000
‘‘आपण जे लिहिले त्यात माणसांचे श्वास तर नक्कीच भरून आहेत आणि माझी कविता किंवा माझे ललितलेखन हे सगळे माणसांच्या घामांना, त्याच्या परिश्रमाला घेऊनच जन्माला आलेले आहे,’’ असे मत ज्येष्ठ कवी, समीक्षक डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी ‘शिवारप्रतिभा’मध्ये व्यक्त केले आहे.

राज्यातील ३३ मान्यवर साहित्यिक-कवींनी या ग्रंथात डॉ. केशव देशमुख यांच्या समग्र साहित्याचा आपापल्या शैलीत परामर्श घेतला आहे. डॉ. बागूल यांनी डॉ. केशव यांच्या संपूर्ण साहित्याचा अभ्यास करून हे संपादन केल्याचे त्यांच्या प्रस्तावनेतूनच स्पष्ट होते.
हिंगोली जिल्ह्यातील तुप्पासारख्या खेड्यात अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. देशमुख यांची जडणघडण जिव्हाळ्याच्या व नात्याची गुंफण करणाऱ्या संस्कृतीत झाली. माती आणि नाती यांच्याशी लळा लावत आपल्या जीवनानुबंधाची शृंखला पुढे नेत त्यांनी नवी वाट निर्माण केली. समाजव्यवस्थेची दिशा बदलण्याचा ध्यास घेऊन त्यांनी आपल्या लेखणीला नवा आयाम दिला आहे, असे डॉ. बागूल म्हणतात. ‘शिवारप्रतिभा’मधील डॉ. द. ता. भोसले आणि डॉ. सदानंद देशमुख यांचे लेख डॉ. केशव यांच्या सृजनप्रक्रियेचा वेध घेणारे आहेत. कविता, ललितलेखनातून ग्रामसंस्कृतीची स्पंदनं जाणवतात. डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी ‘अस्सल देश्य जाणीवविश्वाची महत्त्वाची कविता’ अशा शब्दात त्यांचा गौरव केला आहे. ऐश्वर्य पाटेकर, राम शेवडीकर, डॉ. संजय कांबळे यांनी केशव यांच्यातील साहित्यिक आणि व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख वेधक शब्दांत मांडला आहे.

प्रतिमा-प्रतिकांचा संवादी काव्यभाव
डॉ. देशमुख यांच्या कवितेत विपूल आणि यथोचित प्रतिमा आहेत. बळीराजा आणि त्याच्या जित्राबाची सांगोपांग हकीकत त्यांच्या लेखनातून येते. ‘पाढा’, ‘चालणारे अनवाणी पाय’, ‘अथक’, ‘गाभा’ आणि ‘तंतोतंत’सारख्या काव्यसंग्रहानंतर ‘टिळा’मधूनही त्यांची जमिनीशी असलेली नाळ तुटलेली नाही. त्यांच्या प्रत्येक कवितेतून त्यांच्या प्रयोगशील प्रतिभेचे दर्शन घडतेच, पण प्रतिमा-प्रतिकातून संवादी होणारा त्यांचा काव्यभाव उजागर होत जातो. सगळे शेतकरी हे भूमीविद्यापीठाचे कुलगुरू आहेत, असे ते सांगतात, तेव्हा ते जमिनीच्या विज्ञानाची उकल करू पाहत असतात. कवीच्या विचारशृंखलेचा धागा मातीशी जुळलेला आहे आणि हा धागाच त्यांच्या जीवनांशाचा भाग आहे.
डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी देशमुख यांची कविता कुठेच आक्रस्ताळा स्वर न लावता, अगदी स्पष्ट, आणि नेमक्या चित्रणाने मेंदूत आरपार घुसते असे म्हटले आहे तर डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी स्वतःच्या त्वचेचे रंग सत्याच्या भूईवर पेरत निघाला आहे, त्यातून भाकरी साकार होणार आहे, इतका उदंड आत्मविश्वास कवी देशमुख यांच्यात आहे, असे नमूद केले आहे. अलकाताई केशव देशमुख यांनी ‘शब्दांसोबत आणि शब्दांपलिकडे’मध्ये आपल्या सहजीवनाचा प्रवास मांडला आहे. त्यातून केशव यांची भाववैशिष्ट्ये उलगडली आहेत. ‘सकाळ’मधून बोली आणि भाषेचे तत्व उलगडणारे डॉ. केशव देशमुख आपल्यातील शेतकरी कायम जागा ठेवत असतात.नव्या संकल्पना मूर्तरूप करताना शेतीमातीशी असलेली नाळ तुटू देत नाहीत, युवराज माळी यांच्यामुळे ‘शिवारप्रतिभा’ सुजाण वाचकांच्या भेटीस येऊ शकली, असे बागूल म्हणतात.
००००

आज प्रकाशन व चर्चा
डॉ. केशव देशमुख यांच्या साहित्याचा धांडोळा घेणाऱ्या ‘शिवारप्रतिभा’ या ग्रंथाचे उद्या रविवारी, पुण्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन होत आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, वि. दा. पिंगळे, ग्रंथ संपादक डॉ. मिलिंद बागूल यावेळी ‘शिवारप्रतिभा’वर चर्चा करणार आहेत.

लेखन: रजनीश जोशी ,ज्येष्ठ पत्रकार सोलापूर
००००