मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या स्मृतींना पूर्णविराम नको
– प्रमोद बापट
” लढा ! मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा !” विशेषांकाचे प्रकाशन
लातूर/प्रतिनिधी: आपल्यावर झालेल्या अन्याय-अत्याचारांची जाणीव जो समाज विसरतो तो बळी जातो. त्यामुळे अमृत महोत्सवा नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मृतींना पूर्णविराम द्यायला नको, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार विभाग प्रमुख प्रमोद बापट यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक वार्तापत्र,
पुणे,श्री केशवराज शैक्षणिक संकुल,लातूर आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समिती,लातूर यांच्यावतीने “लढा ! मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा ! हिंदूंच्या संघर्षाची विजयगाथा” या विशेषांकाचे प्रकाशन मुक्ताई मंगल कार्यालयात संपन्न झाले.यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद बापट बोलत होते. ‘मराठवाड्याचा मुक्ती लढा आणि हैदराबाद संस्थान’ या ग्रंथाचे लेखक प्रा. डॉ.चंद्रशेखर लोखंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक संजय अग्रवाल,मराठवाडा साहित्य मंच,देवगिरी प्रांतचे संयोजक प्रविण सरदेशमुख,सांस्कृतिक वार्तापत्र,पुणेच्या सौ. सुनिता पेंढारकर, विवेकानंद संस्कार संस्थेचे संजय गुरव,मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव समितीचे डॉ. प्रदीप पाटील,उमाकांत मद्रेवार यांच्यासह केशवराज शैक्षणिक संकुल स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी-तुंगीकर, कार्यवाह शैलेश कुलकर्णी यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद बापट म्हणाले की,मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्हणण्यानुसार अमृत महोत्सवानंतर अमृत काल सुरू होतो.तसा मराठवाड्याच्या मुक्ती लढ्याचा अमृत काल आता सुरू होत आहे. मराठवाड्याला मुक्ती मिळाल्यानंतरही अनेक वर्ष आपल्याला मराठवाड्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करता आला नाही.वास्तवात मुक्तीसंग्राम हे निजामाशी झालेले युद्ध होते.यात अनेकांनी योगदान दिले. ज्यांनी-ज्यांनी यात सहभाग घेतला त्यांच्या स्मृती आपण जपल्या पाहिजेत.इतिहासाचे स्मरण केले पाहिजे.जुन्या स्मृतींना आपण पूर्णविराम देतो,तो पुसला पाहिजे. घडून गेलेल्या प्रसंगांची आठवण हे आपले सुरक्षा कवच आहे.कुठलाही दिनविशेष साजरा करण्यामागे एक घटना असते.त्या घटनेचे स्मरण करणे हा त्यामागचा मूळ उद्देश असतो.त्यामुळे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी आपल्या पूर्वजांनी जो लढा दिला त्याचे विस्मरण होता कामा नये.जो समाज जाणीव विसरतो तो बळी जातो. आपल्या पूर्वजांचा पुरुषार्थ आपण समजून घेतला पाहिजे तरच मराठवाडा मुक्त झाल्याची शाश्वती स्मरणात राहील, असे ते म्हणाले.’लढा ! मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा’ हा विशेषांक केवळ ग्रंथ नाही तर ते एक वज्र आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.चंद्रशेखर लोखंडे म्हणाले की,आर्य समाज,स्टेट काँग्रेस व हिंदू महासभेने मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी लढा दिला.येथील जनतेने साथ दिल्यामुळेच हा लढा यशस्वी झाला.या सत्याग्रहाला राष्ट्रवादी मुस्लिमांचेही समर्थन होते. १९२१ पासून निजामाने संस्थानातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याने या जाचातून जनतेची मुक्तता केल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठवाडा साहित्य मंचचे संयोजक प्रविण सरदेशमुख यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील विविध प्रसंग सांगत विविध घटकांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली.मराठवाडा जिजामाच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृती त्यांनी जागवल्या.तत्पूर्वी सुनिता पेंढारकर यांनी अंकाची पार्श्वभूमी सांगितली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संतोष बीडकर यांनी प्रेरणागीत सादर केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा प्रचार व प्रसिद्धीप्रमुख नामदेव व्यंजने यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.महेश काकनाळे यांनी गायलेल्या संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमास शहर व जिल्ह्यातील मान्यवरांसह सर्व स्तरातील नागरिक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.