ग्रामिण भागात पुन्हा गोवरी तयार होऊ लागली
जाळण्यासाठी ( सरपण) लाकडे गोळा करण्यासाठी धडपड सुरु
लातूर
वाढत्या महागाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे जनजीवन पुन्हा विस्कळीत होत आहे. धूर मुक्त म्हणून घरा-घरात गॅस कनेक्शन देण्यात आली , मात्र हा गॅस आता हजार रुपये पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गॅस बंद होऊन पुन्हा चुलीची धुराडे सुरू झालेली आहेत. येणारा पावसाळा लक्षात घेता चुलीसाठी सरपण गोळा करणे गोवऱ्या तयार करून ठेवणे ही कामे महिलाला करावी लागत आहेत. मागील काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील गोवरी तयार करणे बंद झाले होते. मात्र आता ही कामे पुन्हा सुरू झाली आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ ही महागाई वाढण्यास कारणीभूत ठरत आहे . जीवनावश्यक सर्वच वस्तूंचे दर गगनाला भिडत आहेत. उज्वला गॅस योजना राबविण्यात आली. त्यामुळे घरोघरी चुली बंद होऊन गॅस आला, मात्र गॅस सिलेंडरची झालेली दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे . गॅस सिलेंडरसाठी एक हजारै रुपये लागत असून ग्रामीण भागात एवढी रक्कम खर्च करणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे पुन्हा सर्वजण आपल्या पारंपारिक साधनाकडे वळत आहेत.
पूर्वी प्रत्येक घरात चुलीवर स्वयंपाक करण्यात येत होता त्याच प्रमाणे गरम पाण्यासाठी वत्तल पेटवला जात होता. आता पुन्हा तेच दिवस परत आले आहेत. शेणाच्या गोवरी तयार करण्याचे काम पुन्हा सुरु झालेले आहे. ग्रामिण भागातील भिंती, रस्त्याच्या कडेला, घराच्या बाजूला गोवरी थोपल्या जात आहेत. पावसाळयात गोवरी खराब होऊ नये यासाठी हुडवा लावला जात आहे.
गोवरी सोबत सरपण जमा करणे, जते पावसात भिजणार नाही अशा ठिकाणी ठेवणे ही कामे करण्यात येत आहेत. प्रत्येक घरात सध्या वाळलेले सरपण रचून ठेवलेले दिसुन येत आहे.