विधानसभा जिद्दीने लढायची आणि जिंकायचीच
लातूर ग्रामीणच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे
केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन
लातूर दि.०३ – लोकसभा निवडणुकीचे निकाल ही एक चिंतेची बाब असली तरी या लोकसभेत महाविकास आघाडीपेक्षा केवळ अर्धा टक्का मते महायुतीला राज्यात कमी मिळाली. केंद्रात सत्ता आली मोदीजी पंतप्रधान झाले, सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी विविध योजना सुरू करणाऱ्या महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात येणार यात शंका घेण्याचे कारण नाही तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जिद्दीने लढायचे आहे आणि जिंकायचेही आहे या मानसिकतेतून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री ना. मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केले.

येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे पक्षपदाधिकारी, लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्त्यांची संघटनात्मक बैठक लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी झाली . या बैठकीस भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड, जिल्हा समन्वयक प्रा. किरण पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, जिपचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, भाजपा नेते राजेश कराड, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी ना मोहोळ यांचे पांडुरंगाची मूर्ती देऊन आ. रमेशआप्पा कराड यांनी यथोचित सत्कार करून स्वागत केले.

राज्यात आपला मुख्यमंत्री नसला तरी मोठा भाऊ या भूमिकेतून काम करीत आहोत. येणाऱ्या विधानसभेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढणार असल्याचे सांगून ना. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, बूथ प्रमुखाची मोठी जबाबदारी आहे. जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा त्याचबरोबर लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचा समन्वय साधून काम करावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून केंद्र आणि राज्य शासनाचे कल्याणकारी निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवावे अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी ना. मोहोळ यांनी उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांकडून मते जाणून घेतली आणि आगामी काळातील विधानसभा निवडणुकीची रणनीती काय असेल याबाबत मार्गदर्शन केले.

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा-वीस वर्षात कार्यकर्त्याच्या मेहनतीतून काँग्रेसचे अस्तित्व नष्ट करण्याचे काम केले असून या मतदारसंघातील ७० टक्के ग्रामपंचायती आजही भाजपच्या ताब्यात आहेत. या मतदार संघातील बहुतांशी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जागेवर घवघवीत यश संपादन करून रेणापूर नगरपंचायतीवर भाजपाने झेंडा फडकला असे सांगून या बैठकीत बोलताना भाजपा नेते आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, केंद्र शासन आणि राज्यातील महायुती शासन यांच्या माध्यमातून मतदार संघातील गावागावात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या अनेक कामांना निधी मोठ्या प्रमाणात मिळवून दिला एकूणच मतदारसंघात कार्यकर्त्याची मजबूत फळी असून पक्षाचे चांगले संघटन उभे केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत निवडून येणारी लातूर ग्रामीण ची जागा अचानकपणे शिवसेनेला दिली यावेळी भाजपाची असलेली जागा भाजपालाच ठेवून कार्यकर्त्यांना बळ आणि प्रोत्साहन द्यावे असे बोलून दाखविले.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी उपस्थित यांचे आभार मानले. प्रारंभी रेणापूर तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे यांनी बैठकीचे प्रास्ताविकात मतदार संघाची संघटनात्मक बांधणी सांगून आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांची माहिती दिली. बैठकीचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. या बैठकीस पंचायत राज सेलचे जिल्हा संयोजक नवनाथ भोसले, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत सोट, विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे, जिल्हा सरचिटणीस तुकाराम गोरे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, रेणापुरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, जिल्हा भाजपाचे हनुमंतबापू नागटिळक, सतीश आंबेकर, वैभव सापसोड, वसंत करमोडे, पद्माकर चिंचोलकर, राजकिरण साठे, सुरज शिंदे, अल्पसंख्यांक सेलचे रशीद पठाण, महिला आघाडीच्या ललिता कांबळे, लता भोसले, अनुसया फड, सुरेखा पुरी, शीला आचार्य, जणाबाई साखरे यांच्यासह लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे लोकप्रतिनिधी भाजपासह विविध आघाडी मोर्चाचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.