23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसाहित्य*राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे प्रणेते होते- डॉ.जनार्दन वाघमारे*

*राजर्षी शाहू महाराज सामाजिक लोकशाहीचे प्रणेते होते- डॉ.जनार्दन वाघमारे*

लातूर: हजारो वर्ष जाती, धर्म विषम व्यवस्थेत खितपत पडलेल्या समाजाला सामाजिक शैक्षणिक सुधारणेचा मूलमंत्र देऊन समाजाला पुनर्जीवित करण्याचा वसा राजर्षी शाहू महाराजांनी १९ व्या शतकात घेतला होता. दीन, दलित, वंचित, स्त्री, शेतकरी-कामगार अशा सर्व बहुजन समाजाला राजेशाहीच्या काळात लोकशाही मूल्यांची वागणूक देणारे शाहू महाराज हे सामाजिक लोकशाहीचे प्रणेते होते, असे प्रतिपादन माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत केले.

१९२२ ते २०२२ हे शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे.म्हणून मराठवाडा साहित्य परिषद,शाखा लातूरच्या वतीने दि. 3 ऑक्टोबर 2022 रोजी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या वाचन कक्षात ही व्याख्यानमाला घेण्यात आली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कुमार शिराळकर यांचे निधन झाले म्हणून दोन मिनिटे मौन धारण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात विद्रोही संत तुकाराम व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य कवी, नरसिंग इंगळे, कथाकार प्रकाश घादगिने, डॉ.ज्ञानदेव राऊत,प्रा.नयन राजमाने यांनी कार्यक्रमाचेअध्यक्ष डॉ.जनार्दन वाघमारे, प्रमुख व्याख्याते प्राचार्य डॉ नागोराव कुंभार, मसापचे अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव, सचिव डॉ दुष्यंत कटारे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी ज्येष्ठ कथा, कादंबरीकार डॉ.शेषराव मोहिते यांची निवड झाल्याबद्दल डॉ. जनार्दन वाघमारे व प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांच्या हस्ते शाल,संत तुकारामांची गाथा व बुके देऊन डॉ.शेषराव मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.या बरोबरच डॉ.मोहिते यांचा शब्दांकित साहित्य मंचच्या प्रा.नयन राजमाने, उषा भोसले, विजयाताई भलगे यांनी सत्कार केला.आदिवासी साहित्यिक रामराजे आत्राम यांनीही डॉ.मोहिते यांचा सत्कार केला. यावेळी विचारपीठावर मसापचे सचिव डॉ.दुष्यंत कटारे, अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव उपस्थित होते. व्याख्यानमालेचे प्रास्ताविक डॉ.जयद्रथ जाधव यांनी केले.१९२२-२०२२ हे वर्ष राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे,म्हणून शाहू महाराजांच्या कार्याचे विचार मंथन व्हावे यासाठी ही व्याख्यानमाला होत आहे.


‘राजर्षी शाहू महाराज व सामाजिक समता’या विषयावर बोलतांना डॉ.वाघमारे म्हणाले की, या करवीर संस्थानात मोफत व सक्तीच्या शिक्षणाची सोय राजर्षी शाहू महाराजांनी केली. उच्चवर्णीयांच्या विरोधात विद्रोह करून अठरापगड जातीच्या उन्नतीवर लक्ष केंद्रित केले. महात्मा जोतिराव फुले यांनी सुरू केलेली स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाची चळवळ राजर्षी शाहू महाराजांनी संस्थानात यशस्वी केली. सत्यशोधक चळवळीचे शाहू महाराज पुरस्कर्ते होते. म्हणून त्यांनी सामाजिक बदलासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले. उच्च शिक्षण हे सर्व रोगावरचे औषध आहे. म्हणून अस्पृश्य परिषदेमधून त्यांनी अस्पृश्यता निराकरण आणि शिक्षणाचे महत्त्व सांगितले. ‘जाती सोडा आणि सर्वांनी एक व्हा’ हा दाखला देताना त्यांनी जपानच्या सामुराई जातीचे उदाहरण दिले. वेदोक्त प्रकरणापासून हिंदू धर्मातील विषमता नाकारून समतेचा स्वीकार केला.क्षेत्रीय पुरोहित वर्गाला महत्व दिले.राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक, आर्थिक लोकशाही रूजवण्याचा विचार राजर्षी शाहू महाराजांनी केला.लोकशाहिचे मंदिर शाहू महाराजांनी उभे केले.
यावेळी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी “राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक विचार” या विषयावर आपले व्याख्यान दिले. राजर्षी शाहू महाराजांना सामाजिक न्यायाची एक भूमिका होती. शिक्षण हे व्यक्ती विकासाचं समाज उन्नतीच व समग्र परिवर्तन साधन ते मानत होते. समता प्रस्थापित करण्याची गुरुकिल्ली हे शिक्षण आहे. समाजाच्या एकता. अस्मिता. संस्कार आणि समाजातील अज्ञान, दारिद्र्य, शोषण संपविण्यासाठी शिक्षण हे साधन आहे. म्हणून शाहू महाराजांनी बहुजन समाज ज्ञान केंद्री करण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या शिक्षणाचा वारसा त्यांनी चालवला. सैनिकी स्कूल, तंत्रशिक्षण आणि मोफत शिक्षणातून करवीर संस्थानात ज्ञानाची क्रांती केली. रयतेचा शिक्षणातून शाश्वत विकास करण्याचे धोरण शाहू महाराजांचे होते.वसतिगृह बांधून शिक्षणाचे कार्य त्यांनी विस्तारित केले.
व्याख्यानास रामराजे आत्राम, अॅड. हशम पटेल,रामदास कांबळे, वृषाली पाटील, उषा भोसले, डॉ.किशन भोसले, डॉ.संभाजी पाटील, डॉ.हावळे सर, डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.लहू वाघमारे, जी.जी.कांबळे, रमेश हानमंते, दिलीप गायकवाड,एस.बी.साबळे,प्रा.हुडेकरी,प्रा.निकुंब सर, डॉ.शेवाळे सर, गवळी सर, विजयाताई भलगे, प्रमोद घोडके,विजय कांबळे उपस्थित होते. या व्याख्यानमालेसाठी मसापचे अध्यक्ष डॉ जयद्रथ जाधव, सचिव डॉ दुष्यंत कटारे, सुनिताताई अरळीकर, प्रा.नयन राजमाने, नरसिंग इंगळे,प्रकाश घादगिने, विवेक सौताडेकर यांनी व्याख्यानमालेसाठी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन कवयित्री शैलजा कारंडे यांनी केले तर आभार श्री विवेक सौताडेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]