष्ठान,लातूर, वेताळेश्वर शिक्षण संस्था, हासेगाव,भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री केशवराज शैक्षणिक संकुल, लातूर, नवनिर्माण प्रतिष्ठान, लातूर व महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूरच्या वतीने त्यांचा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बनसोडे बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. सुधाकर शृंगारे, आ.अभिमन्यू पवार,उद्योजक विवेक देशपांडे,ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी समितीचे सदस्य अशोक शेल्हाळकर,प्रा.डॉ.रघुनाथ होळंबे, राष्ट्रवादीचे ॲड.व्यंकट बेद्रे यांच्यासह डॉ.जगन्नाथ पाटील,माधवराव पाटील टाकळीकर,सुधीर धुत्तेकर, शैलेश कुलकर्णी,प्रवीण कस्तुरे, अशोक शिवणे,संजय गुरव, तुकाराम गोरे,सुनील होनराव, डॉ.ब्रिजेश अय्यर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना बनसोडे म्हणाले की, प्रवीण सरदेशमुख यांचे कार्य पाहतच आम्ही मोठे झालो.त्यांच्याकडे अगाध ज्ञान आहे.आता तंत्रशास्त्र विद्यापीठावर निवड झाल्यानंतर उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठी काय करता येईल ? याचा सल्ला त्यांनी आम्हाला द्यावा.सिंचनासाठी तंत्रज्ञान कसे वापरता येईल ? ते आम्हाला सांगावे.या विद्यापीठाचे उपकेंद्र लातुरात सुरू करण्यासाठी जे लागेल ते देण्यासाठी आपण प्रयत्न करू. सरदेशमुख यांच्यासारख्या व्यक्ती संसद व विधिमंडळात असायला हव्यात,असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना खा.सुधाकर शृंगारे यांनी लातूर हे शैक्षणिक हब असून त्या अनुषंगाने कुलगुरू डॉ.कारभारी काळे व प्रवीण सरदेशमुख यांनी लातूरसाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
आ.अभिमन्यू पवार म्हणाले, की सरदेशमुख यांचे ज्ञान व आवाका पाहता त्यांना मिळालेले हे पद अतिशय छोटे आहे. कार्यकर्त्यांसाठी ते प्रेरणास्रोत आहेत.एक चालतं बोलतं विद्यापीठ म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहत आलो. या विद्यापीठाचे उपकेंद्र लातुरला आणण्यासाठी सरदेशमुख यांनी प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले.

उद्योजक विवेक देशपांडे यांनी उत्तम नेता, कार्यकर्ता आणि अभ्यासक अशा शब्दांत सरदेशमुख यांच्या आजवरच्या कार्याचे कौतुक केले.घेतलेला वसा न टाकणारा हा मित्र आहे. त्यांच्यामुळे या पदाची शोभा वाढेल,असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी उपकेंद्राच्या मागणीबाबत सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.नवीन शैक्षणिक धोरणानुसार स्थापन करण्यात आलेल्या या विद्यापीठाच्या माध्यमातून देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.भारतीय ज्ञान परंपरा अतिशय समृद्ध असून या माध्यमातून आपला इतिहास जगासमोर मांडण्याची संधी उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले.

अशोक शिवणे,उमेश सेलुकर, जगन्नाथ पाटील, सुहास सरदेशमुख, प्रकाश रायचूरकर यांनीही प्रवीण सरदेशमुख यांच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रवीण सरदेशमुख यांनी यशस्वी होण्यासाठी मनाचा निश्चय व हजारो लोकांचे सहकार्य गरजेचे असल्याचे सांगितले. माझ्या यशात आई-वडील, संघाचे प्रचारक आणि प्रत्येक क्षेत्रात भेटलेल्या मार्गदर्शकांचा वाटा आहे.केलेले कर्म स्वतःला चिकटवून घ्यायचे नाही या भावनेतून कार्य करत आलो.यापुढेही त्याच पद्धतीने कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रवीण सरदेशमुख व सौ. सरदेशमुख यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुधीर धुत्तेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष बीडकर यांनी पद्य सादर केले. मुकूंद मिरगे यांनी त्यांना तबल्याची साथ दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय कुलकर्णी (माटेफळकर) व अश्विनी बिराजदार यांनी केले. प्रवीण कस्तुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. दयानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास लातूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.