मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी व्याख्यानमाला ; महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात पुष्प तिसरे संपन्न
लातूर दि.21 ( जिमाका ) मराठवाडा मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्र्य लढ्या एवढ्याच महत्त्वाचा असल्यामुळे या मुक्ती लढ्यातील सर्व विचार प्रवाहांचे सर्वंकष दर्शन होण्यासाठी समग्र इतिहास लेखन झाले पाहिजे असे मत लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील इतिहासाचे अभ्यासक व व्याख्याते भाऊसाहेब उमाटे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प प्राध्यापक प्रबोधिनीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात त्यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.

मराठवाडा मुक्ती लढा हा भारतीय स्वातंत्र्यलढा एवढाच महत्त्वाचा असल्यामुळे या मुक्ती लढ्यातील सर्व विचार प्रवाहांचे सर्वंकष दर्शन होण्यासाठी समग्र इतिहास लेखन झाले पाहिजे असे मत लातूरच्या ज्ञानेश्वर विद्यालयातील इतिहासाचे अभ्यासक व व्याख्याते भाऊसाहेब उमाटे यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प प्राध्यापक प्रबोधिनीतमहाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात त्यांनी गुंफले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे होते. मंचावर संस्थेचे सदस्य प्रा. मनोहर पटवारी, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार ,नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, प्रभारी प्राचार्य डॉ.बी. एम. संदीकर, उपप्राचार्य डॉ. आर. के. मस्के ,प्रा.अर्जुन सोमवंशी, माजी शिक्षणाधिकारी धोणे यांची उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती लढा इथल्या सर्वसामान्यांनी लोकशाहीच्या व जबाबदार राज्यपद्धतीसाठी दिला, त्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा लढा यशस्वी होण्यासाठी समाजातील अनेक व्यक्ती, संस्था यांचे योगदान असून अनेक विचार प्रवाहांचे सुद्धा तेवढेच महत्त्व असल्याचे सांगून मुक्ती लढ्याच्या अनेक पैलू या वेळी उमाटे यांनी उलघडून दाखविले. भारतीय स्वातंत्र्य चळवळीची परिपूर्ती या मुक्तिसंग्रामाने झाली. मुक्ती संग्रामाचा इतिहास हा त्यागाचा आहे. सामान्य जनतेच्या असीम त्यागातून मिळालेल्या स्वातंत्र्याची माहिती नवीन पिढीला नाही ती होण्यासाठी लेखन आवश्यक असल्याचेही यावेळी त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी प्रा. पटवारी म्हणाले, मराठवाडा मुक्ती संग्राम हा आपल्या भूमीच्या मुक्तीचा लढा आहे, तो विद्यार्थ्यांनी अभ्यासावा त्यातून समर्पण, देशासाठीचा त्याग कळेल आणि त्यातून देश व समाजासाठी योगदान देण्याची उर्मी मिळेल.
समारोपात ॲड. तोंडारे म्हणाले, स्वातंत्र्य मिळाले परंतु त्या स्वातंत्र्याचे विद्यार्थ्यांनी स्वराज्यात रूपांतर होण्यासाठी आपल्या भविष्यातील योगदाना बाबत सकारात्मक विचार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर. के. मस्के यांनी केले .सूत्रसंचालन प्रा.डॉ.जी .जी .जेवळीकर यांनी केले आभार प्रा. डॉ. एस .एम .सूर्यवंशी यांनी मानले.