शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याच्या पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचना; सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशनचे पथक लातूरात दाखल
—
लातूर : लातूर जिल्ह्यातील मांजरा व तेरणा नदी संगम परिसरात पुराचे पाणी वाढल्यानंतर शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बॅक वॉटर इफेक्ट्स स्टडीबाबत पालकमंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांनी केलेल्या सूचनेनुसार सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (CWPRS) चे पथक आज लातूरमध्ये दाखल झाले आहे. त्यांनी नदीकाठच्या गावांची पाहणी करण्यास सुरवातही केली आहे.

मांजरा व तेरणा नदीच्या संगमाजवळ पुराचे पाणी वाढल्याने पालकमंत्री श्री. अमित देशमुख यांनी तगरखेडा येथे जावून पुरस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर मंत्रालयात जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांची भेट घेऊन मांजरा व तेरणा नदीच्या संगम परिसरात बॅक वॉटर इफेक्ट्स स्टडी करण्याबाबत चर्चाही केली. श्री. पाटील यांनी या विषयाला सकारात्मक प्रतिसाद दिला.
त्यानुसार आज सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर (CWPRS) च्या पथकाने लातूरमध्ये येऊन संबंधित गावांची पाहणी केली. पुराचे पाणी वाढल्यानंतर या भागातील तगरखेडा गावापर्यंत, साडेतीन किलो मीटर लांबीमध्ये नदीकाठच्या जमिनी पाण्याखाली जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे नुकसान लवकरच टाळता येणार आहे. यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील आणि पालकमंत्री श्री. अमित विलासराव देशमुख यांचे लातूर ग्रामीणचे आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी आभार मानले.
—